Friday, June 5, 2026

कौशल्य विकास आणि व्यवसाय

कौशल्य विकास आणि व्यवसाय.


माझ्या मित्राच्या ऑफिससमोर एक नवीन ऑफिस आलेले बघितले. E-waste cycling and refurbishment. मी मित्राला विचारले हीं कंपनी काय करते? 


तो म्हणाला भारतात आता ई-वेस्ट ( इलेक्ट्रॉनिक भंगार वस्तू आणि पार्टस ) ठराविक पद्धतीनेच नष्ट करता येते. मोठ मोठ्या कंपन्या लॅपटॉप कॉम्पुटरचे नवीन व्हर्जन आले कीं जुने व्हर्जन भंगारमध्ये काढतात. समोरची कंपनी अशा कंपन्यामधील जुने किंवा उपयोगात नसलेले लॅपटॉप कॉम्पुटर अत्यल्प दरात विकत घेते. त्यातील बिघडलेला पार्ट दुरुस्त करून ते चालू स्थितीमधील लॅपटॉप नवीन किमतीच्या ३५% ते ४०% कमी करून विकते. ग्रामीण भागात किंवा गरीब वस्तीमध्ये अशा कॉम्पुटरला मागणी असते. 


५०० रुपया मध्ये विकत घेतलेला लॅपटॉप, त्यावर हजार / दोन हजार खर्च करून तो १२ ते २० हजाराला विकते. त्यामुळे त्यांचा खूप फायदा होतो. अगदी जे लॅपटॉप दुरुस्ती करण्यापलीकडे आहेत किंवा त्याला खर्च जास्त आहे ते लॅपटॉप हीं मंडळी ई वेस्ट म्हणून निकालात काढतात. हीं कंपनी एक तरुण मुस्लिम चालवतो. गेल्या चार वर्षात त्याने हा समोरील गाळा १ कोटी २० लाखाला विकत घेतला आहे. मुस्लिम मंडळीचे एक वैशिष्ट्य आहे, भंगार जमा करुन त्यातील योग्य वस्तू दुरुस्त करुन योग्य किमतीत गरजूना विकणे. मग ते फर्निचर असो, कीं आणखी काही. वाटायला व्यवसाय शुल्लक वाटला तरी ह्या मध्ये खूप फायदा आहे ( अर्थात मेहनत सुद्धा ). ह्या लाईन मध्ये तसेच मोबाईल रिपेयरिंग लाईन मध्ये जास्त करून मुस्लिम तरुण आहेत. 


त्याचबरोबर टीव्ही रिपेयरिंग आणि वॉशिंग मशीन रिपेरिंग, एसी सर्व्हिसिंग अँड रिपेयरिंग, कार सर्व्हिसिंग, प्लम्बिंग इत्यादी मध्ये अनेक मंडळी आहेत. ह्यांचे मुख्य भांडवल म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सचे / मशीनरीचे तांत्रिक प्रॅक्टिकल ज्ञान. उदा. आज प्रत्येकाकडे लॅपटॉप आणि मोबाईल आहे. तो बिघडणारच आणि बिघडला कीं दुरुस्तीला येणार.


त्यांच्या मते जेव्हडा पैसा नवीन वस्तू विक्री मध्ये आहे त्या पेक्षा जास्त दुरुस्ती आणि सेवा या विषयात आहे. ह्या मंडळीना हीं गोष्ट चांगलीच समजली आहे.


पुढील काळ हा कौशल्य विकास आणि त्याचा प्रॅक्टिकलं उपयोगाचा आहे. तुमच्याकडे काही कौशल्य असेल तर तुम्ही चांगला व्यवसाय करू शकता. नोकरींच्या मागे लागण्यापेक्षा असा कौशल्यावर आधारीत व्यवसाय करणे केव्हाही चांगले. यात जागरूक असाल तर भरपूर ज्ञान आणि पैसा कमवाल.


