Sunday, July 5, 2026

उदयपूर, राजस्थानचे एक सांस्कृतिक पर्यटन केंद्र

उदयपूर, राजस्थानचे एक सांस्कृतिक पर्यटन केंद्र 

लेख क्रमांक १

काही दिवसापूर्वी उदयपूर येथे जाण्याचा योग आला. संध्याकाळची वेळ रिकामी होती म्हणून येथे चौकशी केली कीं जवळ काय बघण्यासारखे आहे?. हॉटेल वाला म्हणाला बागोर कीं हवेली येथे म्युझियम आहे आणि संध्याकाळी तेथे राजस्थानी संस्कृती दाखवणारे एक थेट सादरीकरण ( Live performance ) असते. लेक पिचोलाला लागून असणारी हीं जागा अगदीच अरुंद बोळाची आहे. तेथपर्यंत गाडी जात नाही परंतु ऑटो जातात. 


तेथे गेलो आणि प्रथम म्युझियम बघितले ( वेळ ९.३० ते ५.३०, तिकीट माणशी ६० रुपये ) या मध्ये राजस्थानी राजा महाराजे, छत्रपती शिवाजी महाराज, ग्वालेरचे महाराज असे अनेक पुतळे होते. तेथून पहिल्या मजल्यावर पपेट म्युझियम होते. पपेट म्हणजे हालचाल करणाऱ्या बाहुल्या ( येथे अनेक वेशभूषा असलेले प्रकारचे पपेट होते), त्यानंतर राज घरण्याची नित्यउपयोगी स्नानोपयोगी भांडी , शैया, दरबार गादी इत्यादी वस्तू होत्या, त्यानंतर विविध संगीत वाद्ये, मूर्तिद्वारे शाहीविवाह पद्धती विविध देखावे, विविध युद्धात वापरली गेलेली शस्त्रे इत्यादी अनेक दालने होती. संपूर्ण म्युझियम बघायला एक तास लागला. त्यानंतर जवळच्या लेक पिचोलाच्या घाटावर मजा घेतली. या घातला गणगौर घाट असे म्हणतात. चैत्र शुद्ध प्रतिपदे पासून चैत्र कृष्ण तृतिया ह्या काळात या घाटावर गण गौरी उत्सव साजरा केला जातो. गण म्हणजे शंकर आणि गौरी अशा दोन देवांची वाजत गाजत मिरवणूक काढतात. 


त्यानंतर जवळच महाराणा जगतसिंग १ यांनी ई. १६५१ साली बांधलेल्या जगदीश (श्री विष्णु ) मंदिरामध्ये गेलो. तेथून बाजूलाच असलेल्या बांके बिहारी मंदिरात गेलो. 


त्यानंतर पेटपूजा करून परत संध्याकाळी ७ वाजता सुरू होणाऱ्या धरोधर लोककला थेट सादरीकरणाचे तिकीट काढण्यासाठी ६ वाजता लाईन लावली. ( ऑनलाईन तिकिटे सुद्धा मिळतात ). तिकीट माणशी रु. १२५. जर सादरीकरणाचे फोटो किंवा विडिओ शूटिंग करायचे असेल तर १२५ रुपयाचे आणखी एक तिकीट घ्यायला हवे. अंदाजे २५० माणसे खाली बैठकीवर चिडीचूप बसली होती. तरुण वर्ग जास्त प्रमाणात होता. बरोबर ७ वाजता सादरीकरण सुरू झाले. एका कोपऱ्यात चिपळ्या, हार्मोनियम, मृदूंग, तबला, डफली वाजवणारे कलाकार बसले होते. त्यातीलच दोघे तिघे गाणारे होते. प्रथम त्यांनी वक्रतुंड महाकायने सुरवात करून स्वागतपर नृत्य केले. त्यानंतर डोक्यावर ज्वाला असलेले हांडे घेऊन नाचणाऱ्या ६ स्त्रिया समोर आल्या. त्यांनी राजस्थानी पद्धतीचे नृत्य केले. त्यानंतर, विविध नृत्य झाली, त्यामध्ये पायाला झान्जेची एक बाजू असलेल्या पट्या बांधून दुसऱ्या हातामध्ये झान्जेचा दुसऱ्या बाजूने त्या वाजवत श्री कृष्णाचे भजन म्हणत नाचणाऱ्या स्त्रिया होत्या, त्या नंतर पपेट शॊ झाला. एका पपेटने तर जमिनीवर असलेली नोट उचलून दाखवली. पपेट शॊ सुद्धा अप्रतिम होता. त्या नंतर सर्वात शेवटी भवई नाच झाला हा जवळजवळ २० मिनिटे चालला. या मध्ये नृत्यानगना डोक्यावर मडकी घेऊन नाचायला लागली, हळूहळू मडकी वाढत चालली. सुरवातीला तीन मडकी होती, थोड्यावेळाने त्यावर दोन छोटी मडकी चढवली त्यानंतर काही नृत्य झाल्यावर आणखी चार छोटी मडकी चढवली गेली. जवळजवळ एकंदर ९ मडकी असावीत. खाली सर्वात मोठे आणि वरती सर्वात छोटे. ह्या नाचात वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग होते. कधी जमिनीवर बसत, तर कधी काचेवर नाचत तर कधी डोक्यावर ९ मडकी असताना जमिनीवरील फुलदाणीमधील नोट ओठात पकडत नृत्य सुरू होते. शेवटच्या प्रयोगात एका पितळी थाळीला पायाच्या तळव्याच्या दोन बोटांमध्ये पकडत ती थाळी खालच्या खाली फिरवत वर नृत्य केले ते अतिशय अप्रतिम आणि कलाकारीने ओतोप्रद भरलेले होते. 


