Wednesday, April 8, 2026

नेहरू आणि डॉ. होमी भाभा

 नेहरू आणि डॉ. होमी भाभा 


अनेकवेळा फेसबुकवर आणि समाजमाध्यमातून नेहरुंच्या कर्तृत्वापेक्षा त्यांच्या खाजगी आणि व्यक्तिगत जीवनावर आधारित टीकेची झोड उठवली जाते पण काही कार्याचे परिणाम दूरगामी असतात तर काही लगेच परिणाम दाखवतात. 


डॉ. होमी भाभा हे एक जगदविख्यात अणू शास्त्रज्ञ् होते तसेच भारताचे पहिले पंतप्रधान नेहरूंचे ते मित्र होते. अशी अनेक विद्वान माणसे नेहरूंनी जोडली होती.


भारत स्वतंत्र झाल्यावर एप्रिल १९४८ मध्ये डॉ. होमी भाभानी एक प्रस्ताव नेहरुंपुढे मांडला. तो म्हणजे ऍटोमॅटिक एनर्जी कमिशनचीं स्थापना. त्यांच्यामते भारताच्या ऊर्जा समस्या आणि दुरगामी प्रगतीसाठी अणूऊर्जा हा एक चांगला उपाय आहे. परंतु त्यासाठी लागणारे युरॅनियम भारताकडे नाही किंवा असले तरी त्याचे साठे अत्यल्प आहेत. त्यापेक्षा भारताकडे थोरियमचा साठा खूप आहे परंतु त्याच्यापासून अणूऊर्जा तयार करायला वेगळी प्रोसेस आहे आणि त्यावर अजून संशोधन होणे आवश्यक आहे. शिवाय एकदा युरानिम वापरले की ते खर्च होऊन जाते ( त्यापासून नवीन ऊर्जा तयार होऊ शकत नाही ) या उलट थोरियमचे खर्च झालेले इंधन परत रिफायन करून परत ऊर्जा तयार करण्यासाठी इंधन म्हणून वापरता येते. त्यामुळे थोरीयम हे अव्याहत चालणारे मटेरियल आहे. पण हे करताना डॉ. भाभानी एक अट नेहरुंपुढे घातली की ऍटोमॅटिक एनर्जी कमिशनचे स्वतंत्र बजेट असेल. त्याचीं मंजुरी संसदेत न होता थेट राष्ट्रपतींकडुन होईल. म्हणजे संशोधनाची गुपिते संसदेच्या सभागृहात चर्चेला येणार नाहीत आणि ती बाहेर जाणार नाहीत. नेहरूंनी ते मान्य केले.


70 वर्षांपूर्वी होमी भाभा यांनी अणुऊर्जेवर आधारित आत्मनिर्भर भारताची कल्पना केली होती. आज ती दृष्टी प्रत्यक्षात येत आहे.


भारताकडे आता एक अणुभट्टी आहे जी केवळ वीजच नाही तर वापरते त्यापेक्षा जास्त इंधन देखील तयार करते. चेन्नई ( तामिळनाडू ) पासून ८० किलोमीटर दक्षिणेला कल्पक्कम येथे, प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर अणुभट्टी खर्च केलेले आण्विक इंधन वापरत आहे आणि एका अनोख्या प्रक्रियेद्वारे त्याचे ताजे इंधनात रूपांतर करत आहे ज्यामुळे आयात केलेल्या युरेनियमवरील अवलंबित्व कमी होते आणि दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षा मजबूत होते.


काल एक विशेष घटना जगाला सांगितली गेली. भारतातील हा प्रकल्प आता खर्च झालेल्या थोरियम पेक्षा जास्त थोरियम तयार करू शकतो. त्याला तांत्रिक भाषेत achiving criticality असे म्हणतात.


भारताकडे थोरियमचा जगातील सर्वात मोठा साठा आहे, जो देशाला शतकानुशतके सामर्थ्य देऊ शकतो. तथापि, थोरियमचा थेट वापर केला जाऊ शकत नाही आणि त्याची क्षमता अनलॉक करण्यासाठी यासारख्या प्रगत अणुभट्ट्यांची आवश्यकता आहे.


युरेनियम, प्लुटोनियम आणि सरतेशेवटी थोरियम-आधारित उर्जेच्या दिशेने प्रगती करत, भारताच्या तीन-टप्प्यांवरील अणुकार्यक्रमात हे यश एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.


असे म्हणतात की जगाकडे १०० ते १५० वर्ष पुरेल इतकाच युरानियम साठा आहे तर भारताकडील थोरीयम साठा निदान ७०० वर्ष पुरेल. त्यामुळे स्वच्छ आणी आत्मनिर्भर ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने भारताने आणखी एक पाऊल उचलले आहे.


जवाहरलाल नेहरू यांनी १७ वर्षात, भारताची उर्जीतावस्था असताना आणि हातात कमी पैसा असताना ( कारण होते ते सर्व इंग्रजानी लुटून नेले होते ) ७५ पेक्षा जास्त रचनात्मक संस्था तयार केल्या ज्याला ते "आधुनिक भारताची मंदिरे ( "The Temples of Modern India".).

