Thursday, July 2, 2026

चंपतराय आणि SIT

चंपतराय आणि SIT.


चंपत राय बन्सल,  विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष,  राष्ट्रीय स्वयंमसेवक संघांचे पूर्णवेळ प्रचारक, एक निस्सीम देशभक्त, एक निष्ठावंत समाज कार्यकर्ता आणि राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे माजी जनरल सेक्रेटरी. 


सध्या वादाच्या भोऱ्यात सापडलेली राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची दानपेटी आणि त्यामुळे बसलेली SIT या मुळे चंपत राय यांची चौकशी होणे साहजिकच आहे. जरी त्यांचे नांव प्राथमिक माहिती अहवाल ( FIR) मध्ये नसले तरी ज्या व्यक्तीवर राम मंदिर न्यासाची रोजच्या कारभाराची जबाबदारी आहे त्याची चौकशी होणे क्रमप्राप्त आहे. आणि जर त्यांची चौकशी होणार असेल तर त्याना त्यांच्या राम जन्मभूमी न्यासाच्या रोजच्या देखरेखीचा कोणताही नैतिक अधिकार रहात नाही त्यामुळे त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला किंवा त्यांना तो द्यावा लागला याने काही फरक पडत नाही.


अनेक लोकांचे म्हणणे आहे कीं काही लोक त्यांच्या वाईटावर आहेत आणि त्यामुळे त्यांना कट रचून त्यांचा काटा काढला गेला. पण जीं व्यक्ती आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडू शकत नाही त्याला त्या पदावर राहण्याचा अधिकारच नाही मग त्याचे पूर्व चारित्र्य कितीही स्वच्छ असो. येथे प्रश्न चरित्र्याचा आहेच पण क्षमतेचा सुद्धा आहे. एव्हडया मोठ्या कारभारावर लक्ष ठेवण्यास चंपत राय असमर्थ ठरले हे नक्की. तसें नसते तर एव्हडा मोठा घोटाळा राजरोस झाला नसता.


आता राहता राहिला प्रश्न कीं त्यांचा ह्या सर्व घोटाळ्यात आणि लुटीमध्ये थेट किंवा अप्रत्यक्षरित्या सहभाग होता का?  तसेच ह्या लु्टीमुळे त्यांना किंवा त्यांचा परिवार, नातेवाईक किंवा मित्र मैत्रिणी, हित संबंधि यांना लाभ झाला का? आणि तो लाभ त्यांनी मिळवून दिला का? 


तर त्याबाबतीत जेथपर्यंत सखोल चौकशी होत नाही आणि केस चा पूर्ण निकाल लागत नाही, आरोप पत्र निश्चित होत नाहीत तेथपर्यंत कोणालाही दोषी धरणे चूकच.


देव करो आणि चंपत राय ह्या सर्वातून सही सलामत सुटो आणि राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कार्य सज्जन विश्वास्तांचे हाती जाओ.


माधव भोळे 

रंगांची वाटणी??

रंगांची वाटणी??


पांढऱ्या रंगाच्या पटट्या मारल्यामुळे भडकलेले वातावरण शांत करण्यासाठी  काही जैन मंडळी राज ठाकरे यांना भेटायला गेली होती. 


खरे म्हणजे रंगाची निर्मिती देवांनी केली. आकाशातील इंद्रधनुष्या पासून ते फुलांतील आणि फुलपाखरातील विविध रंग, विविध रंगांचे पक्षी, पाने, फुले हीं निसंशय निसर्गाची निर्मिती आहे. असे असताना पांढरा रंग जैनांचा, हिरवा रंग इस्लामचा, भगवा रंग हिंदूंचा, निळा रंग आंबेडकरवादी बुद्धांचा, निळा आणि पिवळा रंग शिखांचा अश्या वाटण्या आपणच करून घेतल्या. त्या रंगावरून राजकारण आणि समाजकारण सुरू झाले, आणि त्यातून वाद.


पण इंद्रधनुष्याचे रंग कधी आपसात लढतांना दिसतात का? कधी ते आपला क्रम बदलतात का? जांभळ्या  ( violet ) रंगाने कधी लाल रंगाला म्हटले का कीं तुझ्या आणि माझ्या क्रमात अदलाबद्दल करूया?. 