एकंदर २५० चे आसपास प्रेक्षक असून सुद्धा कोणताही हल्लागुल्ला न करता शेवटला दमादम मस्त कलंदर ह्या गाण्यावर मडक्यानंशिवाय तुफान नाच झाला आणि कार्यक्रम समाप्त झाला. तेथपर्यंत ८ वाजले होते. खाली आलो तर आणखी २५० माणसे ८ ते ९ च्या सादरीकरण बघण्यासाठी तिकीट काढून उभी होती. ह्या कार्यक्रमाची लोकप्रियता विशेषत: तरुण वर्गात बघून आनंद वाटला. हा कार्यक्रम दररोज साजरा केला जातो.


या आधी गुजरात सरकारने सापुतारा येथे दररोज मोफत ठेवलेले वारली नृत्य सापुतारा तलावाजवळ बघायला मिळाले. 

अनेक राज्यामध्ये आपापल्या राज्यातील प्रमुख नृत्याविष:कार आणि लोककलेचे सादरीकरण केले जाते. पण महाराष्ट्रात फक्त काही उत्सव सोडले तर पर्यटकांसाठी विशेष लोक कला साजरी केलीजाते का? मला तरी माहिती नाही. आपणांस माहिती असेल तर सांगा.


माधव भोळे 

हळदीघाट, राजस्थानचे एक पर्यटन केंद्र.

हळदीघाट, राजस्थानचे एक पर्यटन केंद्र.

लेख क्रमांक २


राजस्थान मधील मेवाड संस्थानाचे १२ वे महाराणा उदयसिंग-२ यांचा जन्म १५२२ साली चितोडगड येथे झाला. उदयसिंगांच्या पिताजींच्या पश्चात उदयसिंगाचे काका बनवीरसिंग धोक्याने मेवाड संस्थानाचा राजा बनल्यानंतर त्यांनी उदयसिंग यांना झोपेत ठार मारण्याची योजना १५३७ मध्ये आखली. याची कुणकुण त्यांची लहानपणीची दाई पन्ना हिला लागली. तिने आपला मुलगा चंदन ह्याला उदयसिंगाच्या जागी झोपवले आणि उदयसिंगना कुंभलगड येथे लपून छपून पाठवले. बनवरसिंग ह्यांनी उदयसिंग समजून चंदनची हत्या केली. बनवीरसिंग जरी राजघराण्यातील होता तरी त्याच्या जन्माबद्दल काही शंका असल्यामुळे त्याला मेवाडमधील सरदारांनी आणि मोठया घराण्यानी पाठिंबा दिला नाही. पुढे १५४० मध्ये उदयसिंगाने मावलीच्या युद्धात बनवीर सिंगला ठार मारले आणि उदयसिंग मेवाडचे राजे झाले. १५५९ मध्ये मुघलं आक्रमाणापासून सुरक्षित अश्या आरवली पर्वत राजीच्या, गेरवा दऱ्या खोऱ्यात, मेवाडमधील पाण्याचे दुर्भीक्ष लक्षात घेता तलावांची नगरीं असलेल्या उदयपूरची महाराजा उदयसिंग यांनी स्थापना केली. १५६८ मध्ये मुघल बादशहा अकबराकडुन मेवाडची राजधानी असलेल्या चितोडगडचा पाडाव झाल्यानंतर मेवाडची राजधानी उदयपूर बनली. 