असाच एक व्यवसाय ई सेवा, डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन. आजकाल भारतातील अनेक कामे इंटरनेटच्या साहाय्याने होतात. सर्व सामान्य माणसाला जरी इंटरनेटचे ज्ञान असले तरी सरकारी प्रोसिजरचे नसते. अशा वेळी ह्या ई सेवा उपयोगात येतात. या साठी काही मोठ्या कंपन्या फ्रंचाईझ सुद्धा देतात.


कोणी म्हणेल असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी तर वाट बघत बसावे. 


माधव भोळे 

असंवेदनशील शमिका रवी

असंवेदनशील शमिका रवी,

शमिका रवी ह्या एक ख्यातनाम अर्थतज्ज्ञ असून पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेच्या त्या एक सदस्या आहेत.

गेल्या ५ वर्षात १ डॉलर = रु. ७३.२३ वरून १ डॉलर = रु.  ९५.२२ एवढी रुपयाची घसरण झाली आहे. म्हणजे सरासरी वार्षिक ६% नी रुपया घसरला. जुन २०२५ ला १ डॉलर = रु. ८५.८८ एव्हडा होता. हीं घसरण काही अचानक झालेली नाही तर ती सरकारच्या आर्थिक धोरणांचा, कर्ज वाढीचा, बजेट डीफिशीटचा परिणाम आहे.  अशा वेळी शमिका रवी यांना पत्रकारांनी विचारले कीं रुपया एव्हडा खाली घसरला आहे कीं मार्केट मध्ये कुजबुज आहे कीं लवकरच १ डॉलर = रु. १०० एव्हडा घासरण्याची शक्यता आहे तर आपले काय म्हणणे आहे?

त्यावेळी शमिका रवी सांगतात कीं त्यात काय झाले? डॉलर १०० रुपये झाला तर काय विशेष? तो तर एक आकडा आहे. किती असंवेदनशील व्यक्ती आहे हीं,  जीं स्वतःला इकोनॉमिस्ट म्हणवते आणि पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेत पद भूषवते?. पूर्वी एकदा आर. आर  आबा पाटील म्हणाले होते "असे हादसे तर रोज कुठे ना कुठे होतच असतात" तसेच हे विधान.

डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया घसरला तर त्याचा परिणाम भारताच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होत असतो. आयात वस्तू जसे कीं डाळी, खाद्यतेले, इंधन तेल आणि पेट्रोलजन्य पदार्थ ह्या सर्वांच्या किमती आपोआप वाढणार. इंधन तेल वाढले कीं वाहतूक खर्च आणि त्यामुळे कच्चा मालाच्या किमती वाढणार. त्या मुळे बाजारातील वस्तू महागणार.  थोडक्यात महागाई वाढणार आणि महागाई वाढली कीं गरिब लोकांच्या हाल अपेष्टा वाढणार.  संघटित क्षेत्रात त्याचा एव्हडा परिणाम जाणवत नाही परंतु शेतकरी, मजुर, ऊसतोड कामगार अशा असंघटित वर्गाची ससेहोलपट होणार. भारतात दिवसेंदिवस गरीब आणि श्रीमंत यातील दरी वाढतच आहे. श्रीमंत अति श्रीमंत होत आहेत. त्यांनी टॅक्स दिला नाही तर त्या साठी अभय योजना आणल्या जातात. महागाई वाढण्याची आणि रुपया घासरण्याची अनेक कारणे आहेत त्यावर दुरगामी उपाय योजना करण्याचा विचार न करता सरकार खाद्य तेल आयात, सोने खरेदी कमी करा हे तात्पुरते उपाय सांगते. पण मूळ कारणे शोधून त्यावर उपाय योजना करण्यासाठी कोणीही सल्ले देत नाही.

आता खरी गरज आहे ते निव्वळ राष्ट्रीय उत्त्पन्न वाढवण्याची. गेले काही वर्ष GDP मधील वाढ हीं सरकारच्या इन्फ्रा गुंतवणूकीमुळे दिसून येते पण प्रत्यक्षात उत्पादन वाढी मुळे कमी आहे. मोदी सरकारची धरसोड वृत्ती ह्याला कारणीभूत आहे. २०१६ साली मोदी सरकारने २०२२ साला पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची (१००%)  घोषणा केली होती परंतु प्रत्यक्षात हे ह्या ६ वर्षात वार्षिक ४.४५% शेती उत्पन्न वाढले म्हणजे २८.०४% वाढले. इतर उत्पादन क्षेत्रात सुद्धा म्हणावी तशी वाढ नाही. उत्पादनामध्ये वाढ नाही म्हणून रोजगारामध्ये वाढ नाही. सेवा क्षेत्रात चांगली वाढ होत असताना AI चे भूत ह्या मध्ये नोकऱ्या कमी करणार अशी शक्यता दिसते.

