मरावे परी कीर्ती रूपे उरावे!!
इंद्रनील तावडे नांव आपण कधी ऐकले आहे का? काल मनोज आचार्य ह्या पनवेलला राहणाऱ्या माझ्या परिचिताचा फोन आला होता. डॉक्यूमेंटरी फिल्म तयार करणे, प्रेसेंटेशन तयार करणे हा त्यांचा व्यवसाय आहे. मनोज अतिशय मन लावून काम करतात. सेकण्डरी स्कुल्स एम्प्लॉयीज कॉऑपेरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिं. मुंबई ५० वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल मनोजकडे तिच्या वाटचालीची डॉक्युमेंटरी करण्याचे कंत्राट मिळाले आहे.
त्या संस्थेचा इतिहास बघता त्याची स्थापना इंद्रनील तावडे ह्या सदग्राहस्थाने केली असे त्यांना कळले. आता डॉक्युमेंटरी बनवायची म्हणजे निदान त्या संस्थेच्या संस्थापकाचा फोटो तरी हवा म्हणून त्याने माहिती घ्यायला सुरवात केली . इंद्रनील गिरगांवात रहात असत. मीं पूर्वी गिरगांव मध्ये रहात असल्यामुळे साहजिकच मनोजने मला संपर्क केला आणि कै. इंद्रनील तावडे यांच्याबद्दल विचारले.
इंद्रनील पूर्वी प्रभूसेमिनरी स्कुल, ठाकुरद्वार, गिरगांव येथे इंग्रजीचे शिक्षक होते. माझे नातेवाईक कै. विजय भोळे यांच्या करेलवाडी, ठाकुरद्वार येथील विजय क्लासेस मध्ये इंद्रनील इंग्रजी शिकवत असत त्या मुळे त्यांची माझी थोडीफार ओळख होती. त्यांनी इंग्रजी विषयावर काही पुस्तके सुद्धा लिहून प्रसिद्ध केली होती. त्या पुस्तकांचा प्रसार करण्यासाठी ते विविध शाळांना भेट देत. त्या वेळी शाळेतील शिक्षकांना कमी पगार असत. त्यांना कर्ज वगैरे मिळणे अवघड जाई. सामाजिक पिंड असल्यामुळे तावडे सरांना ह्या विषयात काहीतरी काम करण्याची ईच्छा झाली आणि अशी झाली सेकंण्डरी स्कुल एम्प्लॉईज कोऑप क्रेडिट सोसायटीची सुरवात. यां वर्षी ह्या क्रेडिट सोसायटीला ५० वर्ष पूर्ण होत आहेत. संस्थेच्या २८ शाखा असून गतवर्षीची उलाढाल २२४२ कोटीची आहे.
ह्या शिवाय कोकणातील उत्पादने आणि आंबा काजू यांना मुंबईमध्ये बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून त्यांनी "रत्नागिरी फोरम" हे अनऔपचारिक संगठन सुद्धा स्थापन केले. शिवाय मराठा मंदिर संस्था , मराठा उत्कर्ष मंडळ यांसारख्या संस्थामध्ये त्यांचे महत्वाचे योगदान होते. कोकणातील आणि विशेषतः आपल्या समाजाने शिक्षणात आणि उद्योगधंद्यात पुढे यावे यां साठी त्यांचा कायम प्रयत्न असे.
आज तावडे साहेब नाहीत. तसेच त्या काळची त्यांना ओळखणारी माणसे सुद्धा गिरगांवात रहात नाहीत. ( सर्व विखूरली गेली ). पण योगायोगाने आणि थोड्या प्रयत्नाने मला माझ्या मित्रांद्वारे त्यांच्या मुलाचा संपर्क प्राप्त झाला आणि तो श्री मनोज आचार्य यांच्या पर्यंत पोहोचवण्यात मला यश आले. एका चांगल्या व्यक्तीच्या स्मृतीना उजाळा देण्यात माझा खारीचा वाटा मिळाला हा माझा भाग्याचा क्षण. आज ५० वर्षानंतर सुद्धा तावडे सरांच्या कामाची आठवण आणि नोंद होत आहे हे विशेष आहे.
समाजात वाईट गोष्टी आपोआप पसरतात पण चांगल्या पसरवायला कष्ट घ्यायला लागतात म्हणून हा प्रयत्न.
कै. इंद्रनील तावडे यांच्या स्मृतीला माझे विनम्र अभिवादन.
माधव भोळे
No comments:
Post a Comment