उजव्या सोंडेचा गणपती!!
आज एका प्रसिद्ध जाणकार गणेश मूर्तिकारांने उजव्या सोंडेच्या गणपतीच्या मूर्तीचा फोटो असलेली पोस्ट फेसबुकवर टाकली. त्यावर एका नेटकऱ्याने "कशाला आम्हाला पापाचे धनी बनवता. कृपया उजव्या सोंडेचा गणपती असलेल्या गणपतीचा व्यवसाय करू नका. अशी पोस्ट टाकली.
मी बरेच वर्ष ऐकत आलो आहे की उजव्या सोंडेचा गणपतीचे सोवळे ओवळे कडक असते. जरा चूक झाली तर गणपती क्रोध पावतो. घरात अनर्थ होतो वगैरे वगैरे.!!
आता त्याचा शास्त्रीय अर्थ समजावून घेऊया. श्री गणपतीच्या दोन पत्नी आहेत त्यांचे नांव आहे रिद्धी आणि सिद्धी. रिद्धी गणेशाच्या डाव्या बाजूला उभी किंवा डाव्या मांडीवर बसलेली असते तर सिद्धी उजव्या बाजूला किंवा उजव्या मांडीवर बसलेली असते. रिद्धी ऐहिक सुख पैसा, धन, धान्य समृद्धी ह्यांची देवता आहे तर सिद्धी बुद्धिमत्ता, ज्ञान, अध्यात्मिक सुख, मोक्ष प्राप्ती यांची देवता आहे.
डाव्या सोंडेचा म्हणजेच रिद्धीकडे सोंड असलेला गणपती ऐहिक सुख,पैसा, धन धान्य समृद्धी ह्यामध्ये भरभराट व्हावी म्हणून पूजला जातो तर उजव्या सोंडेचा म्हणजेच सिद्धीकडे सोंड असलेला गणपती बुद्धिमत्ता, ज्ञान, अध्यात्मिक सुख, सकारात्मक ऊर्जा, मोक्ष प्राप्ती व्हावी या कारणासाठी पूजला जातो. उजव्या सोंडेच्या गणपतीला सिद्धिविनायक म्हणतात तर डाव्या सोंडेच्या गणपतीला रिद्धीविनायक असे म्हणतात.उजव्या सोंडेचा गणपती जास्त ताकदवान मानला गेला आहे.
म्हणूनच डाव्या सोंडेचा गणपतीचे पूजन घर आणि कार्यालये, कारखाने, गोडाऊन मध्ये केले जाते तर उजव्या सोंडेचा गणपती मंदिर, मठ, आश्रम, साधू संत यांची निवासस्थाने ह्या ठिकाणी पूजला जातो. सहाजिकच अशा ठिकाणी मांसाहार वर्ज्य असतो, सुचिरभूतपणावर जास्त भर दिला जातो ज्याला आपण सोवळे ओवळे असे नांव दिले आहे.
अर्थात ह्याला श्रद्धा म्हणा कीवा अंध श्रद्धा म्हणा. पण जर ईश्वर किंवा देव ह्यावर श्रद्धा असेल तर देव आपले कधी वाईट करेल का? मग तो कसाही असो, उजव्या सोंडेचा असो की डाव्या सोंडेचा असो. ईश्वर किंवा देव ही संकल्पनाच मुळी मानवाच्या कल्याणासाठी तयार झालेली आहे. जर देवामुळे काही नुकसान होणार असेल तर लोकानी त्याला देव का मानावे? जे काही बरे वाईट असेल ते आपल्या प्रारबद्धात असेल तसेच घडते आणि घडणार. मग त्यासाठी देवाला दोष का द्यावा? अनेकवेळा त्याचा संबंध आपल्या या जन्मीच्या किंवा गेल्या जन्मीच्या कर्माशी किंवा पुण्याईशी लावला जातो पण तो एक वेगळा चर्चेचा आणि श्रद्धेचा विषय आहे.
त्यामुळे कोणताही गणपती तुमच्यासाठी कोणतेही संकट ओढून आणत नाही किंवा त्याला पूजल्याने पाप घडते किंवा तो पूजत असताना रीती रिवाजात एखादी चूक झाली तर अनर्थ ओढवतो हे म्हणणे म्हणजे निव्वळ भीती दाखवणे किंवा धर्मापासून भीती तयार करणे होय. लोकांनी चांगले वागावे ह्यासाठी धर्म आहे. त्यांना घाबरवण्यासाठी धर्म नाही.
माधव भोळे