उदयसिंगला १८ राण्यांपासून २४ मुले झाली. त्यातील सर्वात मोठी महाराणी जयवंतीबाई सांगोरा हींच्या पासून १८ मे १५४० साली अतिशय पराक्रमी महाराणा प्रताप हा सर्वात मोठा मुलगा झाला.


२८ फेब्रुवारी १५७२ रोजी पिता उदयसिंग-२ यांच्या पश्चात महाराणा प्रताप यांचे मेवाडचे महाराणा म्हणून राज्याभिषेक झाला. महाराणा प्रताप अतिशय शूर आणि धाडसी होते. एकदा कुंभळगडच्या जंगलात महाराणा प्रताप यांनी बिबट्या वाघाला साध्या बिचव्याने यमसदनास पाठवले होते.


नाथद्वारा वरून उदयपूरच्या रस्त्यावर हळदीघाट लागतो. चारही बाजूला आरवली पर्वतरांगा आहेत. त्यावेळी राजस्थान आणि उत्तर भारतातील बहुतेक राजे बादशहा अकबराचे मांडलिक होते. १८ जून १५७६ रोजी अंबरचे राजा मानसिंग-१ ( मिर्झाराजे जयसिंग यांचे आजोबा ) ह्या मुघल बादशहा अकबरच्या मांडलिक सरदाराने हळदी घाटी येथे महाराणा प्रतापच्या सैन्यावर जोरदार हल्ला केला. मानसिंग स्वतः कच्छुवा राजपूत होता. तर महाराणा प्रताप शिशोदिया वंशाचे राजपूत होते. 


त्यावेळी मानसिंगकडे १०,००० सैन्य, प्रचंड शस्त्रसाठा आणि हत्ती घोडे होते तर महाराणा प्रतापकडे ३००० ते ४००० सैन्य होते. राजा मानसिंगने प्रथम महाराणा प्रतापला अकबराला शरण येण्यास सांगितले परंतु महाराणा प्रतापने स्पष्ट नकार दिला. 

जोरदार घमासान युद्ध झाले. महाराणा प्रतापकडे राजपूत, भिल्ल आणि अफगाणि योद्धे होते तर राजा मानसिंगकडे राजपूत, मुघल आणि परदेशीं योद्धे होते. भिल्ल योद्धे धनुष्यबाण वापरून शत्रूला नामोहरम करीत. 

भर युद्धामध्ये राणा प्रतापच्या चेतक नावाच्या घोड्याने थेट राजा मानसिंगच्या हत्तीवर घाला घातला, त्यामुळे राणा प्रतापने आपला भाला थेट अंबारीत बसलेल्या मानसिंगवर फेकला परंतु मानसिंग खाली बसला आणि भाला हत्तीच्या माहूताला लागला. माहूत घायाळ होऊन खाली पडला , त्यामुळे चावताळून हत्तीने आपल्या टोकदार दाताने चेतकच्या एका पायाला जखम केली. अशा वेळी चेतकला खूप वेदना झाल्या. अशाहीं परिस्थितीत चेतकने आपल्या ३ पायांचा वापर करून आपला स्वामीं राणा प्रतापला २२ फूट रुंद असलेल्या नाल्यावरून छलांग मारून जंगलातील सुरक्षित स्थळी नेले. त्यानंतर भयंकर जखमांमुळे चेतक मृत्यू पावला. त्या ठिकाणी चेतकची समाधी राणा प्रतापने बांधली. दोन्ही बाजूला खूप सैनिक मरण पावले. युद्ध इतके भीषण झाले कीं हळदी घाटाजवळील खामनोर जवळील नद्या, नाले, तलाव रक्तरंजित झाले. त्या भागाला पुढे "रक्त तलाई" असे नांव पडले. तलाई म्हणजे तलाव. युद्धात राजा मानसिंगचा विजय झाला परंतु महाराणा प्रतापला पकडून ठार करण्याचा त्याचा मनसुबा धुळीला मिळाला.