फुलपाखराचे रंग एकाच पंखावर असताना त्यांची तक्रार आपण कधी ऐकली का? सिताफळ कधी सफरचंदाला म्हणाले का कीं तुझा रंग मला दे. 


मग आपणच आपसात असे का भांडतो? 

आपले धर्मपंडित आपल्याला कधीच सांगत नाहीत कीं शंकराला लाल फुल वाहू नका किंवा कृष्णाला पांढरे फुल वाहू नका. ते फक्त त्या देवतांचे प्रियफुल किंवा प्रिय रंग सांगतात. आमच्या अंबाबाईला आणि गणपतीला लाल रंग, कृष्णाला निळा, तर शंकराला सफेद रंग आवडतो.


आपला धर्म सांगतो कीं जसा भाव तसा देव. तुमच्या कडे अमुक फुल नाही तर तुम्ही दुसरे फुल वापरा, ते सुद्धा नसेल तर अक्षता वहा. त्या सुद्धा नसतील तर हळद पिंजर वहा. आपल्या देवांना कोणताही रंग वर्ज्य नाही. मग आपण फक्त भगव्यालाच का महत्व द्यायचे? बाकीच्या रंगांवरील आपले प्रेम कमी आहे का? 


सर्व रंग आमच्यासाठी समान प्रियतेचे असायला हवेत. व्यक्तिगत प्राध्यान आपले आपण ठरवू शकायला हवे. आम्हाला कोणी एकाच रंगाने बांधायची काय गरज आहे.


विचार करा


माधव भोळे 

Thursday, June 25, 2026

कुणाल शहा, व्हाट्सअपचा नवीन ग्लोबल सीईओ.

 उतुंग भरारी 

( कुणाल शहा, व्हाट्सअपचा नवीन ग्लोबल सीईओ.)


कुणाल शहा, मुंबईचा व्यवसायिक विभाग प्रिन्सेस स्ट्रीट, लोहार चाळ येथे राहणारा एक १५ वर्षाचा मुलगा, वडीलांचा औषधांचा व्यवसाय बंद पडल्यामुळे डिलिव्हरी बॉय पासून पडेल ते काम करायला लागला. त्यानंतर त्याने मुंबईतील विल्सन कॉलेजमध्ये सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत तत्वज्ञान ( philosophy) शिकत त्यामध्ये BA केले. वेगवेगळी आडनड कामे सुरूच होती.


पुढे NMIMS, मुंबई मध्ये MBA साठी प्रवेश घेतला, परंतु त्याने लवकरच तेथून ड्रॉप घेतला आणि स्वतःचे काहीतरी सुरू करायचे म्हणून "FreeCharge" हीं फिन्टेक (तंत्रज्ञानावर आधारित आर्थिक कंपनी ) कंपनी सुरू केली. ह्या मध्ये कोणताही आकार (चार्ज ) न घेता वेगवेगळ्या मोबाईलचे रिचार्ज, टीव्ही अँटीना रिचार्ज किंवा वेगवेगळ्या सभासद वर्गण्या ( subscriptions ) स्वीकारून त्या त्या कंपन्याना पोचवल्या जायच्या. हीं कंपनी स्नॅपडील सारख्या भारतीय इंटरनेट ई कॉमर्स कंपनीच्या नजरेस आली आणि ती त्यांनी २८०० कोटी रुपयाला विकत घेतली. 


खरे म्हणजे त्या पैशावर तो मस्त मजा मारू शकला असता परंतु थोड्याच दिवसात त्याने CRED नावाची कंपनी काढली. CRED, हीं सुद्धा एक फिन्टेक कंपनी असून क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना कमीत कमी पैशामध्ये क्रेडिट कार्डचा चांगला फायदेशीर वापर कसा करायचा जेणेकरून कमी व्याज आणि जास्त लाभ होईल, तसेच वेळेवर बिले भरणे, क्रेडिट कार्ड मधील फॅसिलिटी इत्यादी फायदे लोकांपर्यंत पोहोचवणे वगैरे सारखी कामे CRED करते. 