रुपयाची घसरण थांबायची असेल तर मोदी सरकारने आता ह्याविषयावर काही तातडीचे निर्णय घ्यायला हवेत. देशाचे वाढते कर्ज आणि बजेट डीफिशीट कमी करायला पाहिजे, सरकारचा प्रशासन खर्च कमी करायला हवा. त्यासाठी एक म्हणजे विकासाच्या नावाखाली जीं उधळपट्टी सुरू आहे त्यावर कडक नियंत्रण ठेवायला हवे. अनावयश्यक इन्फ्रा प्रोजेक्ट काही काळासाठी बासनात गुंडाळायला हवेत. सुरू असलेल्या इन्फ्रा प्रोजेक्टचा आर्थिक रिव्यू घ्यायला हवा. रखडलेले प्रोजेक्ट जास्त इनपुट घालून पूर्ण करायला हवेत जेणेकरून कॉस्ट वाढणार नाही.

ह्या किंवा तत्सम उपाय योजना सांगायच्या सोडून ह्या शमिका रवी रुपयाच्या घसरणीकडे दुर्लक्ष करत आहेत.

माधव भोळे




Thursday, June 4, 2026

भारतीय सन्मान आणि यूरोप

भारतीय सन्मान आणि यूरोप 


नुकतेच स्वीतझरडलंड मधील एका हॉटेलने भारतीय पर्यटकांसाठी एक जाहीर नियमावली जारी केली. त्या मध्ये बुफे मधील जेवण खोलीत चोरून नेऊ नका, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ गडबड करू नका आणि शिस्त पाळा इत्यादी इत्यादी. यावर हर्ष गोयेंका ह्या स्पष्टवक्त्या प्रसिद्ध व्यवसायिकाने भारतीयांना त्या त्या देशाचे सिव्हिक सेन्स पाळण्याचे आव्हान केले. 


ठीक आहे, काही पर्यटक किंवा त्यांचे टूरऑपरेटर चुकलेहीं असतील, पण त्यामुळे सर्व भारतीय पर्यटकांना दोषी धरणे किंवा संशयाने बघणे चुकीचे होईल. 


या आधी सुद्धा जर्मनी मध्ये "Dogs and Indians  are  not allowed" असे बोर्ड रेस्टॉरंट बाहेर लागलेले असत, पण परिस्थिती बदलली आणि भारतीय तंत्रज्ञाना जर्मनी सन्मानाने बोलवायला लागली.


संपुर्ण युरोप आणि अमेरिका हा लुटारुंचा प्रदेश असून त्यांनी भारतीयांना सभ्यता शिकवणे म्हणजे "सौं चुहे खाके बिल्ली चली काशी" म्हणण्यासारखे होईल. युरोपातील बहुतेक देशांनी शस्त्रास्त्र आणि बळाच्या जोरावर आशिया आणि आफ्रिका खंडाला गुलाम बनवले. त्यांच्या सोने, चांदी आणि तांब्याच्या खाणीनवर त्यांनाच गुलाम म्हणून वापरले आणि त्यांना अमानुश छळ करून वागवले. 


अमेरिकेतील आणि ऑस्ट्रेलिया मधील आदिवासी लोकांच्या भयानक कक्तली केल्या, त्यांची घरे दारे लुटून त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले. त्यांच्या संस्कृती अक्षरशः पुरुन टाकल्या. वेगळ्या सौरक्षित वसाहतीच्या नावाखाली त्यांना ओपन जेल मध्ये टाकले. त्यांच्या जमिनी हिसकावून घेतल्या. हिटलरने तर मानवतेला काळिमा फसला. 