त्यानंतर राणा प्रतापने प्रतिज्ञा केली कीं जेथपर्यंत तो आपली स्वभूमी परत जिंकणार नाही तेथपर्यंत मी राजशैयेवर झोपणार नाही आणि सामान्य माणसाचे जीवन जगिन. राणा प्रताप वनवासात जीवन जगू लागला. हळूहळू त्याने जंगलातील भिल्ल तसेच आपल्याशी स्वामींनिष्ठ मंडळींना जमा करून युद्धासाठी परत जमावाजमवी सुरू केली. यावेळी त्याने उघड्या मैदानावरील युद्धनीती बदलून गनिमीकाव्याचा वापर करत मेवाडचा बराचसा भाग जिंकला परंतु अत्यंत मजबूत असा चितोडगड तो त्याच्या शेवटपर्यंत जिंकू शकला नाही. १९ जानेवारी १५९७ रोजीं राणा प्रतापचा शिकारीमध्ये झालेल्या जखमांमुळे मृत्यू झाला. मरतेसमई त्याने आपला सर्वात मोठा मुलगा अमरसिंग १ ह्याचे कडुन वचन घेतले कीं कधीही मोगलाना शरण जायचे नाही आणि आपण हरलेला चितोडगड परत घ्यायचा. 


बादशहा अकबरच्या मृत्यूनंतर जहाँगीर बादशहा झाला त्यानंतर अमर सिंग-१ ने १६१५ मध्ये चितोडगड मेवाड राज्यात परत आणला.


हळदीघाट जवळील छोटयाश्या पर्वतावर महाराणा प्रताप यांचा अश्वारूढ पुतळा आहे. या महायोद्याचा आणि हळदीघाटच्या लढाईचा गौरव आणि स्मरण कायम ठेवण्याच्या ध्येयाने प्रेरित झालेल्या डॉ. मोहनलाल श्रीमाळी ह्या शिक्षकाने आपली वडिलोपार्जित जमीन जुमला विकून, आपली चांगला पगार असलेली नोकरीं सोडून १२ वर्ष झटून महाराणा प्रताप म्युझियम १.५ हेक्टरवर उभारले आहे. हे त्या आश्वारुढ पुतळ्याच्या खालच्या भागात आहे. यामध्ये एक महाराणा प्रतापच्या जीवनावर आधारित १५ मिनिटाचा सिनेमा आणि त्याच्या जीवनातील विविध महत्वाचे प्रसंग ह्यावर सचित्र, समूर्त, लाईट आणि संगीत तसेच हिंदी समलोचन असलेले देखावे आहेत. त्याचे उदघाटन १९ जानेवारी २००३ रोजी झाले.


महाराष्ट्रात तर छत्रपती शिवाजी महाराजांचे आयुष्य,त्यातील विविध लढायांचे प्रसंग अतिशय प्रेरणादायी आहेत. त्याचे चित्रण डेरवण, ता. चिपळूण, रत्नागिरी येथे म्युरल फॉर्म मध्ये आहेत परंतु सचित्र समूर्ती लाईट आणि संगीत, मराठी समलोचन असलेले देखावे कोठे आहेत का मला माहिती नाही. 



माधव भोळे 


Thursday, July 2, 2026

चंपतराय आणि SIT

चंपतराय आणि SIT.


चंपत राय बन्सल,  विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष,  राष्ट्रीय स्वयंमसेवक संघांचे पूर्णवेळ प्रचारक, एक निस्सीम देशभक्त, एक निष्ठावंत समाज कार्यकर्ता आणि राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे माजी जनरल सेक्रेटरी. 


सध्या वादाच्या भोऱ्यात सापडलेली राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची दानपेटी आणि त्यामुळे बसलेली SIT या मुळे चंपत राय यांची चौकशी होणे साहजिकच आहे. जरी त्यांचे नांव प्राथमिक माहिती अहवाल ( FIR) मध्ये नसले तरी ज्या व्यक्तीवर राम मंदिर न्यासाची रोजच्या कारभाराची जबाबदारी आहे त्याची चौकशी होणे क्रमप्राप्त आहे. आणि जर त्यांची चौकशी होणार असेल तर त्याना त्यांच्या राम जन्मभूमी न्यासाच्या रोजच्या देखरेखीचा कोणताही नैतिक अधिकार रहात नाही त्यामुळे त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला किंवा त्यांना तो द्यावा लागला याने काही फरक पडत नाही.


