Thursday, March 26, 2026

प्रा. सुरेश द्वादशिवार, एक अजब व्यक्तीमत्व !!

 प्रा. सुरेश द्वादशिवार, एक अजब व्यक्तीमत्व !!

काल आणीबाणी ह्या विषयावर प्रा. सुरेश द्वादाशिवार ह्या शिक्षित व्यक्तीचे आणीबाणीबद्दलचे विचार यु ट्यूब वर ऐकत होतो. सुरेश द्वादाशिवार हे लोकमत ह्या काँग्रेस धार्जीण्या प्रसिद्ध दैनिकाचे माजी संपादक आहेत. सुरेशराव हे उच्चशिक्षित परंतु एकांगी विचार करणारी व्यक्ती मी प्रथमच ऐकत होतो ( लिंक https://youtu.be/RaDIm-35oWo?si=JCXlIhUVmwVvPEIx )

त्या मध्ये त्यानी केलेली काही धक्कादायक विधाने खालील प्रमाणे,
A) सुरेशराव म्हणतात आणीबाणी वाईटच त्याचे मी समर्थन करीत नाही पण आणीबाणी लावण्यामागील कारणे सुद्धा समजून घ्यायला हवीत. प्रमुख कारण १९७३ मधील नवंनिर्माण आंदोलन त्याला जयप्रकाशचा पाठिंबा आणि जयप्रकाशाना नानाजी देशमुखचा ( पर्यायाने रा. स्व. संघाचा ) पाठिंबा,  डायनामाईट केस आणि अलाहाबाद हायकोर्टाचा इंदिरा गांधींच्या निवडणुकीबाबत निर्णय. हे सर्वश्रुत आहे की प्रत्यक्षात आणीबाणी घोषित होण्याचे मुख्य कारण की इंदिरा गांधींचे सत्तेला चिकटून राहणे.  ते म्हणतात इंदिराजी राजीनामा द्यायला तयार होत्या पण सुरेशराव आणीबाणीचा सर्व दोष सिद्धार्थ शंकर रे, सी सुब्रमणियम आणि इंदिरा गांधींच्या इतर सहकाऱ्यांना देतात. सुरेशराव सोयीस्कररित्या विसरतात की "राजा कालस्य कारणम" आणि सहकार्याच्या चुकीच्या विचारांना खतपाणी घालण्याव्हड्या एवढ्या इंदिराजी नक्कीच अबला नव्हत्या.

B)  सुरेशराव म्हणतात नानाजी देशमुख सारख्या अतिरेकी व्यक्तीचा जयप्रकाश नारायण यांच्या जनआंदोलनाला पाठिंबा होता. नानाजी देशमुख यांना अतिरेकी म्हणताना त्यांनी सांगितले की गांधींचा खून करण्यासाठी नथुराम गोडसेला नानाजी देशमुखानी पिस्तूल पुरवले. आणि नानाजी देशमुख गांधी खून खटल्यात ८ वे आरोपी होते.
सत्य असे आहे की गांधीजींच्या खुनासाठी वापरलेले पिस्तूल Beretta M1934 हे ग्वाल्हेरच्या आयुर्वेदिक डॉक्टर दत्तात्रय परचुरे यांनी पुरवले. पुढे डॉ. दत्तात्रय परचुरे यांना जन्मठेप झाली. गांधी खून खटल्यातील प्रमुख आरोपी १) नथुराम गोडसे ( फाशी ) २) नारायण आपटे ( फाशी ) ३) विष्णु करकरे ( जन्मठेप ) ४) मदनलाल पहावा ( जन्मठेप ) ५) शंकर किस्ताईया ( जन्मठेप, अपिलात सुटका ) ६) गोपाळ गोडसे ( जन्मठेप पुढे सुटका ) ७) विनायक दामोदर सावरकर ( पुराव्या अभावी निर्दोष सुटका ) ८) डॉ. दत्तात्रय परचुरे ( जन्मठेप, अपिलात सुटका ) ९) गंगाधर दंडवते ( फरार ) १०) गंगाधर जाधव ( फरार ) ११) सूर्यदेव शर्मा ( फरार ) १२) दिगंबर बागडे ( माफिचा साक्षीदार ). नानाजी देशमुख यांचे नांव गांधी खून खटल्यात आल्याचे कोणीच वाचले नाही, ह्यांनी कुठे वाचले ते माहिती नाही. हा जाणून बोजून पसरवत असलेला खोटा इतिहास.
C) सुरेशराव म्हणतात जरी इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली असली तरी इंदिरा गांधींचा स्वभाव मुळात हुकूमशाही नव्हता. हे पटवण्यासाठी उदाहरण देताना त्यांनी सांगितले की सिमला कराराच्या वेळी इंदिराजींनी भूत्तो ना दोन पर्याय दिले होते. एक ८०,००० सैनिक ताब्यात घ्या किंवा आम्ही जिंकलेला भुभाग ताब्यात घ्या. भूत्तोनी भुभाग मागितला आणि इंदिरा गांधींनी तो दिला आणि काही दिवसांनी सर्व सैनिक पण परत केले.