आता फेसबुकची मुख्य कंपनी मेटा यांनी ह्या CRED चे २०% शेयर्स रु. ८५५० कोटीला विकत घेतले असून त्यामुळे CRED ची बाजारी किंमत ४.५ बिलीयन डॉलर्स ( सुमारे रु. ४२,००० कोटी ) झाली आहे. मुख्य म्हणजे कुणाल शहाचे विचार आणि त्याचे व्यवसायिक ज्ञान ऐकण्यासाठी फेसबुकच्या मार्क झुकरर्बर्गने त्याला थेट बंगलोर वरून अमेरिकेत बोलावून घेतले आणि त्यानंतर त्याला व्हाट्सअप ह्या अँप्लिकेशनचा थेट ग्लोबल सीईओ बनवला. विशेष म्हणजे कुणाल कोणत्याही अमेरिकेतील किंवा भारतातील मोठ्या इंजिनियरिंग कॉलेज किंवा मॅनेजमेंट कॉलेजचा विद्यार्थी नसताना असे घडू शकते यावर कोणाचा विश्वास बसेल का? पण हे झाले आहे.


कुणालचा स्टार्टअप प्रवास नेहेमीसारख्या घिसा पिट्या रस्त्यावरून झालेला नाही. कुणाल तत्वज्ञानाचा विद्यार्थी असल्यामुळे लोकांच्या अपेक्षा, आशा आकांक्षा आणि त्यांची वागणूक ( behavior ) या बद्धल त्याला प्रचंड माहिती आहे. मानवी मानसशास्त्र ( human psychology ) आणि समाजकारण ( sociology ) ह्या बद्दल त्याचे स्वतःचे काही ठोकताळे आहेत. तो स्वतः एक एंजल इन्व्हेस्टर असल्यामुळे एखादे स्टार्टअप किंवा प्रोडक्ट आर्थिक दृष्ट्या यशस्वी होईल कीं नाही हे चेक करण्यासाठी त्याने Delta 4 theory नावाची संहिता काढली आहे. 

स्वतः मार्क झुकरबर्गची मूळ कंपनी फेसबुक आणि व्हाट्सअप दोन्ही अँप्लिकेशन मुख्यतहा मानसशास्त्रावरच आधारित आहेत.


नुकतेच ४३ वर्ष पूर्ण केलेला कुणाल व्हाट्सअप चा ग्लोबल सीईओ बनला आणि भारतीयांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा चढला.


कोण म्हणतो भारताची तरुणाई निराशाजनक आहे, त्यांनी डोळ्यावरचा पिवळा चष्मा काढावा.


माधव भोळे 

दुर्दैवी घटना आणि लोक प्रतिक्रिया!

 दुर्दैवी घटना आणि लोक प्रतिक्रिया!


गेल्या आठवड्यात २ धक्कादायक घटना घडल्या. एक पुणे येथील केतन अगरवालचा लोहगडावर दुर्दैवी खून आणि दोन नालासोपारा येथील मयांक लोहार याचा मुंबई लोकल मधील खून. 


यावरून समाज माध्यमावर अतिशय विचित्र आणि निराशादायक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. चांगले चांगले विचारवंत सुद्धा आताची पिढी आणि या आधीच्या पिढ्या यांची तुलना करत पुढील चित्र किती निराशादायक आणि भयावह आहे, तरुण पिढी कशी वाया गेली आहे वगैरे रंगवून सांगत आहेत.


मुळात म्हणजे १४ करोड लोकसंख्येच्या महाराष्ट्रात किंवा १४० करोड लोकसंख्येच्या भारतात हे घडले हे वानगीदाखल आहे, पण ह्या घटना म्हणजे आपला समाज आहे का? 


एका बाजूला देशामध्ये २२.७९ लाख विद्यार्थी निट परीक्षा, किंवा ५.४९ लाख विद्यार्थी UPSC परीक्षा, १६ लाख विद्यार्थी IIT JEE, ४ ते ६ लाख विद्यार्थी नॅशनल डिफेन्स अकॅडेमी एंट्रन्स सारख्या वेगवेगळ्या आव्हानत्मक परीक्षाची तयारी करत असतात. दुसऱ्याबाजूला २.२३ लाख स्टार्टअप्स रजिस्टर असून त्यातील ५५,२०० हे नुसते गेल्या वर्षभरात नोंदले गेले असताना, तसेच Sarvam AI, krutrim AI, Neysa AI सारखे AI मधील ऍडव्हान्स संशोधन आणि प्रोडक्ट्स तयार होत असताना पुढील चित्र निराशाजनक आहे, पुढील पिढी वाया गेली आहे या सारखे सुर समाज माध्यमातून बडवले जातात ह्यामध्ये त्या लेखकांचे दळभद्री पण दिसून येते. 