अनेक लोकांचे म्हणणे आहे कीं काही लोक त्यांच्या वाईटावर आहेत आणि त्यामुळे त्यांना कट रचून त्यांचा काटा काढला गेला. पण जीं व्यक्ती आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडू शकत नाही त्याला त्या पदावर राहण्याचा अधिकारच नाही मग त्याचे पूर्व चारित्र्य कितीही स्वच्छ असो. येथे प्रश्न चरित्र्याचा आहेच पण क्षमतेचा सुद्धा आहे. एव्हडया मोठ्या कारभारावर लक्ष ठेवण्यास चंपत राय असमर्थ ठरले हे नक्की. तसें नसते तर एव्हडा मोठा घोटाळा राजरोस झाला नसता.


आता राहता राहिला प्रश्न कीं त्यांचा ह्या सर्व घोटाळ्यात आणि लुटीमध्ये थेट किंवा अप्रत्यक्षरित्या सहभाग होता का?  तसेच ह्या लु्टीमुळे त्यांना किंवा त्यांचा परिवार, नातेवाईक किंवा मित्र मैत्रिणी, हित संबंधि यांना लाभ झाला का? आणि तो लाभ त्यांनी मिळवून दिला का? 


तर त्याबाबतीत जेथपर्यंत सखोल चौकशी होत नाही आणि केस चा पूर्ण निकाल लागत नाही, आरोप पत्र निश्चित होत नाहीत तेथपर्यंत कोणालाही दोषी धरणे चूकच.


देव करो आणि चंपत राय ह्या सर्वातून सही सलामत सुटो आणि राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कार्य सज्जन विश्वास्तांचे हाती जाओ.


माधव भोळे 

रंगांची वाटणी??

रंगांची वाटणी??


पांढऱ्या रंगाच्या पटट्या मारल्यामुळे भडकलेले वातावरण शांत करण्यासाठी  काही जैन मंडळी राज ठाकरे यांना भेटायला गेली होती. 


खरे म्हणजे रंगाची निर्मिती देवांनी केली. आकाशातील इंद्रधनुष्या पासून ते फुलांतील आणि फुलपाखरातील विविध रंग, विविध रंगांचे पक्षी, पाने, फुले हीं निसंशय निसर्गाची निर्मिती आहे. असे असताना पांढरा रंग जैनांचा, हिरवा रंग इस्लामचा, भगवा रंग हिंदूंचा, निळा रंग आंबेडकरवादी बुद्धांचा, निळा आणि पिवळा रंग शिखांचा अश्या वाटण्या आपणच करून घेतल्या. त्या रंगावरून राजकारण आणि समाजकारण सुरू झाले, आणि त्यातून वाद.


पण इंद्रधनुष्याचे रंग कधी आपसात लढतांना दिसतात का? कधी ते आपला क्रम बदलतात का? जांभळ्या  ( violet ) रंगाने कधी लाल रंगाला म्हटले का कीं तुझ्या आणि माझ्या क्रमात अदलाबद्दल करूया?. 

फुलपाखराचे रंग एकाच पंखावर असताना त्यांची तक्रार आपण कधी ऐकली का? सिताफळ कधी सफरचंदाला म्हणाले का कीं तुझा रंग मला दे. 


मग आपणच आपसात असे का भांडतो? 

आपले धर्मपंडित आपल्याला कधीच सांगत नाहीत कीं शंकराला लाल फुल वाहू नका किंवा कृष्णाला पांढरे फुल वाहू नका. ते फक्त त्या देवतांचे प्रियफुल किंवा प्रिय रंग सांगतात. आमच्या अंबाबाईला आणि गणपतीला लाल रंग, कृष्णाला निळा, तर शंकराला सफेद रंग आवडतो.


आपला धर्म सांगतो कीं जसा भाव तसा देव. तुमच्या कडे अमुक फुल नाही तर तुम्ही दुसरे फुल वापरा, ते सुद्धा नसेल तर अक्षता वहा. त्या सुद्धा नसतील तर हळद पिंजर वहा. आपल्या देवांना कोणताही रंग वर्ज्य नाही. मग आपण फक्त भगव्यालाच का महत्व द्यायचे? बाकीच्या रंगांवरील आपले प्रेम कमी आहे का? 


सर्व रंग आमच्यासाठी समान प्रियतेचे असायला हवेत. व्यक्तिगत प्राध्यान आपले आपण ठरवू शकायला हवे. आम्हाला कोणी एकाच रंगाने बांधायची काय गरज आहे.


विचार करा


माधव भोळे 

Thursday, June 25, 2026

कुणाल शहा, व्हाट्सअपचा नवीन ग्लोबल सीईओ.