ब्रिटिश भारतात जन्टलमन व्यापारी म्हणून आले आणि आमच्या राजा राजांमध्ये भांडणे लावून ते भारताचे मालक झाले. भारतीयांचा लाखो कोटींचा कच्चा माल कमी किमतीत परदेशी नेऊन तो परत भारतातच जास्त किमतीला विकला आणि भारताचा पैसा पद्धतशीर पणे भारताबाहेर नेला. नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनीतर ब्रिटिश पार्लमेंटमध्ये पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवले कीं ब्रिटिश आणि त्यांच्या अधिकाऱ्यांचे पगार आणि लाड पुरवण्यासाठी भारताला गरिबीत ठेवले गेले. आज युरोपच्या कोणत्याही म्युझियम मध्ये गेलात तर तेथे भारतातून स्मगल केलेल्या भारतीय मूर्ती, चित्रकला दिसतील. भारताचा कोहिनुर आणि छत्रपती शिवाजी महाराज्यांची तलवार अजूनही लंडनच्या संग्रहलयात आहे. 

संबंध जगाला लुटणारे हीं मंडळी आज भारतासारख्या महान देशाला सभ्यता शिकवत आहेत हे जगातील आठवे आश्चर्य आहे. 


माधव भोळे 

Monday, May 25, 2026

समाजकार्य आणि देणगीचे महत्व!!

समाजकार्य आणि देणगीचे महत्व!!


एकदा महाराष्ट्रातील एक प्रतिथयश व्यावसायिक विकोवज्रदंतीचे मालक चालक कै. गजाननराव पेंढारकर यांना महाराष्ट्रातील एका दुर्गम भागात शाळाबांधण्यासाठी गजाननराव काही देणगी देतील या आशेने काही मंडळी भेटायला आली होती.


प्राथमिक चर्चा झाल्यानंतर गजाननराव म्हणाले. मी त्या गावातील नाही. मी त्या शाळेत शिकलो नाही. मी कशी काय देणगी देणार? हे सर्व संभाषण त्यांचे वडील आतल्या खोलीत बसून ऐकत होते. त्यांनी गजनानरावांना खूण करून हळूच आत बोलावले.


बाबासाहेब म्हणाले, अरे गजानन, तू म्हणतोस ते खरे आहे, त्या शाळेत तू शिकला नाहीस, ते तुझे गाव नाही, मग तू देणगी का द्यावी? पण एक गोष्ट समजून घे, ज्या शाळेत तू शिकलास ती तूझ्या वडिलांनी किंवा आजोबांनी बांधली नव्हती. मग ती शाळा सुद्धा कोणा दुसऱ्याच्या देणगीवर बांधली असणार ना? समाजचक्र हे असेच असते. कोणी देणगी देतो आणि कार्य पुढे चालू रहाते. तुला शक्य असेल तेवढी देणगी दे. पण त्यांना रिकाम्या हाताने पाठवू नकोस.


गजाननरावांना ते म्हणणे पटले. त्यांनी यथाशक्ती देणगी देऊन पाहुण्यांच्या विनंतीला मान दिला.  म्हणतात ना "संघे शक्ती कली युगे".


माधव भोळे. 


मरावे परी कीर्ती रूपे उरावे (डॉ. आनंद नाडकर्णी.)!

मरावे परी कीर्ती रूपे उरावे (डॉ. आनंद नाडकर्णी.)!


पूर्वी लोक म्हणत, माणसाची लोकप्रियता त्याच्या अंत्ययात्रेला येणाऱ्या लोकसमुदायावर समजली जाते.याबाबत टिळक, गांधी, नेहरू आणि बाळासाहेब ठाकरे यांनी रेकॉर्ड केले आहेत.


आजकाल लोक म्हणतात, माणसाची लोकप्रियता आणि उंची त्याच्या निधनानंतर समाज माध्यमातून आलेल्या मृत्यूलेखानावर समजते. आचार्य अत्रे, एक बिनधास्त स्पष्ट वक्ता. त्यांनी आयुष्यभर काँग्रेस आणि नेहरूना लाखोली वाहिली, पण म्हणतात अत्रे यांनी नेहरू गेल्यावर सतत ८ दिवस त्यांच्यावर अग्रलेख मराठा मध्ये प्रकाशित केले.