त्यातील काही महत्वाच्या संस्थांची यादी खाली दिली आहे.

Science and Technology:

1. Bhabha Atomic Research Centre (BARC) 

2. Department of Atomic Energy (DAE) 

3. Indian Institutes of Technology (IITs) 

4. Indian Institute of Managements (IIMs) 

5. National Institute of Technologys (NITs) 

6. National Institute of Virology, Pune 

7. Indian Space Research Organisation (ISRO)


Healthcare and Medical Education:

8. All India Institute of Medical Sciences (AIIMS) 

9. Jawaharlal Institute of Postgraduate Medical Education and Research (JIPMER)


Public Sector

10. Life Insurance Corporation of India (LIC) 

11. Oil and Natural Gas Corporation (ONGC) 

12. National Institute of Design (NID)


Higher Education and Research:

13. Jawaharlal Nehru University (JNU) 

14. Indian School of Mines 

15. National Library of India 

16. Jawaharlal Nehru Tropical Botanic Garden and Research Institute


Infrastructure:

17. Bhakra-Nangal Dam 

18. Bharat Heavy Electricals Limited (BHEL)


Others :

19. NDA

20. Indian School of Mines

21. Indian Institute of Virology

22. IMA

23. Kendriya Vidyalayas

24. Khadi Gramodyog

25. CSIR

26. National physical laboratory 

27. National Library of India

28. Chandigarh City

29. Indian Oil Corporation


पण दुर्दैव म्हणजे लोकांना नेहरुंचा एडविनाच्या सिगारेटला लाईटरने पेटवण्याचाच फोटो जास्त दाखवला जातो 😰


माधव भोळे 

Tuesday, March 31, 2026

पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेश्येला मणिहार

पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेश्येला मणिहार

देवेंद्र अजब तुझे सरकार??


काल महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतला. मुंबई आणि मुंबई उपनगरे सोडून बाकी सर्व महाराष्ट्रात १ जानेवारी २०११ पर्यंत सरकारी जागांवर अतिक्रमण करून ५०० वर्ग फूट पर्यंत बांधलेल्या घरांना विनामोबदला अधिकृत करून देणे तसेच ५०० ते १५०० वर्ग फूट पर्यंत बांधकाम असलेल्या घरांना प्रचलित रेडीरेकनरच्या फक्त १० टक्के रक्कम भरून आणि जर घराचा काही भाग व्यापारी कामासाठी वापरत असाल तर रेडीरेकनरच्या फक्त २५% रक्कम भरून ती बांधकामे अधिकृत केली जातील असा निर्णय घेतला. 


महाराष्ट्रातील लाखो गरिबांना हक्काचे घर असावे ह्या शुद्ध हेतूने असा निर्णय घेतला आहे असे म्हटले जाते. या मध्ये कोठेही दांडात्मक कारवाईचा मागमूस नाही. देवाभाऊंना क्लिनचिट भाऊ म्हणतात ते उगीच नाही. 


प्रथम म्हणजे गावोगावी लोकांनी जमिनी विकत घेऊन ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगर पालिका यांचे सर्व नियम पाळून केलेली सर्व नियमित बांधकामे, त्यासाठी तयार केलेले नकाशे आणि ते मंजूर करण्यासाठी कष्ट घेतलेले ( आणि कधी कधी केलेली लेन देन ) हे सर्व त्रास घेऊन करणारे प्रामाणिक नागरिक मूर्ख आहेत आणि जों सरकारी जागेवर अतिक्रमण करतो, जों घरासाठी कोणत्याही प्रकारचा नकाशा कोणत्याही सरकारी खात्याकडुन मंजूर करून घेत नाही, तो कायदा मोडणारा आणि कायद्याला धाब्यावर बसवणारा नागरिक हा काहीही खर्च न करता सरकारी म्हणजेच जनतेच्या पैशावर अधिकृत मालक होतो, ही नीती कुठली? जर कायद्यासमोर सर्व समान आहेत मग प्रामाणिक माणसांवर अन्याय का? 


बर ह्या जमिनी लिजवर देणार किंवा काय या बद्धल स्पस्टता नाही. कारण एकदा घर अधिकृत झाले म्हणजे त्या खालच्या जमिनी चीं नक्की स्थिती काय? त्याचा मालक कोण? आणि जर मालक सरकार असेल तर त्या मालकीला काही अर्थ आहे का? सरकारी जमीन फुकट किंवा रेडीरेकनर च्या फक्त १० % किंवा २५% मोबदला घेऊन विकण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला?


१ जानेवारी २०११ ही तारीख मुद्धाम घेतली आहे कारण १ जानेवारी २०२६ रोजी १५ वर्ष पूर्ण झाल्याने त्या घरात राहणारा मालक महाराष्ट्र निवासी ( डोमिसाईल ) होतो. म्हणजे कोणी परप्रांतीय जरी असेल तरी त्याला हाच लाभ मिळणार. 