वरील दोन घटनांची पार्श्वभूमी अतिशय वेगळी आहे. नालासोपारा येथील मयांक लोहार याला मारणारा रोशन सुवर्णा हा दिवसभर दारू पीणारा एक मजूर होता तर लोहगडावर केतन अगरवाल याला ढकलणारी सिया गोयला हीं बड्या बापाची २० वर्षांची एक मूर्ख मुलगी होती जिने कल्पना पण केली नसेल कीं आपला प्लॅन फेल गेला तर काय होईल. ती तिच्या प्रेमाच्या धुंदीत वहात गेली होती. तिने सिनेमा मध्ये होते तसें केले.


वरील हत्येची दोन उदाहरणे किंवा कोयता गँग किंवा एखादे गँग वॉर म्हणजे संपूर्ण समाज नव्हे. प्रत्येक समाजात चांगली वाईट माणसे असतातच म्हणून संपूर्ण समाजाचे चित्र काळ्या ब्रशने रंगवणे चुकीचे होईल.


पर्वाचीच एक बातमी वाचली. Witkin नावाची एक अमेरिकन युवती भारतात केरळ मध्ये एकटीच फिरायला आली असताना तिचे डेबिट कार्ड ATM मध्ये तसेच राहून गेले आणि ते एका रिक्षा वाल्याला मिळाले. त्या कृष्णा नावाच्या रिक्षावाल्याने, कोणताही मोबदला अपेक्षा न करता १४ तास रिक्षाने जाऊन येऊन प्रवास करत ते कार्ड त्या महिलेला पोहोचवले. या वरून काय लक्षात येते? कीं भारतात अजूनही चांगली माणसे आहेत. 


पूर्वी सुद्धा रामन राघवन, रंगा बिल्ला सारखे खुनी होते पण त्याचवेळी इतरही अनेक मंडळी या समाजाला पुढे नेत होती. पूर्वी रावण सुद्धा होता आणि राम सुद्धा होता. कौरव होते आणि पांडव सुद्धा होते. येशू ख्रिस्त देखील होते आणि त्याला फासावर चढवणारे रोमन साम्राज्य सुद्धा होते. प्रेषित मोहमद पैगंबरांच्या नातवाला हुसैन इब्न अलीला करबला येथे आमंत्रण देऊन पाणी सुद्धा प्यायला न देता त्याची आणि त्याच्या संपुर्ण समूहाची हत्या करणारे सुद्धा होते. म्हणजेच कोणत्याही काळात जगात दुष्ट आणि सुष्ट शक्ती होत्या.


त्यामुळे एक दोन घटनांनी हादरून न जाता, संपुर्ण समाज दलदलित फसला आहे असे न समजता, आशादाई बातम्याची सुद्धा दखल घ्यायला हवी. 


दुर्गंधी लवकर पसरते पण सुगंध दरवळायला वेळ लागतो कारण तो मंद असतो. 


माधव भोळे 

नेमेची येतो पावसाळा ??

नेमेची येतो पावसाळा ??


शाळेत असताना आम्हाला वरील आशयचे निबंध लिहावे लागत. आधीच उल्हास मग त्यात फाल्गुन मांस. कुठूनतरी दोन चार ओळी खर्डायच्या आणि शिक्षकांना दाखवायच्या. बाकीचे विद्यार्थी मात्र ३/४ पानी निबंध लिहायचे. त्यावेळी मात्र मला ज्ञानेश्वरांच नक्कीच हेवा वाटायचा. एवढीशी ७०० श्लोकांची भगवद गीता, त्याच्यावर म्हणे त्यांनी टीका केली, ती सुद्धा १८ अध्याय आणि ९०३४ ओव्यानमध्ये साचेबद्ध केली. काय प्रतिभाशक्ती त्या महानुभावाची. एका एका ओवीचा अर्थ आजसुद्धा वाचकाच्या अनुभवानुसार आणि अनुभतीनुसार पुन्हा पुन्हा वेगळा समजला जातो आणि सांगितला जातो. जे सोपे म्हणून करायला गेले ते परत गहन झाले. 