भूत्तो ना कोणी तरी विचारले की तुम्ही माणसे न मागता जमीन कशी परत मागितलीत? ते म्हणाले इंदिरा गांधी एक आई आहे ती सैनिकांशी वाईट वागणार नाही ही खात्री आहे. इंदिरा गांधींचे उदात्तीकरण करताना सुरेशराव म्हणाले इंदिरा गांधीकडे मातृत्व होते.

आमचे म्हणणे : असे xx लोक एखाद्या प्रसंगाचा आपल्याला सोयीस्कर अर्थ कसा लावतात याचेच आश्चर्य वाटते. आधी असा पर्याय भूत्तो यांना देणे हीच मुळात चूक होती. एका पर्याया प्रमाणे ८०,००० सैनिक सांभाळत बसलो असतो तर अंतरराष्ट्रीय नियमानुसार त्यांच्या जेवणखाणाचा प्रश्न, सुरक्षा इत्यादीच खर्च हा भारतावर बोजा होता उलट जमीन ताब्यात असती तर त्यातील उत्पन्न सुद्धा आपले झाले असते.

आपला फायदा होत असेल तर भूत्तोना इंदिरा गांधींना माता म्हणायला काय जात होते? त्यांनी जमीन पण घेतली आणि सैनिक पण घेतले. भारताला ह्या करारा फार काही फायदा झाला नाही.  भारताने ह्या करारातून १३,००० sq km एव्हडा भुभाग पाकिस्तानला परत केला आणि फक्त ८८३ sq km महत्वाचा भाग स्वतःकडे ठेवला. लाईन ऑफ कंट्रोल कायम झाली पण काश्मीर प्रश्नाचा कायम तोडगा मिळाला नाही. फक्त हा प्रश्न त्रयसस्थाच्या  मध्यस्थीशिवाय सोडवण्याचे आश्वासन मिळाले. बांगलादेश स्वतंत्र झाला एव्हडेच. गाजलेले स्टेट बँक ऑफ इंडिया रोखपाल मल्होत्रा प्रकरण किंवा ललित नारायण मिश्रा यांची हत्या या बद्दल सुरेशराव गप्प दिसले.

इंदिरा गांधी आणि नेहरू बद्दल आत्मीयता असायला हरकत नाही, आमची सुद्धा आहे, पण जे चूक ते चूकच आणि बरोबर ते बरोबर. इंदिरा गांधी माता होत्या पण त्या संजय गांधींच्या माता कारण तुर्कमान गेट मधील झालेल्या गोळीबाराबद्दल इंदिरागांधींनी काही प्रतिक्रिया दिलेली ऐकली नाही.

D)  सुरेशरावांचा सावरकर, रा. स्व. संघ यांचेवर विशेष राग आहे. त्यांचे मते हा एक उच्चवर्णीय, उच्च कुलोत्पन्न मंडळींचा ग्रुप आहे. महात्मा गांधींबद्दल दुसऱ्या एका व्हिडिओ मध्ये ते म्हणतात. सावरकरांचा प्रभाव असल्यामुळे महात्मा गांधी महाराष्ट्राला कळलेच नाहीत. महात्मा गांधीसारख्या महान नेत्याबद्दल ह्या उच्चभ्रू मंडळींना घृणा आहे. ते म्हणतात की दुर्दैव असे की महात्मा गांधींवर मराठी मध्ये एकही चरित्र नाही किंवा नथुराम गोडसेने महात्मा गांधींची हत्या का केली याचे निट वर्णन नाही. ती कशी केली याबद्दल लिहिले आहे पण का केली या बद्धल नाही.

सत्य : १) अवंतिकाबाई गोखले यांनी १९१८ साली महात्मा गांधीबद्दल पहिले चरित्र लिहिले. सुदैवाने त्या उच्च कुलीन होत्या.
२) वि. स. खांडेकर यांनी सुद्धा "दुसरा प्रॉमिथियस - महात्मा गांधी" हे पुस्तक मराठीत लिहिले आहे. प्रॉमिथियस म्हणजे:  मानवी कल्याणासाठी यातना सोसणारा. किंवा मानवअधिकारासाठी झगडणारा ग्रीक पौराणिक व्यक्ती.
३) महात्मा गांधी नक्कीच मोठे आणि जागतिक दर्जाचे भारतीय नेते होते आणि आणि त्यांच्याबद्दल मराठी लेखकांना विसर पडला ही गोष्ट काही प्रमाणात खरी आहे परंतु स्वतः गांधींचे "सत्याचे प्रयोग" हे अनुवादित आत्मचरित्र तसेच इतर भाषांमधून मराठीमध्ये गांधींवर अनुवादित खूप चरित्र प्रकाशित झाली आहेत. आणि हो  त्यांच्याबद्दल चरित्र लिहायला सुरेशरावांना कोणी थांबवले होते किंवा आहे?.