वा रे देवाभाऊ. एका बाजूला अनधिकृत बांधकामे पाडण्याची भाषा बोलताना दुसऱ्या बाजूला ती अधिकृत करायचा निर्णयसुद्धा घेता. केजरीवालला हसता हसता आपण ही त्याच मार्गांवर जातं आहात. सरकारी मालमत्ता सरकारची राहायला हवी. 


आता लोक म्हणतील की नाहीतरी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत त्यांना काहीतरी मिळणारच होते. मग त्यांच्यावर काही दंड लावून तरी नियमित करा म्हणजे न्यायालयीन चाळणीमध्ये तरी सुटाल.


माधव भोळे 




Thursday, March 26, 2026

प्रा. सुरेश द्वादशिवार, एक अजब व्यक्तीमत्व !!

 प्रा. सुरेश द्वादशिवार, एक अजब व्यक्तीमत्व !!

काल आणीबाणी ह्या विषयावर प्रा. सुरेश द्वादाशिवार ह्या शिक्षित व्यक्तीचे आणीबाणीबद्दलचे विचार यु ट्यूब वर ऐकत होतो. सुरेश द्वादाशिवार हे लोकमत ह्या काँग्रेस धार्जीण्या प्रसिद्ध दैनिकाचे माजी संपादक आहेत. सुरेशराव हे उच्चशिक्षित परंतु एकांगी विचार करणारी व्यक्ती मी प्रथमच ऐकत होतो ( लिंक https://youtu.be/RaDIm-35oWo?si=JCXlIhUVmwVvPEIx )

त्या मध्ये त्यानी केलेली काही धक्कादायक विधाने खालील प्रमाणे,
A) सुरेशराव म्हणतात आणीबाणी वाईटच त्याचे मी समर्थन करीत नाही पण आणीबाणी लावण्यामागील कारणे सुद्धा समजून घ्यायला हवीत. प्रमुख कारण १९७३ मधील नवंनिर्माण आंदोलन त्याला जयप्रकाशचा पाठिंबा आणि जयप्रकाशाना नानाजी देशमुखचा ( पर्यायाने रा. स्व. संघाचा ) पाठिंबा,  डायनामाईट केस आणि अलाहाबाद हायकोर्टाचा इंदिरा गांधींच्या निवडणुकीबाबत निर्णय. हे सर्वश्रुत आहे की प्रत्यक्षात आणीबाणी घोषित होण्याचे मुख्य कारण की इंदिरा गांधींचे सत्तेला चिकटून राहणे.  ते म्हणतात इंदिराजी राजीनामा द्यायला तयार होत्या पण सुरेशराव आणीबाणीचा सर्व दोष सिद्धार्थ शंकर रे, सी सुब्रमणियम आणि इंदिरा गांधींच्या इतर सहकाऱ्यांना देतात. सुरेशराव सोयीस्कररित्या विसरतात की "राजा कालस्य कारणम" आणि सहकार्याच्या चुकीच्या विचारांना खतपाणी घालण्याव्हड्या एवढ्या इंदिराजी नक्कीच अबला नव्हत्या.

B)  सुरेशराव म्हणतात नानाजी देशमुख सारख्या अतिरेकी व्यक्तीचा जयप्रकाश नारायण यांच्या जनआंदोलनाला पाठिंबा होता. नानाजी देशमुख यांना अतिरेकी म्हणताना त्यांनी सांगितले की गांधींचा खून करण्यासाठी नथुराम गोडसेला नानाजी देशमुखानी पिस्तूल पुरवले. आणि नानाजी देशमुख गांधी खून खटल्यात ८ वे आरोपी होते.
सत्य असे आहे की गांधीजींच्या खुनासाठी वापरलेले पिस्तूल Beretta M1934 हे ग्वाल्हेरच्या आयुर्वेदिक डॉक्टर दत्तात्रय परचुरे यांनी पुरवले. पुढे डॉ. दत्तात्रय परचुरे यांना जन्मठेप झाली. गांधी खून खटल्यातील प्रमुख आरोपी १) नथुराम गोडसे ( फाशी ) २) नारायण आपटे ( फाशी ) ३) विष्णु करकरे ( जन्मठेप ) ४) मदनलाल पहावा ( जन्मठेप ) ५) शंकर किस्ताईया ( जन्मठेप, अपिलात सुटका ) ६) गोपाळ गोडसे ( जन्मठेप पुढे सुटका ) ७) विनायक दामोदर सावरकर ( पुराव्या अभावी निर्दोष सुटका ) ८) डॉ. दत्तात्रय परचुरे ( जन्मठेप, अपिलात सुटका ) ९) गंगाधर दंडवते ( फरार ) १०) गंगाधर जाधव ( फरार ) ११) सूर्यदेव शर्मा ( फरार ) १२) दिगंबर बागडे ( माफिचा साक्षीदार ). नानाजी देशमुख यांचे नांव गांधी खून खटल्यात आल्याचे कोणीच वाचले नाही, ह्यांनी कुठे वाचले ते माहिती नाही. हा जाणून बोजून पसरवत असलेला खोटा इतिहास.
C) सुरेशराव म्हणतात जरी इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली असली तरी इंदिरा गांधींचा स्वभाव मुळात हुकूमशाही नव्हता. हे पटवण्यासाठी उदाहरण देताना त्यांनी सांगितले की सिमला कराराच्या वेळी इंदिराजींनी भूत्तो ना दोन पर्याय दिले होते. एक ८०,००० सैनिक ताब्यात घ्या किंवा आम्ही जिंकलेला भुभाग ताब्यात घ्या. भूत्तोनी भुभाग मागितला आणि इंदिरा गांधींनी तो दिला आणि काही दिवसांनी सर्व सैनिक पण परत केले.