 उतुंग भरारी 

( कुणाल शहा, व्हाट्सअपचा नवीन ग्लोबल सीईओ.)


कुणाल शहा, मुंबईचा व्यवसायिक विभाग प्रिन्सेस स्ट्रीट, लोहार चाळ येथे राहणारा एक १५ वर्षाचा मुलगा, वडीलांचा औषधांचा व्यवसाय बंद पडल्यामुळे डिलिव्हरी बॉय पासून पडेल ते काम करायला लागला. त्यानंतर त्याने मुंबईतील विल्सन कॉलेजमध्ये सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत तत्वज्ञान ( philosophy) शिकत त्यामध्ये BA केले. वेगवेगळी आडनड कामे सुरूच होती.


पुढे NMIMS, मुंबई मध्ये MBA साठी प्रवेश घेतला, परंतु त्याने लवकरच तेथून ड्रॉप घेतला आणि स्वतःचे काहीतरी सुरू करायचे म्हणून "FreeCharge" हीं फिन्टेक (तंत्रज्ञानावर आधारित आर्थिक कंपनी ) कंपनी सुरू केली. ह्या मध्ये कोणताही आकार (चार्ज ) न घेता वेगवेगळ्या मोबाईलचे रिचार्ज, टीव्ही अँटीना रिचार्ज किंवा वेगवेगळ्या सभासद वर्गण्या ( subscriptions ) स्वीकारून त्या त्या कंपन्याना पोचवल्या जायच्या. हीं कंपनी स्नॅपडील सारख्या भारतीय इंटरनेट ई कॉमर्स कंपनीच्या नजरेस आली आणि ती त्यांनी २८०० कोटी रुपयाला विकत घेतली. 


खरे म्हणजे त्या पैशावर तो मस्त मजा मारू शकला असता परंतु थोड्याच दिवसात त्याने CRED नावाची कंपनी काढली. CRED, हीं सुद्धा एक फिन्टेक कंपनी असून क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना कमीत कमी पैशामध्ये क्रेडिट कार्डचा चांगला फायदेशीर वापर कसा करायचा जेणेकरून कमी व्याज आणि जास्त लाभ होईल, तसेच वेळेवर बिले भरणे, क्रेडिट कार्ड मधील फॅसिलिटी इत्यादी फायदे लोकांपर्यंत पोहोचवणे वगैरे सारखी कामे CRED करते. 


आता फेसबुकची मुख्य कंपनी मेटा यांनी ह्या CRED चे २०% शेयर्स रु. ८५५० कोटीला विकत घेतले असून त्यामुळे CRED ची बाजारी किंमत ४.५ बिलीयन डॉलर्स ( सुमारे रु. ४२,००० कोटी ) झाली आहे. मुख्य म्हणजे कुणाल शहाचे विचार आणि त्याचे व्यवसायिक ज्ञान ऐकण्यासाठी फेसबुकच्या मार्क झुकरर्बर्गने त्याला थेट बंगलोर वरून अमेरिकेत बोलावून घेतले आणि त्यानंतर त्याला व्हाट्सअप ह्या अँप्लिकेशनचा थेट ग्लोबल सीईओ बनवला. विशेष म्हणजे कुणाल कोणत्याही अमेरिकेतील किंवा भारतातील मोठ्या इंजिनियरिंग कॉलेज किंवा मॅनेजमेंट कॉलेजचा विद्यार्थी नसताना असे घडू शकते यावर कोणाचा विश्वास बसेल का? पण हे झाले आहे.


कुणालचा स्टार्टअप प्रवास नेहेमीसारख्या घिसा पिट्या रस्त्यावरून झालेला नाही. कुणाल तत्वज्ञानाचा विद्यार्थी असल्यामुळे लोकांच्या अपेक्षा, आशा आकांक्षा आणि त्यांची वागणूक ( behavior ) या बद्धल त्याला प्रचंड माहिती आहे. मानवी मानसशास्त्र ( human psychology ) आणि समाजकारण ( sociology ) ह्या बद्दल त्याचे स्वतःचे काही ठोकताळे आहेत. तो स्वतः एक एंजल इन्व्हेस्टर असल्यामुळे एखादे स्टार्टअप किंवा प्रोडक्ट आर्थिक दृष्ट्या यशस्वी होईल कीं नाही हे चेक करण्यासाठी त्याने Delta 4 theory नावाची संहिता काढली आहे. 

