Monday, May 25, 2026

समाजकार्य आणि देणगीचे महत्व!!

समाजकार्य आणि देणगीचे महत्व!!


एकदा महाराष्ट्रातील एक प्रतिथयश व्यावसायिक विकोवज्रदंतीचे मालक चालक कै. गजाननराव पेंढारकर यांना महाराष्ट्रातील एका दुर्गम भागात शाळाबांधण्यासाठी गजाननराव काही देणगी देतील या आशेने काही मंडळी भेटायला आली होती.


प्राथमिक चर्चा झाल्यानंतर गजाननराव म्हणाले. मी त्या गावातील नाही. मी त्या शाळेत शिकलो नाही. मी कशी काय देणगी देणार? हे सर्व संभाषण त्यांचे वडील आतल्या खोलीत बसून ऐकत होते. त्यांनी गजनानरावांना खूण करून हळूच आत बोलावले.


बाबासाहेब म्हणाले, अरे गजानन, तू म्हणतोस ते खरे आहे, त्या शाळेत तू शिकला नाहीस, ते तुझे गाव नाही, मग तू देणगी का द्यावी? पण एक गोष्ट समजून घे, ज्या शाळेत तू शिकलास ती तूझ्या वडिलांनी किंवा आजोबांनी बांधली नव्हती. मग ती शाळा सुद्धा कोणा दुसऱ्याच्या देणगीवर बांधली असणार ना? समाजचक्र हे असेच असते. कोणी देणगी देतो आणि कार्य पुढे चालू रहाते. तुला शक्य असेल तेवढी देणगी दे. पण त्यांना रिकाम्या हाताने पाठवू नकोस.


गजाननरावांना ते म्हणणे पटले. त्यांनी यथाशक्ती देणगी देऊन पाहुण्यांच्या विनंतीला मान दिला.  म्हणतात ना "संघे शक्ती कली युगे".


माधव भोळे. 


मरावे परी कीर्ती रूपे उरावे (डॉ. आनंद नाडकर्णी.)!

मरावे परी कीर्ती रूपे उरावे (डॉ. आनंद नाडकर्णी.)!


पूर्वी लोक म्हणत, माणसाची लोकप्रियता त्याच्या अंत्ययात्रेला येणाऱ्या लोकसमुदायावर समजली जाते.याबाबत टिळक, गांधी, नेहरू आणि बाळासाहेब ठाकरे यांनी रेकॉर्ड केले आहेत.


आजकाल लोक म्हणतात, माणसाची लोकप्रियता आणि उंची त्याच्या निधनानंतर समाज माध्यमातून आलेल्या मृत्यूलेखानावर समजते. आचार्य अत्रे, एक बिनधास्त स्पष्ट वक्ता. त्यांनी आयुष्यभर काँग्रेस आणि नेहरूना लाखोली वाहिली, पण म्हणतात अत्रे यांनी नेहरू गेल्यावर सतत ८ दिवस त्यांच्यावर अग्रलेख मराठा मध्ये प्रकाशित केले.


माझी आणि डॉ. आनंद नाडकर्णी यांची ओळख नव्हती किंवा त्यांच्याबद्दल मला जास्त माहिती सुद्धा नव्हती. ( अर्थात मानसतज्ञा कडे जाण्याची कधी वेळी आली नाही. 🤪). परंतु गेले ३ दिवस समाज माध्यमातून आलेल्या लेखातून हे निश्चित समजते कीं डॉ. आनंद नाडकर्णी हे अनेकांच्या जीवनात किती थोर होते. तीच गोष्ट आशा ताई भोसले यांचे बाबतीत बघितली.


धन्य ती सर्व मंडळी. म्हणूनच म्हणतात मरावे परी कीर्ती रूपे उरावे.


माधव भोळे 



पितृ ऋण आणि मोक्ष प्राप्ती!

पितृ ऋण आणि मोक्ष प्राप्ती!

जर आपल्याला काही अनपेक्षित अडचणी येत असतील तर आपण ज्योतिषाकडे जातो. अनेक वेळा ज्योतिषी आपल्याला सांगतात, तुमच्या पत्रिकेमध्ये पितृ दोष आहे. 


हिंदू धर्मानुसार, बिहार येथील गया (Gaya) हे पूर्वजांच्या (पित्रांच्या) मोक्षासाठी आणि श्राद्ध विधीसाठी सर्वोच्च आणि अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. गया येथे एकदा शास्त्रोक्त पद्धतीने 'पिंडदान' केल्यास पितरांना जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळून मोक्ष प्राप्त होतो, अशी दृढ श्रद्धा आहे.

गयामध्ये विष्णुपद मंदिर, फाल्गू नदी आणि अक्षयवट या तीन मुख्य ठिकाणी श्राद्ध विधी केला जातो.