भूत्तो ना कोणी तरी विचारले की तुम्ही माणसे न मागता जमीन कशी परत मागितलीत? ते म्हणाले इंदिरा गांधी एक आई आहे ती सैनिकांशी वाईट वागणार नाही ही खात्री आहे. इंदिरा गांधींचे उदात्तीकरण करताना सुरेशराव म्हणाले इंदिरा गांधीकडे मातृत्व होते.

आमचे म्हणणे : असे xx लोक एखाद्या प्रसंगाचा आपल्याला सोयीस्कर अर्थ कसा लावतात याचेच आश्चर्य वाटते. आधी असा पर्याय भूत्तो यांना देणे हीच मुळात चूक होती. एका पर्याया प्रमाणे ८०,००० सैनिक सांभाळत बसलो असतो तर अंतरराष्ट्रीय नियमानुसार त्यांच्या जेवणखाणाचा प्रश्न, सुरक्षा इत्यादीच खर्च हा भारतावर बोजा होता उलट जमीन ताब्यात असती तर त्यातील उत्पन्न सुद्धा आपले झाले असते.

आपला फायदा होत असेल तर भूत्तोना इंदिरा गांधींना माता म्हणायला काय जात होते? त्यांनी जमीन पण घेतली आणि सैनिक पण घेतले. भारताला ह्या करारा फार काही फायदा झाला नाही.  भारताने ह्या करारातून १३,००० sq km एव्हडा भुभाग पाकिस्तानला परत केला आणि फक्त ८८३ sq km महत्वाचा भाग स्वतःकडे ठेवला. लाईन ऑफ कंट्रोल कायम झाली पण काश्मीर प्रश्नाचा कायम तोडगा मिळाला नाही. फक्त हा प्रश्न त्रयसस्थाच्या  मध्यस्थीशिवाय सोडवण्याचे आश्वासन मिळाले. बांगलादेश स्वतंत्र झाला एव्हडेच. गाजलेले स्टेट बँक ऑफ इंडिया रोखपाल मल्होत्रा प्रकरण किंवा ललित नारायण मिश्रा यांची हत्या या बद्दल सुरेशराव गप्प दिसले.

इंदिरा गांधी आणि नेहरू बद्दल आत्मीयता असायला हरकत नाही, आमची सुद्धा आहे, पण जे चूक ते चूकच आणि बरोबर ते बरोबर. इंदिरा गांधी माता होत्या पण त्या संजय गांधींच्या माता कारण तुर्कमान गेट मधील झालेल्या गोळीबाराबद्दल इंदिरागांधींनी काही प्रतिक्रिया दिलेली ऐकली नाही.

D)  सुरेशरावांचा सावरकर, रा. स्व. संघ यांचेवर विशेष राग आहे. त्यांचे मते हा एक उच्चवर्णीय, उच्च कुलोत्पन्न मंडळींचा ग्रुप आहे. महात्मा गांधींबद्दल दुसऱ्या एका व्हिडिओ मध्ये ते म्हणतात. सावरकरांचा प्रभाव असल्यामुळे महात्मा गांधी महाराष्ट्राला कळलेच नाहीत. महात्मा गांधीसारख्या महान नेत्याबद्दल ह्या उच्चभ्रू मंडळींना घृणा आहे. ते म्हणतात की दुर्दैव असे की महात्मा गांधींवर मराठी मध्ये एकही चरित्र नाही किंवा नथुराम गोडसेने महात्मा गांधींची हत्या का केली याचे निट वर्णन नाही. ती कशी केली याबद्दल लिहिले आहे पण का केली या बद्धल नाही.