स्वतः मार्क झुकरबर्गची मूळ कंपनी फेसबुक आणि व्हाट्सअप दोन्ही अँप्लिकेशन मुख्यतहा मानसशास्त्रावरच आधारित आहेत.


नुकतेच ४३ वर्ष पूर्ण केलेला कुणाल व्हाट्सअप चा ग्लोबल सीईओ बनला आणि भारतीयांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा चढला.


कोण म्हणतो भारताची तरुणाई निराशाजनक आहे, त्यांनी डोळ्यावरचा पिवळा चष्मा काढावा.


माधव भोळे 

दुर्दैवी घटना आणि लोक प्रतिक्रिया!

 दुर्दैवी घटना आणि लोक प्रतिक्रिया!


गेल्या आठवड्यात २ धक्कादायक घटना घडल्या. एक पुणे येथील केतन अगरवालचा लोहगडावर दुर्दैवी खून आणि दोन नालासोपारा येथील मयांक लोहार याचा मुंबई लोकल मधील खून. 


यावरून समाज माध्यमावर अतिशय विचित्र आणि निराशादायक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. चांगले चांगले विचारवंत सुद्धा आताची पिढी आणि या आधीच्या पिढ्या यांची तुलना करत पुढील चित्र किती निराशादायक आणि भयावह आहे, तरुण पिढी कशी वाया गेली आहे वगैरे रंगवून सांगत आहेत.


मुळात म्हणजे १४ करोड लोकसंख्येच्या महाराष्ट्रात किंवा १४० करोड लोकसंख्येच्या भारतात हे घडले हे वानगीदाखल आहे, पण ह्या घटना म्हणजे आपला समाज आहे का? 


एका बाजूला देशामध्ये २२.७९ लाख विद्यार्थी निट परीक्षा, किंवा ५.४९ लाख विद्यार्थी UPSC परीक्षा, १६ लाख विद्यार्थी IIT JEE, ४ ते ६ लाख विद्यार्थी नॅशनल डिफेन्स अकॅडेमी एंट्रन्स सारख्या वेगवेगळ्या आव्हानत्मक परीक्षाची तयारी करत असतात. दुसऱ्याबाजूला २.२३ लाख स्टार्टअप्स रजिस्टर असून त्यातील ५५,२०० हे नुसते गेल्या वर्षभरात नोंदले गेले असताना, तसेच Sarvam AI, krutrim AI, Neysa AI सारखे AI मधील ऍडव्हान्स संशोधन आणि प्रोडक्ट्स तयार होत असताना पुढील चित्र निराशाजनक आहे, पुढील पिढी वाया गेली आहे या सारखे सुर समाज माध्यमातून बडवले जातात ह्यामध्ये त्या लेखकांचे दळभद्री पण दिसून येते. 


वरील दोन घटनांची पार्श्वभूमी अतिशय वेगळी आहे. नालासोपारा येथील मयांक लोहार याला मारणारा रोशन सुवर्णा हा दिवसभर दारू पीणारा एक मजूर होता तर लोहगडावर केतन अगरवाल याला ढकलणारी सिया गोयला हीं बड्या बापाची २० वर्षांची एक मूर्ख मुलगी होती जिने कल्पना पण केली नसेल कीं आपला प्लॅन फेल गेला तर काय होईल. ती तिच्या प्रेमाच्या धुंदीत वहात गेली होती. तिने सिनेमा मध्ये होते तसें केले.


वरील हत्येची दोन उदाहरणे किंवा कोयता गँग किंवा एखादे गँग वॉर म्हणजे संपूर्ण समाज नव्हे. प्रत्येक समाजात चांगली वाईट माणसे असतातच म्हणून संपूर्ण समाजाचे चित्र काळ्या ब्रशने रंगवणे चुकीचे होईल.


पर्वाचीच एक बातमी वाचली. Witkin नावाची एक अमेरिकन युवती भारतात केरळ मध्ये एकटीच फिरायला आली असताना तिचे डेबिट कार्ड ATM मध्ये तसेच राहून गेले आणि ते एका रिक्षा वाल्याला मिळाले. त्या कृष्णा नावाच्या रिक्षावाल्याने, कोणताही मोबदला अपेक्षा न करता १४ तास रिक्षाने जाऊन येऊन प्रवास करत ते कार्ड त्या महिलेला पोहोचवले. या वरून काय लक्षात येते? कीं भारतात अजूनही चांगली माणसे आहेत. 