तर सांगायचा मुद्धा म्हणजे ज्या पावसाची आपण गेले एक महिना आतुरतेने चातकासारखी वाट पहात होतो तो आमच्या मालाडच्या धरतीवर आज सकाळी अवतरला. थोडा थोडका नाही तर चक्क अर्धा तास रीप रीप करीत संपुर्ण अंगण भिजवून गेला आणि त्यामुळे;


"रित्या झाल्या अत्तराच्या कुप्या, कोसळती जलधारा भुवरी, 

चिंब होऊन मन, दूर जाई सागरी,

पेटल्या चेतना, जागृत झाल्या भावना,

आठवता दिवसतो, बांध घाली या मना" ( अर्थात कवी गणेशसूत माधव 🤪).


असेच काहीसे काव्य मनात घोळू लागले. कारण गेले काही दिवस संपुर्ण महाराष्ट्र ज्या क्षणाची वाट आतुरतेने पहात होता तो, "नेमेची येतो पावसाळा" अशी त्या पावसाची इतके वर्ष खिल्ली उडवल्यामुळे इतका नाराज झाला होता कीं त्यामुळे मुळात सध्या तोंडात नसलेले सर्व मुंबईकरांचे तोंडचे पाणी पळाले होते.


असो तर आपण कुठलीही गोष्ट अगदी हलकी फुलकी घेतो. पाण्यासारख्या "जीवन" नांव असलेल्या पदार्थाची किंमतच आपण २० रुपये / बाटली ठरवून त्याला एक कमोडीटी म्हणून वापरतो, त्याचा खरा अर्थ या गेल्या एक महिन्यात आम्हाला समजला. आता तरी आपण त्या पाण्याला आणि त्याचा बाप असलेल्या पावसाला योग्य तो मान देऊन त्याचे स्वागत आणि गौरव करूया. 


सर्वांनां पावसाळ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आणि हो कुठे पावसाळी पिकनिक काढणार असाल तर आम्हाला पण बोलवा गरम गरम भजी खायला आणि तोंड भाजेस्तो गरम चहा प्यायला.


माधव भोळे 






पांढऱ्या पटट्या!

पांढऱ्या पटट्या!


गेले काही दिवस पांढऱ्या पटट्या हा विषय महाराष्ट्रातील विशेषत: मुंबईतील समाज माध्यमातून घोळत आहे. अर्थात काही राजकारणी त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न सुद्धा करीत आहेत. 


त्या पांढऱ्या पटट्याचे जेव्हडे म्हणून अन्वयार्थ काढता येत असतील तेव्हढे काढले गेले, जेव्हडे त्या पट्टे काढणाऱ्याला सुद्धा ते काढतांना माहिती नसतील. त्यातील एक अर्थ म्हणजे दोन समूहातील श्रेष्ठता मग ती धर्म, जात, भाषा, रंग आणि आता आर्थिक स्थिती ह्या बद्धल. 


काही लोकांच्या मते मराठी माणूस आर्थिक दृष्ट्या तुलनेने कमी पडतो म्हणून अशी हिम्मत इतर लोक करतात. पण मराठी माणसाला आपली आर्थिक स्थिती सुधारायला किंवा मजबूत करायला ना कायद्याचे किंवा संविधानाचे बंधन आहे. पण आमच्या सर्व मंडळींचा फोकस आणि वेळ नेत्यांच्या समोर ट्रॅक्टर आणून गुलाल उधळणे, त्या नेत्यासमोर उपोषणे करणे आणि सोडणे, आंदोलनासाठी पैसे जमा करणे, गावोगावी शिमगा, गणपती, यात्रा, मंदिरे यासाठी बॅनरवर फोटो झळकण्यासाठी रात्रंदिवस मेहेनत करणे. गावातील जमिनी विकण्यासाठी दलाली करणे आणि पार्ट्या झोडणे. म्हणजे जवानीमध्ये जों वेळ देवाने काहीतरी करून दाखवण्यासाठी दिलेला असतो तो असा मृगजळाच्या पाठी फुकट घालवणे आणि मग वय निघून गेल्यावर आम्हाला कोणी विचारत नाही म्हणून नशिबाला, नातेवाईकांना आणि समाजाला दोष देणे. 