सत्य : १) अवंतिकाबाई गोखले यांनी १९१८ साली महात्मा गांधीबद्दल पहिले चरित्र लिहिले. सुदैवाने त्या उच्च कुलीन होत्या.
२) वि. स. खांडेकर यांनी सुद्धा "दुसरा प्रॉमिथियस - महात्मा गांधी" हे पुस्तक मराठीत लिहिले आहे. प्रॉमिथियस म्हणजे:  मानवी कल्याणासाठी यातना सोसणारा. किंवा मानवअधिकारासाठी झगडणारा ग्रीक पौराणिक व्यक्ती.
३) महात्मा गांधी नक्कीच मोठे आणि जागतिक दर्जाचे भारतीय नेते होते आणि आणि त्यांच्याबद्दल मराठी लेखकांना विसर पडला ही गोष्ट काही प्रमाणात खरी आहे परंतु स्वतः गांधींचे "सत्याचे प्रयोग" हे अनुवादित आत्मचरित्र तसेच इतर भाषांमधून मराठीमध्ये गांधींवर अनुवादित खूप चरित्र प्रकाशित झाली आहेत. आणि हो  त्यांच्याबद्दल चरित्र लिहायला सुरेशरावांना कोणी थांबवले होते किंवा आहे?.

चरित्र आणि आत्मचरित्र मधील फरक हाच असतो की चरित्रामध्ये त्या व्यक्तीचे काटेकोर मूल्यमापन होते आणि ते निष्पक्ष असावे लागते. सुरेशरावांना स्वतःला खात्री नसावी की ते एखाद्या विषयांचे निष्पक्ष विवेचन करू शकतील.

आता राहिला प्रश्न गांधीजींची हत्या का झाली याची कारण मिमांसा मराठी लेखकांनी केलेली नाही असे ते म्हणतात. नथुराम गोडसे यांचे बंधू आणि गांधी खून खटल्यातील एक गुन्हेगार श्री गोपाळ गोडसे  यांनी लिहिलेले ५५ कोटींचे बळी हे पुस्तक तसेच  प्रदीप दळवी लिखित "मी नथुराम गोडसे बोलतोय" हे नाटक सुरेश रावांच्या प्रश्नांची उत्तरे देतात.

मी स्वतः गांधी हत्येचे समर्थन करीत नाही तसेच संघाला त्या विषयात जबाबदार धरीत नाही. परंतु सुरेशराव ज्या पद्धतीने इतिहास मांडतात तो चुकीचा आहे हे सांगण्यासाठी ही पोस्ट लिहिली आहे.

ऍड असीम सरोदे, कुमार सप्तर्षी सारख्या मंडळीच्या संगतीत असलेल्या विद्वान सुरेशरावांकडून आपण त्यांच्याकडुन आणखी काय अपेक्षा ठेवू शकता?

माधव भोळे

अधिकाराचे अतिक्रमण

 अधिकाराचे अतिक्रमण 


काल नीलमताई गोऱ्हे यांनी विधान परिषदेमधूनच "IPS ऑफिसर तुषार जोशी आणि इतर १०० पोलिसांचे निलंबन करावे" असा आदेश दिला, त्याच वेळी मला वाटले होते की जों गुन्हा विधानसभा किंवा त्याच्या आवारात घडलाच नाही त्यावर आणि दुसरी बाजू न ऐकता एकतर्फी फक्त आमदारांनी किंवा उपमुख्यमंत्री यांनी तक्रार केली म्हणून असा आदेश कसा दिला जाऊ शकतो आणि तो कायद्याने वैध आहे का? साताऱ्यात झाले ते अयोग्यच झाले पण म्हणून कोणीही आपल्या हातात कोणतेही अधिकार कसे घेऊ शकतो?


विधानसभा किंवा विधानपरिषद ह्यांच्या अध्यक्षाचा अधिकार फक्त आणि फक्त त्या आवारापुरता मर्यादित असतो असे मला वाटते. सरकार नावाची काही चीज आहे जे प्रशासन चालवते आणि त्या प्रशासनाच्या अधिकारात ढवळाढवळ करण्याचा अधिकार या मंडळीना कोणी दिला? जास्तीतजास्त ते चौकशी करून वस्तुस्थिती सभागृहापुढे मांडण्याचा आदेश सरकारला देऊ शकतात एव्हडेच. सरकारला अमुक करायलाच लावणे असे ते करू शकत नाहीत. 


काल मुख्यमंत्री फडणवीसांनी शेवटी तेच सांगितले की "legislature cannot assume the executive's role, asserting that while the legislature can issue directives, only the government can act on them after verifying facts. Addressing the legislative council, he clarified that presiding officers cannot directly issue suspension orders for officials involved in incidents outside the house." 


म्हणजे आमचा संविधानाचा अभ्यास काही प्रमाणात का होईना बरोबर आहे असे वाटते. शिक्षित किंवा कायद्याने शिक्षित मुख्यमंत्री कसा काम करू शकतो याचा एक नमुना. 


माधव भोळे 

न्यायालयीन अतिरेक??

 न्यायालयीन अतिरेक??


नुकतेच राज्यसभेमध्ये शिवसेना उबाठाच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयाची माहिती देत आपली खंत व्यक्त केली. 