चरित्र आणि आत्मचरित्र मधील फरक हाच असतो की चरित्रामध्ये त्या व्यक्तीचे काटेकोर मूल्यमापन होते आणि ते निष्पक्ष असावे लागते. सुरेशरावांना स्वतःला खात्री नसावी की ते एखाद्या विषयांचे निष्पक्ष विवेचन करू शकतील.

आता राहिला प्रश्न गांधीजींची हत्या का झाली याची कारण मिमांसा मराठी लेखकांनी केलेली नाही असे ते म्हणतात. नथुराम गोडसे यांचे बंधू आणि गांधी खून खटल्यातील एक गुन्हेगार श्री गोपाळ गोडसे  यांनी लिहिलेले ५५ कोटींचे बळी हे पुस्तक तसेच  प्रदीप दळवी लिखित "मी नथुराम गोडसे बोलतोय" हे नाटक सुरेश रावांच्या प्रश्नांची उत्तरे देतात.

मी स्वतः गांधी हत्येचे समर्थन करीत नाही तसेच संघाला त्या विषयात जबाबदार धरीत नाही. परंतु सुरेशराव ज्या पद्धतीने इतिहास मांडतात तो चुकीचा आहे हे सांगण्यासाठी ही पोस्ट लिहिली आहे.

ऍड असीम सरोदे, कुमार सप्तर्षी सारख्या मंडळीच्या संगतीत असलेल्या विद्वान सुरेशरावांकडून आपण त्यांच्याकडुन आणखी काय अपेक्षा ठेवू शकता?

माधव भोळे

अधिकाराचे अतिक्रमण

 अधिकाराचे अतिक्रमण 


काल नीलमताई गोऱ्हे यांनी विधान परिषदेमधूनच "IPS ऑफिसर तुषार जोशी आणि इतर १०० पोलिसांचे निलंबन करावे" असा आदेश दिला, त्याच वेळी मला वाटले होते की जों गुन्हा विधानसभा किंवा त्याच्या आवारात घडलाच नाही त्यावर आणि दुसरी बाजू न ऐकता एकतर्फी फक्त आमदारांनी किंवा उपमुख्यमंत्री यांनी तक्रार केली म्हणून असा आदेश कसा दिला जाऊ शकतो आणि तो कायद्याने वैध आहे का? साताऱ्यात झाले ते अयोग्यच झाले पण म्हणून कोणीही आपल्या हातात कोणतेही अधिकार कसे घेऊ शकतो?


विधानसभा किंवा विधानपरिषद ह्यांच्या अध्यक्षाचा अधिकार फक्त आणि फक्त त्या आवारापुरता मर्यादित असतो असे मला वाटते. सरकार नावाची काही चीज आहे जे प्रशासन चालवते आणि त्या प्रशासनाच्या अधिकारात ढवळाढवळ करण्याचा अधिकार या मंडळीना कोणी दिला? जास्तीतजास्त ते चौकशी करून वस्तुस्थिती सभागृहापुढे मांडण्याचा आदेश सरकारला देऊ शकतात एव्हडेच. सरकारला अमुक करायलाच लावणे असे ते करू शकत नाहीत. 


काल मुख्यमंत्री फडणवीसांनी शेवटी तेच सांगितले की "legislature cannot assume the executive's role, asserting that while the legislature can issue directives, only the government can act on them after verifying facts. Addressing the legislative council, he clarified that presiding officers cannot directly issue suspension orders for officials involved in incidents outside the house." 


म्हणजे आमचा संविधानाचा अभ्यास काही प्रमाणात का होईना बरोबर आहे असे वाटते. शिक्षित किंवा कायद्याने शिक्षित मुख्यमंत्री कसा काम करू शकतो याचा एक नमुना. 


माधव भोळे 

न्यायालयीन अतिरेक??

 न्यायालयीन अतिरेक??


नुकतेच राज्यसभेमध्ये शिवसेना उबाठाच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयाची माहिती देत आपली खंत व्यक्त केली. 

त्या म्हणाल्या की NCERT ने आपल्या ८ वि च्या पुस्तकामध्ये न्यायालयीन प्रक्रियेमध्ये होणाऱ्या तथाकथित भ्रस्टाचाराबद्दल धडा घातल्यामुळे सुप्रीम कोर्टाने तो आपला अवमान समजून त्या पुस्तकावर बंदी घालणारा किंवा तो धडा अभ्यासक्रमातून वगळून टाकावा तसेच ज्या व्यक्तींनी ( प्रोफेसर मायकेल डॅनिनो, सुपर्णा दिवाकर, आणि विधी अभ्यासक अलोक प्रसन्न कुमार ) हा धडा लिहिला आहे त्या तीन व्यक्तींना जेथे जेथे सरकारी किंवा सार्वजनिक पैसा वापरला जातो त्या त्या ठिकाणी कार्य करण्यासाठी त्यांच्यावर आजन्म बंदी घालावी असा आदेश दिला आहे.