आपल्या राज्यामध्ये अनेक मराठी लोक उत्तम व्यवसाय करतात आणि त्यांच्या गुणावर त्यांनी आपली खूप प्रगती केली आहे, परंतु इतर मराठी मंडळींनी किंवा होतकरू मराठी व्यवसायिकानी व्यवसाय करताना आपल्यातील काही दोष किंवा कमतरता शोधून काढून त्यावर उपाययोजना ते करत नाहीत म्हणून ते पाठी पडतात. 


व्यवसाय करण्याकडे उदासीनता, विवाह जुळण्यामध्ये येत असलेला अडथळा, सातत्य नसणे, शब्दाची किंमत नसणे, ग्राहकाला सांभाळण्यासाठी लागणारी नम्रता असणे, बँक आणि इतर व्यवहार करण्यासाठी लागणारी व्यवहार चातुर्यता नसणे, फाजील आत्मविश्वास, एक घाव दोन तुकडे ( लवचिकतेचा अभाव ) अशा एक ना अनेक कमतरता आपल्यामध्ये असतात. त्या सुधारण्यासाठी लागणारे प्रशिक्षण कोणत्याही शाळेत मिळत नसून ते आपणच निरीक्षणाने किंवा अनुभवाने घेऊ शकतो. पण ते न करता फक्त आणि फक्त दुसऱ्याला दोष देणे एव्हडेच आपण करतो म्हणून आपली आर्थिक स्थिती यथा तथाच असते.


आणि जगाचा नियमचं आहे कीं बळी तो कान पिळी. 


बिरबल आणि अकबराच्या गोष्टीमधून एक गोष्ट आपण शिकलो आहे कीं दुसरी रेषा न पुसता लहान करायची असेल तर तिच्या बाजूला आपण आणखीन एक मोठी रेषा काढायला हवी. त्याचप्रमाणे आपण आपले सर्व कर्तृत्व पणाला लावून आपली आर्थिक स्थिती मजबूत करायला हवी.


मी एक पुस्तक लिहिले आहे "मराठी पाऊल पडते पुढे" त्या मध्ये महाराष्ट्रातील २८ दिग्गज मराठी उद्योजकांच्या यशोगाथा लिहिल्या आहेत परंतु अशा पुस्तकांचा खप महाराष्ट्रात कमी आहे पण स्वामींच्या पोथीची पुस्तके किंवा इतिहास, राजकारण, जातीचा महिमा असलेली इत्यादि विषयावरील पुस्तके महाराष्टात भरपूर खपतात हा अनुभव आहे, त्याला कोण काय करणार. जेथपर्यंत मानसिकता बदलत नाही तेथपर्यंत आपण असेच राहणार.


केल्याने होत आहेरे मग केलेची पाहिजे.


माधव भोळे 

अयोध्या राम मंदिर घोटाळा ( श्रद्देची अवहेलना )

अयोध्या राम मंदिर घोटाळा ( श्रद्देची अवहेलना )


राम मंदिर अयोध्या येथील दानपात्रातील घोटाळा आता जगजाहीर झाला आहे. एक दोन नव्हे हजारो करोडो रुपयाची लूट आता समोर आली आहे. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगि यांनी ( आज तरी मी त्यांना योगीजीं म्हणणार नाही ) या संबंधि SIT स्थापन केली आहे. दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. आज सिंधी समाज म्हणतो आम्ही २०० किलो चांदी दिली त्याची पावती आम्हाला मिळाली नाही. एक नाही दोन नाही अशा अनेक कथा समोर येत आहेत. सर्व न्यूज चॅनल सांगत आहेत कीं फक्त ४५ दिवसाचेच CCTV फुटेज प्राप्त आहे. 


लोकांकडून एक एक वीट द्या असे मागणारे, देशाच्या प्रत्येक भागातील माती द्या असे सांगणारे, राम मंदिराचा "अक्षत कलश" घराघरामध्ये पोहोचवणारे आणि चंदा जमा करणारे विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि निरमोही आखाडा या सारख्या महाकाय संघटनानी भाविकांच्या मनात निर्माण केलेला विश्वास एका क्षणात धुळीला मिळाला आहे. आता सर्वच चिडीचूप्प आहेत. "विवेक" कुठे आहे समजतच नाही.


