Thursday, June 25, 2026

पांढऱ्या पटट्या!

पांढऱ्या पटट्या!


गेले काही दिवस पांढऱ्या पटट्या हा विषय महाराष्ट्रातील विशेषत: मुंबईतील समाज माध्यमातून घोळत आहे. अर्थात काही राजकारणी त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न सुद्धा करीत आहेत. 


त्या पांढऱ्या पटट्याचे जेव्हडे म्हणून अन्वयार्थ काढता येत असतील तेव्हढे काढले गेले, जेव्हडे त्या पट्टे काढणाऱ्याला सुद्धा ते काढतांना माहिती नसतील. त्यातील एक अर्थ म्हणजे दोन समूहातील श्रेष्ठता मग ती धर्म, जात, भाषा, रंग आणि आता आर्थिक स्थिती ह्या बद्धल. 


काही लोकांच्या मते मराठी माणूस आर्थिक दृष्ट्या तुलनेने कमी पडतो म्हणून अशी हिम्मत इतर लोक करतात. पण मराठी माणसाला आपली आर्थिक स्थिती सुधारायला किंवा मजबूत करायला ना कायद्याचे किंवा संविधानाचे बंधन आहे. पण आमच्या सर्व मंडळींचा फोकस आणि वेळ नेत्यांच्या समोर ट्रॅक्टर आणून गुलाल उधळणे, त्या नेत्यासमोर उपोषणे करणे आणि सोडणे, आंदोलनासाठी पैसे जमा करणे, गावोगावी शिमगा, गणपती, यात्रा, मंदिरे यासाठी बॅनरवर फोटो झळकण्यासाठी रात्रंदिवस मेहेनत करणे. गावातील जमिनी विकण्यासाठी दलाली करणे आणि पार्ट्या झोडणे. म्हणजे जवानीमध्ये जों वेळ देवाने काहीतरी करून दाखवण्यासाठी दिलेला असतो तो असा मृगजळाच्या पाठी फुकट घालवणे आणि मग वय निघून गेल्यावर आम्हाला कोणी विचारत नाही म्हणून नशिबाला, नातेवाईकांना आणि समाजाला दोष देणे. 


आपल्या राज्यामध्ये अनेक मराठी लोक उत्तम व्यवसाय करतात आणि त्यांच्या गुणावर त्यांनी आपली खूप प्रगती केली आहे, परंतु इतर मराठी मंडळींनी किंवा होतकरू मराठी व्यवसायिकानी व्यवसाय करताना आपल्यातील काही दोष किंवा कमतरता शोधून काढून त्यावर उपाययोजना ते करत नाहीत म्हणून ते पाठी पडतात. 


व्यवसाय करण्याकडे उदासीनता, विवाह जुळण्यामध्ये येत असलेला अडथळा, सातत्य नसणे, शब्दाची किंमत नसणे, ग्राहकाला सांभाळण्यासाठी लागणारी नम्रता असणे, बँक आणि इतर व्यवहार करण्यासाठी लागणारी व्यवहार चातुर्यता नसणे, फाजील आत्मविश्वास, एक घाव दोन तुकडे ( लवचिकतेचा अभाव ) अशा एक ना अनेक कमतरता आपल्यामध्ये असतात. त्या सुधारण्यासाठी लागणारे प्रशिक्षण कोणत्याही शाळेत मिळत नसून ते आपणच निरीक्षणाने किंवा अनुभवाने घेऊ शकतो. पण ते न करता फक्त आणि फक्त दुसऱ्याला दोष देणे एव्हडेच आपण करतो म्हणून आपली आर्थिक स्थिती यथा तथाच असते.


आणि जगाचा नियमचं आहे कीं बळी तो कान पिळी. 


बिरबल आणि अकबराच्या गोष्टीमधून एक गोष्ट आपण शिकलो आहे कीं दुसरी रेषा न पुसता लहान करायची असेल तर तिच्या बाजूला आपण आणखीन एक मोठी रेषा काढायला हवी. त्याचप्रमाणे आपण आपले सर्व कर्तृत्व पणाला लावून आपली आर्थिक स्थिती मजबूत करायला हवी.


मी एक पुस्तक लिहिले आहे "मराठी पाऊल पडते पुढे" त्या मध्ये महाराष्ट्रातील २८ दिग्गज मराठी उद्योजकांच्या यशोगाथा लिहिल्या आहेत परंतु अशा पुस्तकांचा खप महाराष्ट्रात कमी आहे पण स्वामींच्या पोथीची पुस्तके किंवा इतिहास, राजकारण, जातीचा महिमा असलेली इत्यादि विषयावरील पुस्तके महाराष्टात भरपूर खपतात हा अनुभव आहे, त्याला कोण काय करणार. जेथपर्यंत मानसिकता बदलत नाही तेथपर्यंत आपण असेच राहणार.


केल्याने होत आहेरे मग केलेची पाहिजे.


माधव भोळे 

No comments:

Post a Comment