१. फाल्गू नदीवर तर्पण: फाल्गू नदीच्या वाळवंटात स्नान करून पूर्वजांना तीळ आणि पाण्याने तर्पण दिले जाते. 

२. विष्णुपद मंदिरात पिंडदान: येथे भगवान विष्णूच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या शिळेवर पिंड अर्पण केले जातात. 

३. अक्षयवट पूजन: या विधीमध्ये वटवृक्षाची पूजा करून आशीर्वाद घेतला जातो. अक्षयवटावर पिंडदान केल्याने विधी पूर्ण मानला जातो आणि पितरांना अक्षय्य (कायमस्वरूपी) तृप्ती मिळते.


गया श्राद्ध आणि पिंडदानाचे महत्त्वमोक्ष प्राप्ती: गया क्षेत्रात पिंडदान केल्याने ७ पिढ्यांचा उद्धार होतो आणि पितरांना वैकुंठ प्राप्ती होते.


दशरथकृत श्राद्ध: प्रभू श्रीरामांनीही आपले पिता राजा दशरथ यांच्यासाठी येथेच श्राद्ध केले होते.


पितृदोष निवारण: कुंडलीतील पितृदोष निवारणासाठी हे विधी अत्यंत प्रभावी मानले जातात.


सामान्यतः पितृ पक्ष (भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा ते अमावस्या) हा काळ गया श्राद्धासाठी सर्वोत्तम मानला जातो。 या काळात गया येथे मोठा मेळा भरतो。 असे असले तरी, वर्षभरात कधीही (उत्तरायण किंवा शुभ तिथीला) गया येथे जाऊन हा विधी करता येतो.


विधीसाठी आवश्यक बाबी

गोत्र आणि पूर्वजांची नावे: विधी करताना गोत्र, पूर्वजांची नावे (विशेषतः ज्यांच्यासाठी श्राद्ध करत आहात) आणि त्यांचे निधन झालेले तिथी/वार माहीत असणे आवश्यक आहे.


पुरोहित (पांडा): गया येथे स्थानिक पांडा किंवा पुरोहितांच्या मार्गदर्शनाखालीच विधी केला जातो.


माधव भोळे



Thursday, May 14, 2026

जागरूक व्यवसायिक!

जागरूक व्यवसायिक!

पश्चिम बंगाल मधील नुकत्याच झालेल्या निवडणूक प्रचारा दरम्यान भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी एका चणे,शेंगदाणे, भेळ विकणाऱ्या दुकानदाराकडून "झालमुरी" हा पदार्थ १० रुपयाला विकत घेतला. झालमूरी म्हणजे कुरमुरे आणि विशिष्ट मसाल्यांचे मिश्रण. त्याचे देश विदेशातील झालेले कव्हरेज लक्षात घेऊन, गुजरात मधील बालाजी वेफर्स ह्या स्नॅक्स बनवणाऱ्या महाकाय उद्योग असणाऱ्या आस्थापनाने लगेचच "झालमूरी" हा पदार्थ रु ५ आणि रु. १० च्या पाकिटात बाजारात विक्री करायला आणला आहे.


संधीचे सोने करणे म्हणतात ते हे.


६५०० कोटी रुपये वार्षिक उलाढाल असलेल्या बालाजी वेफर्स ह्या इंटरप्रिनरवर एक लेख आपल्या "India's Entrepreneurial Journey" या पुस्तकामध्ये आहे.


माधव भोळे 

अनोखी पितृवंदना!

अनोखी पितृवंदना!

२ दिवसापूर्वी अमेरीकेतील नॉर्थ कॅरोलीना विद्यापीठाच्या विल्सन कॉलेज ऑफ टेक्सटाईल मध्ये दीक्षांत समारंभाच्या भाषणात, अचानक एक मोठी घोषणा केली गेली. समारंभाचे पाहुणे भारतीय मूळ असलेले अमेरिकन नागरिक श्री अनिल कोचर होते. 


ते म्हणाले १९४६ साली माझे वडील श्री प्रकाशचंद कोचर, पंजाब मधून याच विद्यापीठात शिकायला आले होते. त्यांनी १९५० साली बॅचलर्स आणि १९५२ साली मास्टर्स पूर्ण करून या देशात आपले आणि आमचे करियर बनवले. त्यांना त्यांच्या भविष्याबद्धल काहीही माहिती नव्हती. आज मी त्यांचा मुलगा, त्यांनी मला दिलेले प्रेम आणि मार्गदर्शन याबद्धल त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांच्या स्मरणार्थ येथे उपस्थित असलेल्या सर्व १७६ बॅचलर्स डिग्री आणि २६ मास्टर्स डिग्रीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कर्ज मी आणि माझी पत्नी मेर्लीन भरणार असून या कॉलेजातून बाहेर पडताना तुम्ही कोणतीही आर्थिक जबाबदारी पाठी न ठेवता फक्त डिग्री घेऊन जा आणि पुढील अभ्यास आणि करियर करा.