त्या म्हणाल्या की NCERT ने आपल्या ८ वि च्या पुस्तकामध्ये न्यायालयीन प्रक्रियेमध्ये होणाऱ्या तथाकथित भ्रस्टाचाराबद्दल धडा घातल्यामुळे सुप्रीम कोर्टाने तो आपला अवमान समजून त्या पुस्तकावर बंदी घालणारा किंवा तो धडा अभ्यासक्रमातून वगळून टाकावा तसेच ज्या व्यक्तींनी ( प्रोफेसर मायकेल डॅनिनो, सुपर्णा दिवाकर, आणि विधी अभ्यासक अलोक प्रसन्न कुमार ) हा धडा लिहिला आहे त्या तीन व्यक्तींना जेथे जेथे सरकारी किंवा सार्वजनिक पैसा वापरला जातो त्या त्या ठिकाणी कार्य करण्यासाठी त्यांच्यावर आजन्म बंदी घालावी असा आदेश दिला आहे.


प्रियांका चतुर्वेदी म्हणतात जर राजकारणी, पोलीस आणि प्रशासन, भ्रस्टाचाराच्या छाननी मधून वगळले जाऊ शकत नाहीत तर न्यायालयाने या विषयात एव्हडे संवेदनशील होण्याचे काय कारण आहे की एखादा धडा अयोग्य म्हणून त्या व्यक्तींवर अशा प्रकारची बंदी लादली जावी. धड्यात सुधारणा करावी येथपर्यंत आदेश ठीक आहे पण त्या व्यक्तींवर बंदी घालणे हा अतिरेक आहे. टिकेला अशा प्रकारे दाबणे हे लोकशाही मूल्यांना धोकादायक आहे आणि त्यांच्यामते ही न्यायालयीन हुकूमशाही आहे. विधीमंडळ, प्रशासन आणि न्यायालये ह्या देशाच्या संविधानाच्या तिन्ही शाखानी जबाबदारीने काम करणे संविधानाला अपेक्षित आहे. 


अशाच प्रकारचे सुर,  देशभरात उमटत असून तामिळनाडू मधील एक कायद्याचा विद्यार्थी ऋषी ए. कुमार यांनी हीच भावना आपल्या ब्लॉग मधून व्यक्त केली. जेव्हा सुप्रीम कोर्टाचा मान राखण्यासाठी त्याच्या विद्यापीठाने ही पोस्ट त्याला डिलीट करायला सांगितले तेव्हा त्याने स्पस्ट नकार दिला. तो म्हणतो की माझे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित आहे. आणि खरे बोलण्याचा आणि तथ्यावर आधारित टीका करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. न्यायालय सुद्धा माणसांनीच भरले असून तेथील भ्रस्टाचाराची माहिती सर्वत्र सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध आहे त्यामुळे न्यायालयाना देवत्व बहाल करणे आता थांबवले पाहिजे. त्याने आपला ब्लॉग डिलीट करण्यास नकार दिला असून तो आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्याला तेथील सध्य आणि माजी विध्यार्थ्यांकडून पाठिंबा आहे. त्यांच्या विद्यापीठाने त्याच्यावर कोणतीही कडक कारवाई केली नाही कारण ही पोस्ट त्याने त्याच्या वैयक्तिक भूमिकेतून केली आहे असे विद्यापीठाचे म्हणणे आहे.


ज्या देशामध्ये इंग्रज्यांच्या राज्यात "ईथे जरी मी गुन्हेगार असलो तरी ज्या कारणासाठी मी लढलो त्यासाठी मी वरच्या न्यायालयात निर्दोष सुटेन " असे लोकमान्य टिळकांना म्हणायची वेळ आली तशी वेळ स्वतंत्र भारतात तरी कुणाला येता कामां नये असे वाटते.


संत कबीर म्हणतात "निंदक नियरे राखिये, ऑंगन कुटी छवाय, बिन पानी, साबुन बिना, निरमल करे सुभ".

अर्थ: आपल्या निंदकाला (टीका करणाऱ्याला) नेहमी आपल्या जवळ (अंगणात कुटी बांधून) ठेवावे. कारण तो साबण आणि पाण्याशिवाय आपल्या स्वभावाला निर्मळ (शुद्ध) करतो.


लोक म्हणतात धर्माला चिकित्सा नाही, धर्मावर श्रद्धा असणे आवश्यक आहे. तसेच सुप्रीम कोर्टावर आणि न्यायालयांवर जनतेची श्रद्धा आणि विश्वास आहे. पण त्याचे परिवर्तन अंधश्रद्धेत होता कामां नये. प्रत्येक न्याय निवाडा आणि न्याय प्रक्रिया तथ्यावर आधारित होणे आवश्यक आहे मग हेच तत्व स्वतःच्या बाबतीत सुद्धा लागू असयला हवे असे वाटणे स्वाभाविक आहे.जेथे अहंकार निर्माण झाला तेथे विचार थांबला. एकदा विचार करायचा संपला की प्रगती थांबली.