पूर्वी सुद्धा रामन राघवन, रंगा बिल्ला सारखे खुनी होते पण त्याचवेळी इतरही अनेक मंडळी या समाजाला पुढे नेत होती. पूर्वी रावण सुद्धा होता आणि राम सुद्धा होता. कौरव होते आणि पांडव सुद्धा होते. येशू ख्रिस्त देखील होते आणि त्याला फासावर चढवणारे रोमन साम्राज्य सुद्धा होते. प्रेषित मोहमद पैगंबरांच्या नातवाला हुसैन इब्न अलीला करबला येथे आमंत्रण देऊन पाणी सुद्धा प्यायला न देता त्याची आणि त्याच्या संपुर्ण समूहाची हत्या करणारे सुद्धा होते. म्हणजेच कोणत्याही काळात जगात दुष्ट आणि सुष्ट शक्ती होत्या.


त्यामुळे एक दोन घटनांनी हादरून न जाता, संपुर्ण समाज दलदलित फसला आहे असे न समजता, आशादाई बातम्याची सुद्धा दखल घ्यायला हवी. 


दुर्गंधी लवकर पसरते पण सुगंध दरवळायला वेळ लागतो कारण तो मंद असतो. 


माधव भोळे 

नेमेची येतो पावसाळा ??

नेमेची येतो पावसाळा ??


शाळेत असताना आम्हाला वरील आशयचे निबंध लिहावे लागत. आधीच उल्हास मग त्यात फाल्गुन मांस. कुठूनतरी दोन चार ओळी खर्डायच्या आणि शिक्षकांना दाखवायच्या. बाकीचे विद्यार्थी मात्र ३/४ पानी निबंध लिहायचे. त्यावेळी मात्र मला ज्ञानेश्वरांच नक्कीच हेवा वाटायचा. एवढीशी ७०० श्लोकांची भगवद गीता, त्याच्यावर म्हणे त्यांनी टीका केली, ती सुद्धा १८ अध्याय आणि ९०३४ ओव्यानमध्ये साचेबद्ध केली. काय प्रतिभाशक्ती त्या महानुभावाची. एका एका ओवीचा अर्थ आजसुद्धा वाचकाच्या अनुभवानुसार आणि अनुभतीनुसार पुन्हा पुन्हा वेगळा समजला जातो आणि सांगितला जातो. जे सोपे म्हणून करायला गेले ते परत गहन झाले. 


तर सांगायचा मुद्धा म्हणजे ज्या पावसाची आपण गेले एक महिना आतुरतेने चातकासारखी वाट पहात होतो तो आमच्या मालाडच्या धरतीवर आज सकाळी अवतरला. थोडा थोडका नाही तर चक्क अर्धा तास रीप रीप करीत संपुर्ण अंगण भिजवून गेला आणि त्यामुळे;


"रित्या झाल्या अत्तराच्या कुप्या, कोसळती जलधारा भुवरी, 

चिंब होऊन मन, दूर जाई सागरी,

पेटल्या चेतना, जागृत झाल्या भावना,

आठवता दिवसतो, बांध घाली या मना" ( अर्थात कवी गणेशसूत माधव 🤪).


असेच काहीसे काव्य मनात घोळू लागले. कारण गेले काही दिवस संपुर्ण महाराष्ट्र ज्या क्षणाची वाट आतुरतेने पहात होता तो, "नेमेची येतो पावसाळा" अशी त्या पावसाची इतके वर्ष खिल्ली उडवल्यामुळे इतका नाराज झाला होता कीं त्यामुळे मुळात सध्या तोंडात नसलेले सर्व मुंबईकरांचे तोंडचे पाणी पळाले होते.


असो तर आपण कुठलीही गोष्ट अगदी हलकी फुलकी घेतो. पाण्यासारख्या "जीवन" नांव असलेल्या पदार्थाची किंमतच आपण २० रुपये / बाटली ठरवून त्याला एक कमोडीटी म्हणून वापरतो, त्याचा खरा अर्थ या गेल्या एक महिन्यात आम्हाला समजला. आता तरी आपण त्या पाण्याला आणि त्याचा बाप असलेल्या पावसाला योग्य तो मान देऊन त्याचे स्वागत आणि गौरव करूया. 


सर्वांनां पावसाळ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आणि हो कुठे पावसाळी पिकनिक काढणार असाल तर आम्हाला पण बोलवा गरम गरम भजी खायला आणि तोंड भाजेस्तो गरम चहा प्यायला.


माधव भोळे