अनिल कोचर हे एक अमेरिकन व्यवसायिक असून यासाठी त्यांनी सुमारे ६ मिलीयन डॉलर्स खर्च केले. 


लोक केक कापून मदर्स डे, फादर्स डे साजरा करतात, अनिलने अशी केली पितृवंदना.


माधव भोळे 

Tuesday, April 28, 2026

समर्थ रामदास स्वामीं आणि महाराष्ट्र धर्म

समर्थ रामदास स्वामीं आणि महाराष्ट्र धर्म 


बागेश्वरच्या धर्मेंद्र (शास्त्री) च्या बेताल वक्तव्यामुळे, प्रसिद्धी पासून दूर असलेले श्री समर्थ रामदास स्वामीं यांच्या कार्याला समाज माध्यमातून पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे. दासबोधा सारख्या पवित्र ग्रंथाची निर्मिती करणारे, स्वतः संसारी नसताना सुद्धा जगाचा संसार कसा चालावा याचा उपदेश करणारे, छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या राष्ट्रउभारणीच्या महान कार्यात आपल्या ११०० मठांचा आणि रामदासी परिवाराचा खारीचा पण महत्वपूर्ण वाटा उचलणारे, बाहुबली श्री हनुमानाच्या उपासनेद्वारे शक्तीची उपासना सर्वांनां शिकवणारे, बहिर्जी नाईकांच्या अत्यंत क्लिष्ट अशा हेरगिरीच्या कार्यात पत्र व्यवहाराद्वारे गुप्त संदेशांचे आदान प्रदान करण्याचे कौशल्य दाखवणारे, आणि उतारवायात नैसर्गिकरित्या विरक्तीचे विचार मनात येणाऱ्या महाराजांना, विरक्तीपासून परावृत्त करणाऱ्या समर्थ रामदास स्वामींच्या कार्याचा उजाळा त्यामुळे पुन्हा एकदा झाला. 


छत्रपती शिवाजीमहाराज हे स्वयंभू होते, त्यांना कोणाच्या सल्याची गरज नव्हती, तसेच जिजाऊ माता सोडता इतर कोणाच्या सांगण्यावरून त्यांनी राष्टउभारणीचे कार्य जरी हातात घेतले नसले तरी त्यांच्या तोडीच्या विविध माणसांसोबत ते नेहेमीच सल्ला मसलत करीत असत. लोकांमधील गुण दोष समजून घेऊन त्यांचा योग्य ठिकाणी उपयोग करण्याची कला छत्रपतीच्याकडे पहिल्यापासून अवगत होती. छत्रपती, समर्थ रामदासांना गुरु मानत किंवा नाही हा जरी चर्चेचा विषय असला तरी समर्थांचे ज्ञान, त्यांचा लोकसंग्रह आणि त्यातून आलेले अनुभवाचे शहाणपण याचा वापर छत्रपतीनी नक्कीच केला असावा. 


परंतु प्रत्येक ठिकाणी ब्राह्मण आणि अन्य मंडळीमध्ये वाद लावून आपल्या पोळीवर तूप ओढण्याचा प्रयत्न करणारे काही महाभाग लिहितात की समर्थांचे सर्व कार्य ब्राह्मणांना प्रोत्साहन देण्यासाठी होते. त्यांनी स्थापन केलेले मठ हे ब्राह्मणांची पोटे भरण्यासाठी होती, त्यावेळी मात्र चीड आल्याशिवाय रहात नाही.


जे समर्थ शिवरायांना सांगतात 

"मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा”

“आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मेळवावे”

“महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे"

 ते काही फक्त ब्राह्मण वर्गाचीं पोटे भरण्याचा संकुचित विचार करून नव्हे तर परकीय आक्रमणामुळे होत असलेली हिंदू धर्माची विटंबना आणि संस्कृतीचा ऱ्हास, हिंदूंवरील अत्याचार ह्याला पायबंद घालायला छत्रपतींसारखा पराक्रमी आणि धडाडीचा राजाच हे करू शकतो हे ते जाणून होते म्हणून.


पण ज्यांनी डोळ्यावर पटट्या बांधल्या असतील त्यांना उजेड कसा दिसणार?


असो. त्या महान छत्रपती शिवारायांना आणि श्री समर्थ रामदास स्वामींना माझा आदरपूर्वक नमस्कार.


माधव भोळे