प्रियांका चतुर्वेदी म्हणतात जर राजकारणी, पोलीस आणि प्रशासन, भ्रस्टाचाराच्या छाननी मधून वगळले जाऊ शकत नाहीत तर न्यायालयाने या विषयात एव्हडे संवेदनशील होण्याचे काय कारण आहे की एखादा धडा अयोग्य म्हणून त्या व्यक्तींवर अशा प्रकारची बंदी लादली जावी. धड्यात सुधारणा करावी येथपर्यंत आदेश ठीक आहे पण त्या व्यक्तींवर बंदी घालणे हा अतिरेक आहे. टिकेला अशा प्रकारे दाबणे हे लोकशाही मूल्यांना धोकादायक आहे आणि त्यांच्यामते ही न्यायालयीन हुकूमशाही आहे. विधीमंडळ, प्रशासन आणि न्यायालये ह्या देशाच्या संविधानाच्या तिन्ही शाखानी जबाबदारीने काम करणे संविधानाला अपेक्षित आहे. 


अशाच प्रकारचे सुर,  देशभरात उमटत असून तामिळनाडू मधील एक कायद्याचा विद्यार्थी ऋषी ए. कुमार यांनी हीच भावना आपल्या ब्लॉग मधून व्यक्त केली. जेव्हा सुप्रीम कोर्टाचा मान राखण्यासाठी त्याच्या विद्यापीठाने ही पोस्ट त्याला डिलीट करायला सांगितले तेव्हा त्याने स्पस्ट नकार दिला. तो म्हणतो की माझे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित आहे. आणि खरे बोलण्याचा आणि तथ्यावर आधारित टीका करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. न्यायालय सुद्धा माणसांनीच भरले असून तेथील भ्रस्टाचाराची माहिती सर्वत्र सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध आहे त्यामुळे न्यायालयाना देवत्व बहाल करणे आता थांबवले पाहिजे. त्याने आपला ब्लॉग डिलीट करण्यास नकार दिला असून तो आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्याला तेथील सध्य आणि माजी विध्यार्थ्यांकडून पाठिंबा आहे. त्यांच्या विद्यापीठाने त्याच्यावर कोणतीही कडक कारवाई केली नाही कारण ही पोस्ट त्याने त्याच्या वैयक्तिक भूमिकेतून केली आहे असे विद्यापीठाचे म्हणणे आहे.


ज्या देशामध्ये इंग्रज्यांच्या राज्यात "ईथे जरी मी गुन्हेगार असलो तरी ज्या कारणासाठी मी लढलो त्यासाठी मी वरच्या न्यायालयात निर्दोष सुटेन " असे लोकमान्य टिळकांना म्हणायची वेळ आली तशी वेळ स्वतंत्र भारतात तरी कुणाला येता कामां नये असे वाटते.


संत कबीर म्हणतात "निंदक नियरे राखिये, ऑंगन कुटी छवाय, बिन पानी, साबुन बिना, निरमल करे सुभ".

अर्थ: आपल्या निंदकाला (टीका करणाऱ्याला) नेहमी आपल्या जवळ (अंगणात कुटी बांधून) ठेवावे. कारण तो साबण आणि पाण्याशिवाय आपल्या स्वभावाला निर्मळ (शुद्ध) करतो.


लोक म्हणतात धर्माला चिकित्सा नाही, धर्मावर श्रद्धा असणे आवश्यक आहे. तसेच सुप्रीम कोर्टावर आणि न्यायालयांवर जनतेची श्रद्धा आणि विश्वास आहे. पण त्याचे परिवर्तन अंधश्रद्धेत होता कामां नये. प्रत्येक न्याय निवाडा आणि न्याय प्रक्रिया तथ्यावर आधारित होणे आवश्यक आहे मग हेच तत्व स्वतःच्या बाबतीत सुद्धा लागू असयला हवे असे वाटणे स्वाभाविक आहे.जेथे अहंकार निर्माण झाला तेथे विचार थांबला. एकदा विचार करायचा संपला की प्रगती थांबली.


आशा करूया की सुप्रीम कोर्ट ह्या विषयात जरूर फेरविचार करेल आणि योग्य ते मार्गदर्शन देशाला करेल.


माधव भोळे

Sunday, March 15, 2026

उजव्या सोंडेचा गणपती!!

 उजव्या सोंडेचा गणपती!!


आज एका प्रसिद्ध जाणकार गणेश मूर्तिकारांने उजव्या सोंडेच्या गणपतीच्या मूर्तीचा फोटो असलेली पोस्ट फेसबुकवर टाकली. त्यावर एका नेटकऱ्याने "कशाला आम्हाला पापाचे धनी बनवता. कृपया उजव्या सोंडेचा गणपती असलेल्या गणपतीचा व्यवसाय करू नका. अशी पोस्ट टाकली.


मी बरेच वर्ष ऐकत आलो आहे की उजव्या सोंडेचा गणपतीचे सोवळे ओवळे कडक असते. जरा चूक झाली तर गणपती क्रोध पावतो. घरात अनर्थ होतो वगैरे वगैरे.!!


