Friday, June 5, 2026

कौशल्य विकास आणि व्यवसाय

कौशल्य विकास आणि व्यवसाय.


माझ्या मित्राच्या ऑफिससमोर एक नवीन ऑफिस आलेले बघितले. E-waste cycling and refurbishment. मी मित्राला विचारले हीं कंपनी काय करते? 


तो म्हणाला भारतात आता ई-वेस्ट ( इलेक्ट्रॉनिक भंगार वस्तू आणि पार्टस ) ठराविक पद्धतीनेच नष्ट करता येते. मोठ मोठ्या कंपन्या लॅपटॉप कॉम्पुटरचे नवीन व्हर्जन आले कीं जुने व्हर्जन भंगारमध्ये काढतात. समोरची कंपनी अशा कंपन्यामधील जुने किंवा उपयोगात नसलेले लॅपटॉप कॉम्पुटर अत्यल्प दरात विकत घेते. त्यातील बिघडलेला पार्ट दुरुस्त करून ते चालू स्थितीमधील लॅपटॉप नवीन किमतीच्या ३५% ते ४०% कमी करून विकते. ग्रामीण भागात किंवा गरीब वस्तीमध्ये अशा कॉम्पुटरला मागणी असते. 


५०० रुपया मध्ये विकत घेतलेला लॅपटॉप, त्यावर हजार / दोन हजार खर्च करून तो १२ ते २० हजाराला विकते. त्यामुळे त्यांचा खूप फायदा होतो. अगदी जे लॅपटॉप दुरुस्ती करण्यापलीकडे आहेत किंवा त्याला खर्च जास्त आहे ते लॅपटॉप हीं मंडळी ई वेस्ट म्हणून निकालात काढतात. हीं कंपनी एक तरुण मुस्लिम चालवतो. गेल्या चार वर्षात त्याने हा समोरील गाळा १ कोटी २० लाखाला विकत घेतला आहे. मुस्लिम मंडळीचे एक वैशिष्ट्य आहे, भंगार जमा करुन त्यातील योग्य वस्तू दुरुस्त करुन योग्य किमतीत गरजूना विकणे. मग ते फर्निचर असो, कीं आणखी काही. वाटायला व्यवसाय शुल्लक वाटला तरी ह्या मध्ये खूप फायदा आहे ( अर्थात मेहनत सुद्धा ). ह्या लाईन मध्ये तसेच मोबाईल रिपेयरिंग लाईन मध्ये जास्त करून मुस्लिम तरुण आहेत. 


त्याचबरोबर टीव्ही रिपेयरिंग आणि वॉशिंग मशीन रिपेरिंग, एसी सर्व्हिसिंग अँड रिपेयरिंग, कार सर्व्हिसिंग, प्लम्बिंग इत्यादी मध्ये अनेक मंडळी आहेत. ह्यांचे मुख्य भांडवल म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सचे / मशीनरीचे तांत्रिक प्रॅक्टिकल ज्ञान. उदा. आज प्रत्येकाकडे लॅपटॉप आणि मोबाईल आहे. तो बिघडणारच आणि बिघडला कीं दुरुस्तीला येणार.


त्यांच्या मते जेव्हडा पैसा नवीन वस्तू विक्री मध्ये आहे त्या पेक्षा जास्त दुरुस्ती आणि सेवा या विषयात आहे. ह्या मंडळीना हीं गोष्ट चांगलीच समजली आहे.


पुढील काळ हा कौशल्य विकास आणि त्याचा प्रॅक्टिकलं उपयोगाचा आहे. तुमच्याकडे काही कौशल्य असेल तर तुम्ही चांगला व्यवसाय करू शकता. नोकरींच्या मागे लागण्यापेक्षा असा कौशल्यावर आधारीत व्यवसाय करणे केव्हाही चांगले. यात जागरूक असाल तर भरपूर ज्ञान आणि पैसा कमवाल.


असाच एक व्यवसाय ई सेवा, डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन. आजकाल भारतातील अनेक कामे इंटरनेटच्या साहाय्याने होतात. सर्व सामान्य माणसाला जरी इंटरनेटचे ज्ञान असले तरी सरकारी प्रोसिजरचे नसते. अशा वेळी ह्या ई सेवा उपयोगात येतात. या साठी काही मोठ्या कंपन्या फ्रंचाईझ सुद्धा देतात.


कोणी म्हणेल असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी तर वाट बघत बसावे. 


माधव भोळे 

No comments:

Post a Comment