माझी आणि डॉ. आनंद नाडकर्णी यांची ओळख नव्हती किंवा त्यांच्याबद्दल मला जास्त माहिती सुद्धा नव्हती. ( अर्थात मानसतज्ञा कडे जाण्याची कधी वेळी आली नाही. 🤪). परंतु गेले ३ दिवस समाज माध्यमातून आलेल्या लेखातून हे निश्चित समजते कीं डॉ. आनंद नाडकर्णी हे अनेकांच्या जीवनात किती थोर होते. तीच गोष्ट आशा ताई भोसले यांचे बाबतीत बघितली.


धन्य ती सर्व मंडळी. म्हणूनच म्हणतात मरावे परी कीर्ती रूपे उरावे.


माधव भोळे 



पितृ ऋण आणि मोक्ष प्राप्ती!

पितृ ऋण आणि मोक्ष प्राप्ती!

जर आपल्याला काही अनपेक्षित अडचणी येत असतील तर आपण ज्योतिषाकडे जातो. अनेक वेळा ज्योतिषी आपल्याला सांगतात, तुमच्या पत्रिकेमध्ये पितृ दोष आहे. 


हिंदू धर्मानुसार, बिहार येथील गया (Gaya) हे पूर्वजांच्या (पित्रांच्या) मोक्षासाठी आणि श्राद्ध विधीसाठी सर्वोच्च आणि अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. गया येथे एकदा शास्त्रोक्त पद्धतीने 'पिंडदान' केल्यास पितरांना जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळून मोक्ष प्राप्त होतो, अशी दृढ श्रद्धा आहे.

गयामध्ये विष्णुपद मंदिर, फाल्गू नदी आणि अक्षयवट या तीन मुख्य ठिकाणी श्राद्ध विधी केला जातो.


१. फाल्गू नदीवर तर्पण: फाल्गू नदीच्या वाळवंटात स्नान करून पूर्वजांना तीळ आणि पाण्याने तर्पण दिले जाते. 

२. विष्णुपद मंदिरात पिंडदान: येथे भगवान विष्णूच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या शिळेवर पिंड अर्पण केले जातात. 

३. अक्षयवट पूजन: या विधीमध्ये वटवृक्षाची पूजा करून आशीर्वाद घेतला जातो. अक्षयवटावर पिंडदान केल्याने विधी पूर्ण मानला जातो आणि पितरांना अक्षय्य (कायमस्वरूपी) तृप्ती मिळते.


गया श्राद्ध आणि पिंडदानाचे महत्त्वमोक्ष प्राप्ती: गया क्षेत्रात पिंडदान केल्याने ७ पिढ्यांचा उद्धार होतो आणि पितरांना वैकुंठ प्राप्ती होते.


दशरथकृत श्राद्ध: प्रभू श्रीरामांनीही आपले पिता राजा दशरथ यांच्यासाठी येथेच श्राद्ध केले होते.


पितृदोष निवारण: कुंडलीतील पितृदोष निवारणासाठी हे विधी अत्यंत प्रभावी मानले जातात.


सामान्यतः पितृ पक्ष (भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा ते अमावस्या) हा काळ गया श्राद्धासाठी सर्वोत्तम मानला जातो。 या काळात गया येथे मोठा मेळा भरतो。 असे असले तरी, वर्षभरात कधीही (उत्तरायण किंवा शुभ तिथीला) गया येथे जाऊन हा विधी करता येतो.


विधीसाठी आवश्यक बाबी

गोत्र आणि पूर्वजांची नावे: विधी करताना गोत्र, पूर्वजांची नावे (विशेषतः ज्यांच्यासाठी श्राद्ध करत आहात) आणि त्यांचे निधन झालेले तिथी/वार माहीत असणे आवश्यक आहे.


पुरोहित (पांडा): गया येथे स्थानिक पांडा किंवा पुरोहितांच्या मार्गदर्शनाखालीच विधी केला जातो.


माधव भोळे