Thursday, July 2, 2026

चंपतराय आणि SIT

चंपतराय आणि SIT.


चंपत राय बन्सल,  विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष,  राष्ट्रीय स्वयंमसेवक संघांचे पूर्णवेळ प्रचारक, एक निस्सीम देशभक्त, एक निष्ठावंत समाज कार्यकर्ता आणि राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे माजी जनरल सेक्रेटरी. 


सध्या वादाच्या भोऱ्यात सापडलेली राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची दानपेटी आणि त्यामुळे बसलेली SIT या मुळे चंपत राय यांची चौकशी होणे साहजिकच आहे. जरी त्यांचे नांव प्राथमिक माहिती अहवाल ( FIR) मध्ये नसले तरी ज्या व्यक्तीवर राम मंदिर न्यासाची रोजच्या कारभाराची जबाबदारी आहे त्याची चौकशी होणे क्रमप्राप्त आहे. आणि जर त्यांची चौकशी होणार असेल तर त्याना त्यांच्या राम जन्मभूमी न्यासाच्या रोजच्या देखरेखीचा कोणताही नैतिक अधिकार रहात नाही त्यामुळे त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला किंवा त्यांना तो द्यावा लागला याने काही फरक पडत नाही.


अनेक लोकांचे म्हणणे आहे कीं काही लोक त्यांच्या वाईटावर आहेत आणि त्यामुळे त्यांना कट रचून त्यांचा काटा काढला गेला. पण जीं व्यक्ती आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडू शकत नाही त्याला त्या पदावर राहण्याचा अधिकारच नाही मग त्याचे पूर्व चारित्र्य कितीही स्वच्छ असो. येथे प्रश्न चरित्र्याचा आहेच पण क्षमतेचा सुद्धा आहे. एव्हडया मोठ्या कारभारावर लक्ष ठेवण्यास चंपत राय असमर्थ ठरले हे नक्की. तसें नसते तर एव्हडा मोठा घोटाळा राजरोस झाला नसता.


आता राहता राहिला प्रश्न कीं त्यांचा ह्या सर्व घोटाळ्यात आणि लुटीमध्ये थेट किंवा अप्रत्यक्षरित्या सहभाग होता का?  तसेच ह्या लु्टीमुळे त्यांना किंवा त्यांचा परिवार, नातेवाईक किंवा मित्र मैत्रिणी, हित संबंधि यांना लाभ झाला का? आणि तो लाभ त्यांनी मिळवून दिला का? 


तर त्याबाबतीत जेथपर्यंत सखोल चौकशी होत नाही आणि केस चा पूर्ण निकाल लागत नाही, आरोप पत्र निश्चित होत नाहीत तेथपर्यंत कोणालाही दोषी धरणे चूकच.


देव करो आणि चंपत राय ह्या सर्वातून सही सलामत सुटो आणि राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कार्य सज्जन विश्वास्तांचे हाती जाओ.


माधव भोळे 

रंगांची वाटणी??

रंगांची वाटणी??


पांढऱ्या रंगाच्या पटट्या मारल्यामुळे भडकलेले वातावरण शांत करण्यासाठी  काही जैन मंडळी राज ठाकरे यांना भेटायला गेली होती. 


खरे म्हणजे रंगाची निर्मिती देवांनी केली. आकाशातील इंद्रधनुष्या पासून ते फुलांतील आणि फुलपाखरातील विविध रंग, विविध रंगांचे पक्षी, पाने, फुले हीं निसंशय निसर्गाची निर्मिती आहे. असे असताना पांढरा रंग जैनांचा, हिरवा रंग इस्लामचा, भगवा रंग हिंदूंचा, निळा रंग आंबेडकरवादी बुद्धांचा, निळा आणि पिवळा रंग शिखांचा अश्या वाटण्या आपणच करून घेतल्या. त्या रंगावरून राजकारण आणि समाजकारण सुरू झाले, आणि त्यातून वाद.


पण इंद्रधनुष्याचे रंग कधी आपसात लढतांना दिसतात का? कधी ते आपला क्रम बदलतात का? जांभळ्या  ( violet ) रंगाने कधी लाल रंगाला म्हटले का कीं तुझ्या आणि माझ्या क्रमात अदलाबद्दल करूया?. 

फुलपाखराचे रंग एकाच पंखावर असताना त्यांची तक्रार आपण कधी ऐकली का? सिताफळ कधी सफरचंदाला म्हणाले का कीं तुझा रंग मला दे. 


मग आपणच आपसात असे का भांडतो? 

आपले धर्मपंडित आपल्याला कधीच सांगत नाहीत कीं शंकराला लाल फुल वाहू नका किंवा कृष्णाला पांढरे फुल वाहू नका. ते फक्त त्या देवतांचे प्रियफुल किंवा प्रिय रंग सांगतात. आमच्या अंबाबाईला आणि गणपतीला लाल रंग, कृष्णाला निळा, तर शंकराला सफेद रंग आवडतो.


आपला धर्म सांगतो कीं जसा भाव तसा देव. तुमच्या कडे अमुक फुल नाही तर तुम्ही दुसरे फुल वापरा, ते सुद्धा नसेल तर अक्षता वहा. त्या सुद्धा नसतील तर हळद पिंजर वहा. आपल्या देवांना कोणताही रंग वर्ज्य नाही. मग आपण फक्त भगव्यालाच का महत्व द्यायचे? बाकीच्या रंगांवरील आपले प्रेम कमी आहे का? 


सर्व रंग आमच्यासाठी समान प्रियतेचे असायला हवेत. व्यक्तिगत प्राध्यान आपले आपण ठरवू शकायला हवे. आम्हाला कोणी एकाच रंगाने बांधायची काय गरज आहे.


विचार करा


माधव भोळे