आता त्याचा शास्त्रीय अर्थ समजावून घेऊया. श्री गणपतीच्या दोन पत्नी आहेत त्यांचे नांव आहे रिद्धी आणि सिद्धी. रिद्धी गणेशाच्या डाव्या बाजूला उभी किंवा डाव्या मांडीवर बसलेली असते तर सिद्धी उजव्या बाजूला किंवा उजव्या मांडीवर बसलेली असते. रिद्धी ऐहिक सुख पैसा, धन, धान्य समृद्धी ह्यांची देवता आहे तर सिद्धी बुद्धिमत्ता, ज्ञान, अध्यात्मिक सुख, मोक्ष प्राप्ती यांची देवता आहे.


डाव्या सोंडेचा म्हणजेच रिद्धीकडे सोंड असलेला गणपती ऐहिक सुख,पैसा, धन धान्य समृद्धी ह्यामध्ये भरभराट व्हावी म्हणून पूजला जातो तर उजव्या सोंडेचा म्हणजेच सिद्धीकडे सोंड असलेला गणपती बुद्धिमत्ता, ज्ञान, अध्यात्मिक सुख, सकारात्मक ऊर्जा, मोक्ष प्राप्ती व्हावी या कारणासाठी पूजला जातो. उजव्या सोंडेच्या गणपतीला सिद्धिविनायक म्हणतात तर डाव्या सोंडेच्या गणपतीला रिद्धीविनायक असे म्हणतात.उजव्या सोंडेचा गणपती जास्त ताकदवान मानला गेला आहे. 


म्हणूनच डाव्या सोंडेचा गणपतीचे पूजन घर आणि कार्यालये, कारखाने, गोडाऊन मध्ये केले जाते तर उजव्या सोंडेचा गणपती मंदिर, मठ, आश्रम, साधू संत यांची निवासस्थाने ह्या ठिकाणी पूजला जातो. सहाजिकच अशा ठिकाणी मांसाहार वर्ज्य असतो, सुचिरभूतपणावर जास्त भर दिला जातो ज्याला आपण सोवळे ओवळे असे नांव दिले आहे.


अर्थात ह्याला श्रद्धा म्हणा कीवा अंध श्रद्धा म्हणा. पण जर ईश्वर किंवा देव ह्यावर श्रद्धा असेल तर देव आपले कधी वाईट करेल का? मग तो कसाही असो, उजव्या सोंडेचा असो की डाव्या सोंडेचा असो. ईश्वर किंवा देव ही संकल्पनाच मुळी मानवाच्या कल्याणासाठी तयार झालेली आहे. जर देवामुळे काही नुकसान होणार असेल तर लोकानी त्याला देव का मानावे? जे काही बरे वाईट असेल ते आपल्या प्रारबद्धात असेल तसेच घडते आणि घडणार. मग त्यासाठी देवाला दोष का द्यावा? अनेकवेळा त्याचा संबंध आपल्या या जन्मीच्या किंवा गेल्या जन्मीच्या कर्माशी किंवा पुण्याईशी लावला जातो पण तो एक वेगळा चर्चेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. 


त्यामुळे कोणताही गणपती तुमच्यासाठी कोणतेही संकट ओढून आणत नाही किंवा त्याला पूजल्याने पाप घडते किंवा तो पूजत असताना रीती रिवाजात एखादी चूक झाली तर अनर्थ ओढवतो हे म्हणणे म्हणजे निव्वळ भीती दाखवणे किंवा धर्मापासून भीती तयार करणे होय. लोकांनी चांगले वागावे ह्यासाठी धर्म आहे. त्यांना घाबरवण्यासाठी धर्म नाही. 


माधव भोळे 



Saturday, March 14, 2026

UPSC - IAS, IPS, IRS, IFS exams.

 UPSC - IAS, IPS, IRS, IFS exams.


नुकताच UPSC मेन्सचा निकाल लागला. अनुज अग्निहोत्री हा राजस्थान मधील मुलगा जोधपूर एम्स मधून MBBS झाल्यानंतर UPSC परीक्षेत देशात पहिला आला. या वेळचा निकाल बघिता वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक स्तरातील मुलांना चांगले रँक मिळून पास होऊन त्यांचे IAS किंवा तत्सम होण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. वेगवेगळ्या शैक्षणिक पार्श्वभूमी असलेली मंडळी UPSC साठी आपले प्रयत्न नेटाने करून आपला मार्ग चोखाळत आहेत. UPSC परीक्षेमध्ये या सर्वांच्या बुद्धीमत्तेचा, ज्ञानाचा, निर्णयक्षमतेचा आणि प्रसंगावधानाचा कस लागत आहे. परीक्षा निश्चितच भारतातील सर्वोतकष्ट आहे. 


