Tuesday, April 28, 2026

समर्थ रामदास स्वामीं आणि महाराष्ट्र धर्म

समर्थ रामदास स्वामीं आणि महाराष्ट्र धर्म 


बागेश्वरच्या धर्मेंद्र (शास्त्री) च्या बेताल वक्तव्यामुळे, प्रसिद्धी पासून दूर असलेले श्री समर्थ रामदास स्वामीं यांच्या कार्याला समाज माध्यमातून पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे. दासबोधा सारख्या पवित्र ग्रंथाची निर्मिती करणारे, स्वतः संसारी नसताना सुद्धा जगाचा संसार कसा चालावा याचा उपदेश करणारे, छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या राष्ट्रउभारणीच्या महान कार्यात आपल्या ११०० मठांचा आणि रामदासी परिवाराचा खारीचा पण महत्वपूर्ण वाटा उचलणारे, बाहुबली श्री हनुमानाच्या उपासनेद्वारे शक्तीची उपासना सर्वांनां शिकवणारे, बहिर्जी नाईकांच्या अत्यंत क्लिष्ट अशा हेरगिरीच्या कार्यात पत्र व्यवहाराद्वारे गुप्त संदेशांचे आदान प्रदान करण्याचे कौशल्य दाखवणारे, आणि उतारवायात नैसर्गिकरित्या विरक्तीचे विचार मनात येणाऱ्या महाराजांना, विरक्तीपासून परावृत्त करणाऱ्या समर्थ रामदास स्वामींच्या कार्याचा उजाळा त्यामुळे पुन्हा एकदा झाला. 


छत्रपती शिवाजीमहाराज हे स्वयंभू होते, त्यांना कोणाच्या सल्याची गरज नव्हती, तसेच जिजाऊ माता सोडता इतर कोणाच्या सांगण्यावरून त्यांनी राष्टउभारणीचे कार्य जरी हातात घेतले नसले तरी त्यांच्या तोडीच्या विविध माणसांसोबत ते नेहेमीच सल्ला मसलत करीत असत. लोकांमधील गुण दोष समजून घेऊन त्यांचा योग्य ठिकाणी उपयोग करण्याची कला छत्रपतीच्याकडे पहिल्यापासून अवगत होती. छत्रपती, समर्थ रामदासांना गुरु मानत किंवा नाही हा जरी चर्चेचा विषय असला तरी समर्थांचे ज्ञान, त्यांचा लोकसंग्रह आणि त्यातून आलेले अनुभवाचे शहाणपण याचा वापर छत्रपतीनी नक्कीच केला असावा. 


परंतु प्रत्येक ठिकाणी ब्राह्मण आणि अन्य मंडळीमध्ये वाद लावून आपल्या पोळीवर तूप ओढण्याचा प्रयत्न करणारे काही महाभाग लिहितात की समर्थांचे सर्व कार्य ब्राह्मणांना प्रोत्साहन देण्यासाठी होते. त्यांनी स्थापन केलेले मठ हे ब्राह्मणांची पोटे भरण्यासाठी होती, त्यावेळी मात्र चीड आल्याशिवाय रहात नाही.


जे समर्थ शिवरायांना सांगतात 

"मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा”

“आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मेळवावे”

“महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे"

 ते काही फक्त ब्राह्मण वर्गाचीं पोटे भरण्याचा संकुचित विचार करून नव्हे तर परकीय आक्रमणामुळे होत असलेली हिंदू धर्माची विटंबना आणि संस्कृतीचा ऱ्हास, हिंदूंवरील अत्याचार ह्याला पायबंद घालायला छत्रपतींसारखा पराक्रमी आणि धडाडीचा राजाच हे करू शकतो हे ते जाणून होते म्हणून.


पण ज्यांनी डोळ्यावर पटट्या बांधल्या असतील त्यांना उजेड कसा दिसणार?


असो. त्या महान छत्रपती शिवारायांना आणि श्री समर्थ रामदास स्वामींना माझा आदरपूर्वक नमस्कार.


माधव भोळे 

No comments:

Post a Comment