SIT च्या प्राथमिक अहवालानुसार यामध्ये मंदिराचे काही ट्रस्टी सुद्धा सामील आहेत. ट्रस्ट ह्या शब्दाचाच मुळी अर्थ विश्वास आणि त्या विश्वासालाच तडा गेला आहे. या सर्व प्रकरणामुळे करोडो हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. आज जगात एक गोष्ट जाहीर झाली कीं भारतात कोणत्याही ठिकाणी आणि कधीही भ्रस्टाचार होऊ शकतो.



मा. नरेंद्र मोदीजी यांनी ५ फेब्रुवारी २०२० रोजी, "राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र" हे ट्रस्ट भारत सरकारने स्थापन केल्याची घोषणा लोकसभेमध्ये केली. ट्रस्टचे काम एकच. मंदिर पुनरनिर्माण आणि व्यवस्थापन. काही लोकांनी जबानी दिली आहे कीं ट्रस्टने एकंदर १०४ एकर जमीन आजूबाजूच्या लोकांकडून दाम दुप्पट भावाने खरेदी केली. शिवाय पुनरनिर्माण मध्ये अनेक वस्तू दीड पट भावाने खरेदी केल्या आणि ह्या सर्वात ४०% पर्यंत कमीशन खोरी केली. म्हणजे निर्माण सुरू झाल्यापासून ह्यात घोटाळे झाले आहेत असे साक्षीदार म्हणतात. अनेक आरोपिंच्या मालमत्तेमध्ये १०० पटीनी वाढ झाली आहे. म्हणजे करोडो लोकांनी जीं देणगी श्रद्देने अर्पण केली गेली त्याचे व्यवस्थापन करण्यात भारत सरकार कमी पडले हेच सत्य आहे. 


नुकतेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीं आदित्यनाथ यांचे भाषण ऐकले. ते म्हणतात "श्रद्धालुओंके भावनाओकीं खिलवाड मैं नही करने दूंगा". पण लक्षात घ्या "अब पछताए होत क्या, जब चिड़िया चुग गई खेत". ज्या गोष्टी गेले ६ वर्ष कमी अधिक प्रमाणात सुरू आहेत त्या तुमच्या कंट्रोलच्या बाहेर गेल्यावर तुम्ही जागे झालात. आता सुशासनाचा डंका तुम्ही कसा काय मिरवणार? नुसते बुलडोजर चालवून व्यवस्थापन होत नसते. त्याला इतर पैलू सुद्धा असतात. विरोधी पक्षांनी हा मुद्धा उचलून धरल्यानंतर तुम्ही जागे झाले अहात.आता होणार ते फक्त पोस्ट मार्टेम आणि शिक्षा. पण मूळ प्रश्न राहतोच कीं ह्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा? 


राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट हे भारत सरकारने स्थापना केल्यामुळे भारत सरकार, उत्तर प्रदेश सरकार हे या विषयाला थेट जबाबदार आहेत.


SIT ने प्राथमिक अहवालमध्ये FIR नोंदवायची शिफारस केली आहे. भारत सरकारने ह्या सर्व गुन्हेगारांना भारतीय न्याय संहिता कलम १११, संघटित गुन्हेगारीची कलमे लावून त्यांच्या मुसक्या बांधायला हवे. आणि शक्य असेल तेव्हडी जास्तीजास्त शिक्षा करण्याची तजवीज करावी.


आज बहुतेक सर्व प्रसिद्ध मोठ्या मंदिरामध्ये व्यवस्थापनात अनागोंदि आहे. कधी प्रसादा मध्ये भ्रस्टाचार तर कधी त्यामध्ये चरबी युक्त प्रसाद. कधी दागिन्यांची चोरी तरी कधी काही. राजकारणीलोकांची आपली वर्णी तेथे लावून घेण्यासाठी चढाओढ सुरू असते. 


खरोखर आपण हिंदू म्हणून घ्यायला लायक राहिलो आहोत का? खरा हिंदू असा आहे का? चोर, भ्रष्टाचारी, भ्रस्टाचार खपवून घेणारा? तुम्हीच उत्तर द्या.


माधव भोळे