आशा करूया की सुप्रीम कोर्ट ह्या विषयात जरूर फेरविचार करेल आणि योग्य ते मार्गदर्शन देशाला करेल.


माधव भोळे

Sunday, March 15, 2026

उजव्या सोंडेचा गणपती!!

 उजव्या सोंडेचा गणपती!!


आज एका प्रसिद्ध जाणकार गणेश मूर्तिकारांने उजव्या सोंडेच्या गणपतीच्या मूर्तीचा फोटो असलेली पोस्ट फेसबुकवर टाकली. त्यावर एका नेटकऱ्याने "कशाला आम्हाला पापाचे धनी बनवता. कृपया उजव्या सोंडेचा गणपती असलेल्या गणपतीचा व्यवसाय करू नका. अशी पोस्ट टाकली.


मी बरेच वर्ष ऐकत आलो आहे की उजव्या सोंडेचा गणपतीचे सोवळे ओवळे कडक असते. जरा चूक झाली तर गणपती क्रोध पावतो. घरात अनर्थ होतो वगैरे वगैरे.!!


आता त्याचा शास्त्रीय अर्थ समजावून घेऊया. श्री गणपतीच्या दोन पत्नी आहेत त्यांचे नांव आहे रिद्धी आणि सिद्धी. रिद्धी गणेशाच्या डाव्या बाजूला उभी किंवा डाव्या मांडीवर बसलेली असते तर सिद्धी उजव्या बाजूला किंवा उजव्या मांडीवर बसलेली असते. रिद्धी ऐहिक सुख पैसा, धन, धान्य समृद्धी ह्यांची देवता आहे तर सिद्धी बुद्धिमत्ता, ज्ञान, अध्यात्मिक सुख, मोक्ष प्राप्ती यांची देवता आहे.


डाव्या सोंडेचा म्हणजेच रिद्धीकडे सोंड असलेला गणपती ऐहिक सुख,पैसा, धन धान्य समृद्धी ह्यामध्ये भरभराट व्हावी म्हणून पूजला जातो तर उजव्या सोंडेचा म्हणजेच सिद्धीकडे सोंड असलेला गणपती बुद्धिमत्ता, ज्ञान, अध्यात्मिक सुख, सकारात्मक ऊर्जा, मोक्ष प्राप्ती व्हावी या कारणासाठी पूजला जातो. उजव्या सोंडेच्या गणपतीला सिद्धिविनायक म्हणतात तर डाव्या सोंडेच्या गणपतीला रिद्धीविनायक असे म्हणतात.उजव्या सोंडेचा गणपती जास्त ताकदवान मानला गेला आहे. 


म्हणूनच डाव्या सोंडेचा गणपतीचे पूजन घर आणि कार्यालये, कारखाने, गोडाऊन मध्ये केले जाते तर उजव्या सोंडेचा गणपती मंदिर, मठ, आश्रम, साधू संत यांची निवासस्थाने ह्या ठिकाणी पूजला जातो. सहाजिकच अशा ठिकाणी मांसाहार वर्ज्य असतो, सुचिरभूतपणावर जास्त भर दिला जातो ज्याला आपण सोवळे ओवळे असे नांव दिले आहे.


अर्थात ह्याला श्रद्धा म्हणा कीवा अंध श्रद्धा म्हणा. पण जर ईश्वर किंवा देव ह्यावर श्रद्धा असेल तर देव आपले कधी वाईट करेल का? मग तो कसाही असो, उजव्या सोंडेचा असो की डाव्या सोंडेचा असो. ईश्वर किंवा देव ही संकल्पनाच मुळी मानवाच्या कल्याणासाठी तयार झालेली आहे. जर देवामुळे काही नुकसान होणार असेल तर लोकानी त्याला देव का मानावे? जे काही बरे वाईट असेल ते आपल्या प्रारबद्धात असेल तसेच घडते आणि घडणार. मग त्यासाठी देवाला दोष का द्यावा? अनेकवेळा त्याचा संबंध आपल्या या जन्मीच्या किंवा गेल्या जन्मीच्या कर्माशी किंवा पुण्याईशी लावला जातो पण तो एक वेगळा चर्चेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. 


त्यामुळे कोणताही गणपती तुमच्यासाठी कोणतेही संकट ओढून आणत नाही किंवा त्याला पूजल्याने पाप घडते किंवा तो पूजत असताना रीती रिवाजात एखादी चूक झाली तर अनर्थ ओढवतो हे म्हणणे म्हणजे निव्वळ भीती दाखवणे किंवा धर्मापासून भीती तयार करणे होय. लोकांनी चांगले वागावे ह्यासाठी धर्म आहे. त्यांना घाबरवण्यासाठी धर्म नाही. 


माधव भोळे 



Saturday, March 14, 2026

UPSC - IAS, IPS, IRS, IFS exams.

 UPSC - IAS, IPS, IRS, IFS exams.