परंतु एक गोष्ट त्यामध्ये तपासली जाऊ शकत नाही. ती म्हणजे देशप्रेम, माणुसकी, निर्भीड आणि निर्भयपणा. भारतात सरकारी नोकरीं साठी IAS किंवा तत्सम ही सर्वोच्च डिग्री असून देशाच्या प्रशासनात त्या IAS वर्गाचा मोठा सहभाग आहे. त्यांनी घेतलेल्या योग्य निर्णयाना सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह त्रिबूनल ( CAT ) आणि डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग ( DoPt) अश्या दोन ऑथॉरिटी कडुन पाठिंबा असतो, असे असताना अनेक IAS ऑफिसर व्यक्तिगत स्वार्थासाठी, राजकीय दबावापोटी, प्रलोभन किंवा quid pro quo निर्णय घेताना दिसतात अशा वेळी जनतेचे आणि पर्यायाने देशाचे हित खुन्टीवर टांगले जाते.


नुकतेच योगेश सागर ह्या भाजप आमदाराने भर विधानसभेत BMC मधील भ्रष्ट IAS अधिकारी रोड कॉन्ट्रॅक्टर आणि सेवा पुरवठेदारांना खोटी कागदपत्र तयार करून कसे झुकते माप देतात याचे उदाहरण देत BMC मधील भ्रष्टाचाराची SIT चौकशीची मागणी केली. विशेष म्हणजे संपूर्ण जग डबल एंट्री अकाउंटिंग करत असताना BMC मध्ये वर्षानुवर्षे भ्रष्टाचाराला वाव  देणारे सिंगल एंट्री अकॉउंटिंग चालते ते बदलण्याची हिंमत कोणत्याही कमिशनरने केली नाही. वर्षानुवर्षे मिठी नदी आणि इतर नाल्यामधील गाळ काढतना झालेला भ्रष्टाचार दरवर्षी पेपर आणि राजकीय सभा मध्ये चर्चीला जातो पण तेथेही हे IAS असलेले कमिशनर मूग गिळून बसतात. या उलट कोर्टाची ऑर्डर आली म्हणत गल्ली बोळातील गरीब फेरीवाल्याना अचानक धाड घालत त्यांचा माल जप्त करीत त्यांना नुकसान पोहोचवण्यात BMC धन्यता मानते. अनधिकृत बांधकामे तोडताना आपल्या पक्षाची किंवा हितसंबंधित वरिष्टांची बांधकामे सुरक्षित केली जातात. अतिक्रमण केलेले सरकारी प्लॉट जास्त किंमत देऊन विकत घेतले जातात. 


मग अशा IAS ऑफिसरच्या बुद्धिमत्तेचा देशाला आणि जनतेला काय उपयोग?. सर्वच IAS ऑफिसर भ्रस्टाचारी असतात असे माझे म्हणणे नाही.  या उलट तुकाराम मुंडे सारखे कर्तव्य दक्ष अधिकारी कायद्यात राहून आपले कर्तव्य पार पडत असताना त्यांची वारंवार बदली केली जाते. IAS पास होणे म्हणजे एक गुबगुबीत गादी असलेली मानाची खुर्ची, बंगला, गाडी, नोकरचाकर असलेल्या एका प्रशासकीय पिंजऱ्यात बंदिस्त होणे आणि त्या सिस्टीमचे तुम्ही नकळत गुलाम होता. ज्याला हा पिंजरा पसंत नाही किंवा जों तो तोडायला बघतो त्याला वेगवेगळ्या प्रकारे अध्यरुत शिक्षा केली जाते.


देशसेवेसाठी IAS बनून प्रशासकीय सेवेत जाणारे थोडेच असतात. बाकी सर्व आपापल्या विशिष्ठ उदिष्टाने  येथे येत असतात. 


UPSC विद्यार्थ्यांची निवड करताना ह्या गोष्टी कशा बघितल्या जातील याचा सुद्धा विचार करायला हवा. UPSC ची निवड प्रक्रिया अजून सखोल करायला हवी म्हणजे उडीदा माजी काळे गोरे असतील तर त्यातले निदान खडे तरी निघून जावेत.


माधव भोळे 

भाजपा आणि नेहरू खानदान

भाजपा आणि नेहरू खानदान 

मोदी पंतप्रधान झाल्यापासून गेले काही वर्ष संसदेमध्ये जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा नेहरू, इंदिरा गांधी आणि सोनिया गांधी यांचा उद्धार करत संसदेत चर्चा होत असते. मग ते नेहरूचे एडविना माउंट बॅटन संबंध असोत की इंदिरा गांधी यांचे प्लॅनिंग कमिशनला खेचर वाहतूकीसंबंधि पत्र असो. त्यात जर सरदार पटेल चर्चेमध्ये आले तर मोदीजींना आणखीच रंग चढतो आणि अर्धा तासाचे भाषण १ तास लांबते.


काल तर निशिकांत दुबे ह्या भाजपच्या उच्च शिक्षित खासदारांने पामेला माउंटबॅटन ह्यांच्या पुस्तकातील एक उतारा वाचून दाखवत गांधींच्या जाण्याच्या दुःखाने नेहरू एक पूर्ण दिवस एडविना माउंटबॅटन ह्यांच्या सोबत एका बंद खोलीत शोक करत बसले होते असे विधान केले. 


