Saturday, January 24, 2026

पुण्य स्मरण !!

पुण्य स्मरण !!

मीं आणि माझे एक मित्र चर्चा करीत होतो. आजपर्यंत आपल्या आयुष्यात अनेक मंडळींनी कोणतीही अपेक्षा न ठेवता आपल्यासाठी काही ना काही मदत केली आहे. त्या लोकांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. त्याची परतफेड होणे शक्य नाही परंतु त्यांचे पुण्य स्मरण करणे कसे शक्य होईल? 


मीं त्या वेळी माझ्या आयुष्यातील एक गोष्ट त्याला सांगितली. माझी आई ज्यावेळी विवाह होऊन आमच्या गावी आली त्यावेळी आमच्या घरी आंब्याची कलमे किंवा विशेष झाडें नव्हती. या उलट मामाच्या घरी आणि त्यांच्या संपूर्ण गावात अनेक आंब्याची कलमे होती. ज्या वेळी मामा माझ्या आईला सासरी सोडायला आले त्यावेळी त्याने येताना आंब्याची ३ कलमे ( रोपे )आणली ती आमच्या शेतात लावली ( अर्थात त्याला पाणी घालण्याचे काम आमच्या आईकडील मंडळींनी केले). आज शंभर वर्ष होऊन गेली त्या तीन पैकी दोन झाडें अजूनही जिवंत आहेत ( एक वादळामध्ये मोडले) आणि आम्हाला एक वर्ष आड करून घरच्यापुरते आंबे त्या झाडापासून मिळतात. दरवर्षी आंबा खाताना आम्ही आमच्या मामाची आठवण काढतोच काढतो.


त्या वरून ही कल्पना सुचली की प्रत्येकाने आपल्या प्रियजनांसाठी किंवा आपल्याला निष्काम मदत करणाऱ्या व्यक्तीसाठी निरापेक्ष बुद्धीने एक तरी झाड लावायचे, मग त्याचा उपयोग कोणालाही झाला तरी चालेल. 


झाड जगले म्हणजे पशु पक्षीचे आणि सकल प्रणि्मात्रांचे जीवन समृद्ध होईल, लोकांना आणि श्रुष्टीला ऑक्सिजन नामक टॉनिक मिळेल आणि वातावरण बदला सारख्या समस्येवर उपाय म्हणून आपला खारीचा कां होईना, वाटा राहील. 


एकाने लिहिले आहे "एका डाळिंबा मध्ये किती दाणे आहेत तुम्ही मोजू शकता परंतु एका दाण्यापासून किती डाळिंब निर्माण होतील हे सांगणे अवघड आहे म्हणून सत्कर्म करीत रहा".


माधव भोळे

No comments:

Post a Comment