नुकताच UPSC मेन्सचा निकाल लागला. अनुज अग्निहोत्री हा राजस्थान मधील मुलगा जोधपूर एम्स मधून MBBS झाल्यानंतर UPSC परीक्षेत देशात पहिला आला. या वेळचा निकाल बघिता वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक स्तरातील मुलांना चांगले रँक मिळून पास होऊन त्यांचे IAS किंवा तत्सम होण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. वेगवेगळ्या शैक्षणिक पार्श्वभूमी असलेली मंडळी UPSC साठी आपले प्रयत्न नेटाने करून आपला मार्ग चोखाळत आहेत. UPSC परीक्षेमध्ये या सर्वांच्या बुद्धीमत्तेचा, ज्ञानाचा, निर्णयक्षमतेचा आणि प्रसंगावधानाचा कस लागत आहे. परीक्षा निश्चितच भारतातील सर्वोतकष्ट आहे. 


परंतु एक गोष्ट त्यामध्ये तपासली जाऊ शकत नाही. ती म्हणजे देशप्रेम, माणुसकी, निर्भीड आणि निर्भयपणा. भारतात सरकारी नोकरीं साठी IAS किंवा तत्सम ही सर्वोच्च डिग्री असून देशाच्या प्रशासनात त्या IAS वर्गाचा मोठा सहभाग आहे. त्यांनी घेतलेल्या योग्य निर्णयाना सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह त्रिबूनल ( CAT ) आणि डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग ( DoPt) अश्या दोन ऑथॉरिटी कडुन पाठिंबा असतो, असे असताना अनेक IAS ऑफिसर व्यक्तिगत स्वार्थासाठी, राजकीय दबावापोटी, प्रलोभन किंवा quid pro quo निर्णय घेताना दिसतात अशा वेळी जनतेचे आणि पर्यायाने देशाचे हित खुन्टीवर टांगले जाते.


नुकतेच योगेश सागर ह्या भाजप आमदाराने भर विधानसभेत BMC मधील भ्रष्ट IAS अधिकारी रोड कॉन्ट्रॅक्टर आणि सेवा पुरवठेदारांना खोटी कागदपत्र तयार करून कसे झुकते माप देतात याचे उदाहरण देत BMC मधील भ्रष्टाचाराची SIT चौकशीची मागणी केली. विशेष म्हणजे संपूर्ण जग डबल एंट्री अकाउंटिंग करत असताना BMC मध्ये वर्षानुवर्षे भ्रष्टाचाराला वाव  देणारे सिंगल एंट्री अकॉउंटिंग चालते ते बदलण्याची हिंमत कोणत्याही कमिशनरने केली नाही. वर्षानुवर्षे मिठी नदी आणि इतर नाल्यामधील गाळ काढतना झालेला भ्रष्टाचार दरवर्षी पेपर आणि राजकीय सभा मध्ये चर्चीला जातो पण तेथेही हे IAS असलेले कमिशनर मूग गिळून बसतात. या उलट कोर्टाची ऑर्डर आली म्हणत गल्ली बोळातील गरीब फेरीवाल्याना अचानक धाड घालत त्यांचा माल जप्त करीत त्यांना नुकसान पोहोचवण्यात BMC धन्यता मानते. अनधिकृत बांधकामे तोडताना आपल्या पक्षाची किंवा हितसंबंधित वरिष्टांची बांधकामे सुरक्षित केली जातात. अतिक्रमण केलेले सरकारी प्लॉट जास्त किंमत देऊन विकत घेतले जातात. 


मग अशा IAS ऑफिसरच्या बुद्धिमत्तेचा देशाला आणि जनतेला काय उपयोग?. सर्वच IAS ऑफिसर भ्रस्टाचारी असतात असे माझे म्हणणे नाही.  या उलट तुकाराम मुंडे सारखे कर्तव्य दक्ष अधिकारी कायद्यात राहून आपले कर्तव्य पार पडत असताना त्यांची वारंवार बदली केली जाते. IAS पास होणे म्हणजे एक गुबगुबीत गादी असलेली मानाची खुर्ची, बंगला, गाडी, नोकरचाकर असलेल्या एका प्रशासकीय पिंजऱ्यात बंदिस्त होणे आणि त्या सिस्टीमचे तुम्ही नकळत गुलाम होता. ज्याला हा पिंजरा पसंत नाही किंवा जों तो तोडायला बघतो त्याला वेगवेगळ्या प्रकारे अध्यरुत शिक्षा केली जाते.


देशसेवेसाठी IAS बनून प्रशासकीय सेवेत जाणारे थोडेच असतात. बाकी सर्व आपापल्या विशिष्ठ उदिष्टाने  येथे येत असतात. 


UPSC विद्यार्थ्यांची निवड करताना ह्या गोष्टी कशा बघितल्या जातील याचा सुद्धा विचार करायला हवा. UPSC ची निवड प्रक्रिया अजून सखोल करायला हवी म्हणजे उडीदा माजी काळे गोरे असतील तर त्यातले निदान खडे तरी निघून जावेत.


माधव भोळे