जे काही ही सन्माननीय मंडळी सांगत असतात ते झालेही असेल पण ही सर्व इतिहासातील ( पुराणातील ऐवजी इतिहासातील ) वांगी उकरून भारताची प्रगती कशी होईल? संसद म्हणजे फक्त उखाळ्या पाखळ्या काढण्याची गावची चावडी आहे का? संसद म्हणजे  तुम्ही जास्त चुका केल्यात आम्ही कमी चुका करतो हे अभिमानाने सांगण्याचे व्यासपीठ आहे का? 


गेले काही वर्ष संसदेचे अधिवेशनाचा एक पॅटर्न ठरला आहे. तो म्हणजे कोणत्या तरी एका पक्षाने ( सत्ताधारी किंवा विरोधी पक्ष) काहीतरी अधिवेशनाशी असंबंधित वेगळेच इश्यू काढायचा, आणि मग दुसऱ्या बाजूने भडकाऊ भाषणे करायची, अध्यक्षाने हस्तक्षेप करत संसदेला आळा घालतोय असे दाखवायचे, मग निर्दशने, सभात्याग आणि संसद पायऱ्यावर घोषणाबाजी. प्रश्नोतर तासाच्या वेळी संबंधित मंत्र्यांची गैर हजेरी त्यावरून गदारोळ. तेथपर्यंत अधिवेशनाच्या कामकाजचे दिवस फुकट जातात. मग शेवटच्या दोन दिवसात ओढून ताणून उपस्थिती किंवा विरोधी पक्षाची गैरहजेरी असताना कोणतीही चर्चा न करता आवाजी मतदानाने ठराव मंजूर करून घ्यायचे. 


सत्ताधारी ह्यामध्येच भूषण मानतो की चर्चा न होता ठराव कसे पास करवून घेतले!. विरोधी पक्षाना कसे मूर्ख बनवले? तुम्ही विरोधी पक्षालाच नाही तर जनतेला मूर्ख करत आहात. आपल्या अंतरात्म्यास मूर्ख बनवत आहात. 


संसद हे कायदे मंडळ आहे. देशाचे दिशा दर्शक मंडळ आहे. संसदेत मंजूर झालेले कायद्यांचा संपुर्ण जनतेवर अमूलाग्र परिणाम होत असतो. युवक, महिला, वंचित इत्यादी वर्गाची प्रगती अशा कायद्यांवर, सुधारणानवर अवलंबुन असते. कायदे देशातील नागरिकांना सक्षम बनवतो आणि गुन्हेगारांना शिक्षा करीत असतो. संसदेतील चर्चा देशाच्या विकास आणि प्रगतीचा आराखडा बनवत असते. अशा वेळी फालतू विषयात आपला बहूमूल्य वेळ घालवून देशातील तरुणांना तुम्ही काय आदर्श ठेवणार आहात? 


वाजपेयी, नाथपै, मधू दंडवते, इंद्रजित सिंग सारख्या संसद पटूनी देशाची संसद आपल्या विचारांनी आणि अमोघ वक्तृत्वने गाजवली. आपल्याकडूनही तेच अपेक्षित आहे. कोणाच्या विचारांचे बाहुले बनण्यापेक्षा आपला आदर्श निर्माण करा. दुसऱ्या पेक्षा आपली कद मोठी करायची असेल तर आपली रेष मोठी करायची असेल तर तसें विचार मांडा. मी अमूक वेळा संसदेत गेलो, तमुक वेळा मंत्री झालो, तमुक वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला ह्या पेक्षा माझ्या कामाचा देशाला आणि पर्यायाने जनतेला, लोकशाहीला किती फायदा झाला हे महत्वाचे आहे.  आपण करत असलेल्या कार्याचा देशाच्या प्रगती वर किती परिणाम झाला? 


आज ईराण युद्धमुळे आत्मनिर्भर भारतची आणि ऊर्जा सुरक्षा कवचाचीं कशी धच्चीया उडाली आहे ते आपण बघतच आहात. LPG, CNG, क्रूड ऑइल सारख्या ऊर्जा देणाऱ्या पदार्थाबाबत आपण ८०% आयातीवर अवलंबुन आहोत. १० दिवस उद्ध चालले तर कमर्शीयल LPG चा तुटवडा तयार झाला आणि मुंबईतील आणि देशातील २०% रेस्टॉरंट बंद झाली. रेस्टॉरंट मध्ये सुद्धा भारतातील माणसेच जेवतात ना? नोकरीं साठी दुसऱ्या गावी गेलेली मुले आणि कामगार यांना हॉटेल शिवाय पर्याय आहे का? शिवाय त्यामुळे इंडस्ट्रियल गॅस वापर ठप्प होऊन त्याचा उत्पादनावर परिणाम होत आहे. 


तुम्हांला देशाचे प्रश्न सोडवायचे आहेत की पाठचे घासून पुसून सपाट झालेले विषय उकरून लोकांची दिशाभूल करायची आहे ते ठरवा.


माधव भोळे 


अहिंसा आणि अलिप्तता वाद

अहिंसा आणि अलिप्तता वाद 


कलिंग युद्धानंतर ज्यावेळी सम्राट अशोकाने आपल्या कर्तृत्वाचा आढावा घेतला त्यावेळी जरी त्याने युद्ध जिंकले असले तरी त्या युद्धामुळे मनुष्यबळ आणि अर्थव्यवस्थेची झालेली अपरिमित हानी याचा विचार करून त्याने हिसेंचा त्याग करणारा बौद्ध धर्म स्वीकारला. 


महात्मा गांधींचे गुरु गोपाळ कृष्ण गोखले, दादाभाई नवरोजी, डॉ. ऍनि बेसन्ट आणि त्यानंतर महात्मा गांधी आणि त्यांचे अनुयायी यांच्या एक गोष्ट लक्षात आली होती की त्यांच्यासमोर असलेला शत्रू बलाढ्य आहे. जगातील अनेक देशावर तो राज्य करत असून शस्त्रास्त्र आणि तंत्रज्ञान यामध्ये त्याची आघाडी आहे. १८५७ मध्ये झालेल्या भारतीयांच्या सशस्त्र उठावामुळे ब्रिटिश साम्राज्य सावध झाले असून त्यानंतर ब्रिटिशांनी भारतात कुमक वाढवलेली आहे, अशा वेळी हिंसेपेक्षा चर्चेने प्रश्न सोडवावे म्हणून त्यांनी अहिंसेचा मार्ग पत्करला. परंतु काही लोकांनी त्यांना मुर्खात काढले.


अरे म्हटले की कारे होणारच आणि जों बलवान तो दुसऱ्याची मुंडी पिरगळणार हे तर ओघाने आलेच. आज युक्रेन आणि रशिया यांच्यामधील युद्ध २४ फेब्रुवारी २०२२ पासून सुरू झाले ते आजपर्यंत सुरूच आहे. त्याची झळ युक्रेनच्या सामान्य नागरिकांना लागत असून त्यांची घरे दारे नष्ट होऊन त्यांच्या पुढील १०/ २० पिढ्यान्ची बरबादी झाली आहे. 


आज सर्व देश सांगत आहेत युद्धाने म्हणजेच हिंसेने प्रश्न सुटणार नाहीत आणि चर्चेनेच प्रश्न सुटतील. गेले काही वर्ष महात्मा गांधींच्या अहिंसा आणि नेहरूनच्या अलिप्तता वादाला सकाळ संध्याकाळ शिव्या घालणारे लोक आज युद्ध थांबवावे म्हणून ट्रम्प, इस्रायल आणि इराणकडे आशेने बघत आहेत.


भारत स्वतंत्र झाला त्यावेळी दुसरे महायुद्ध संपून नवीन जागतिक ऑर्डर तयार झाली होती. अमेरिका, युरोप हे भांडवलशाही गट एका बाजूला तर रशिया आणि चीन हे समाजवादी देश एका बाजूला. नेहरूना ह्या दोन्ही पैकी एकाही बाजूत गुंतायचे नव्हते. म्हणून त्यांनी युगोसलाविया, इंडोनेशिया, इजीप्त आणि घाना यांच्या अध्यक्षाच्या साहाय्याने Non alligned movement ( अप्लितता चळवळ ) सुरू केली. काळानुरूप ती मागे पडली असली तरी त्याचा गाभा हे अजूनही भारताच्या परराष्ट्र धोरणाचा एक महत्वाचा भाग आहे. अमेरिका, इस्रायल आणि ईराणरशिया दोन्ही गटांशी आपले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. ना आपण अमेरिकेची मखलाशी करतो ना आपण रशियाचे पाय चाटतो. आपल्या देशाच्या हिताचे प्रश्न आपण स्वतः सोडवतो. पाकिस्तान आणि भारतातील काश्मीर बाबत चा संघर्षला आपण कोणाचीची मध्यस्ती नाकारली आहे. 


आज ईराण विरुद्धच्या युद्धला १४ दिवस नाही झाले तर लगेच भारतात गॅस, पेट्रोल, डिझेल टंचाईमुळे लोक हैराण व्हायला सुरवात झाली आहे. हेच युद्ध आणखी ६ महिने लांबले तर ईराण, इस्रायल आणि अमेरिका खड्यात जाईलच पण इतर देशांच्या अर्थव्यवस्थेची वाट लावून खड्यात जाईल. नुसत्या नेटवर सहनशिलतेचे पोस्ट टाकून प्रश्न सुटणार नाहीत. जेथपर्यंत आपल्याला झळ पोहोचत नाही तेथपर्यंत उपदेश करणे सोपे असते.


त्यामुळे आपल्या धुरीणानी पतकरलेले मार्ग त्या त्या काळानुरूप योग्यच होते हे न समजता टीका करायचे बंद करायला हवे असे मला वाटते.


माधव भोळे