Thursday, December 22, 2022
डॉक्टर विश्वास पुराणिक, डोंबिवली - एक बहुआयामी व्यक्तिमत्त्
खरे म्हणजे जुन्या पिढीतील देवरूखे मंडळींना डॉक्टर पुराणिकांचा परिचय करून द्यायची काहीच आवश्यकता नाही, परंतु आपल्या सुदैवाने जेव्हा डॉक्टरांसारखी मंडळी गेले दोन पिढ्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून ते आता तिसऱ्या पिढीबरोबर सुध्दा खांद्याला खांदा लावून काम करत आहेत, अशा वेळी ह्या जुन्या मंडळींच्या कर्तृत्वआलेखाचा परिचय करून देणे आवश्यक आहे. डॉक्टर विश्वास पुराणिकांचा परिचय लिहायला मी घेतला आणि काय लिहू आणि किती लिहू असा मोठा प्रश्न पडला.
डॉ. पुराणिकांचा जन्म, रत्नागिरी जिल्ह्यातील फुणगुस ह्या खेडेगावी, २८ नोव्हेंबर १९५२ रोजी, एका मध्यम वर्गीय कुटुंबात झाला. हरहुन्नरी वडील, भिक्षुकी आणि इतर लहान मोठे व्यवसाय करून घर चालवत.डॉक्टर धरून, घरात एकंदर चार भावंडे. डॉक्टरांचे बालपण, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण फुणगुस येथे झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी आर. पी. गोगटे कॉलेज,रत्नागिरी येथे प्रवेश घेतला आणि काही काळ खाजगी वसतिगृह तसेच देवऋखे ज्ञाती आणि विद्यार्थी वसतिगृह येथे राहून आपला अभ्यास पूर्ण केला. एक हुशार आणि अभ्यासू विद्यार्थी म्हणून त्यांचा वसतिगृहात लौकिक होता असे त्यावेळचे विद्यार्थी अजूनही सांगतात. तेथे इंटर सायन्स पर्यंत अभ्यास केल्यानंतर पुढे त्यांना मुबई येथे सेंट जॉर्ज सरकारी दंतचिकित्सा विद्यालयात प्रवेश मिळाला. तेथे त्यांनी बॅचलर ऑफ डेंटल सर्जरीची परीक्षा पास करून आपला मुक्काम त्यावेळच्या होऊ घातलेल्या डोंबिवली शहराकडे वळवला आणि थोड्याच अवधीत १९७६ साली डोंबिवली पश्चिम, येथे दातांचा दवाखाना स्थापून आपल्या व्यवसायाचा जम बसवला.
आज पर्यंत देवरुखे ब्राह्मणांच्या एकंदर ६ परिषदा झाल्या त्यातील चौथी परिषद १९७८ साली डोंबिवली येथे झाली. त्यावेळी देवरूखे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष कै. डॉ. देविदास गणेश मुळे आणि उपाध्यक्ष कै. नारायण सखाराम वीरकर होते. डॉक्टर पुराणिक ह्यांना त्यावेळी देवरूखे समाजासाठी काम करण्याची पहिली संधी मिळाली आणि त्यांनी आपल्या कार्याचा ठसा त्या परिषदेवर उमटवला. त्या वेळी कै. नारायणरावांनी डॉक्टर पुराणिकांचे आपल्या घरी तोंडभरून केलेले कौतुक मला अजूनही चांगलेच आठवते.
त्या कामगिरीच्या जोरावर पुढे ते देवरूखे ब्राह्मण संघ, डोंबिवलीचे प्रथम तरुण अध्यक्ष झाले. त्या नंतर त्यांनी आपल्या कामाचा सपाटाच लावला. त्याकाळी देवरूखे ब्राह्मण संघाची स्वतःची वास्तू नव्हती. एका बाजूला डोंबिवली झपाट्याने वाढत चालली होती आणि दुसऱ्या बाजूला संघाची स्वतःची वास्तू नाही याची डॉक्टरांना खंत होती. त्यांनी आपला हा विचार आपल्या सर्व सहकार्यांना बोलून दाखवला आणि झाले, सर्व डोंबिवलीकर कामाला लागले. त्या सर्वांच्या सहकार्याने आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली संघाची एक शानदार वास्तू डोंबिवली शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी भरवस्तीत तयार झाली जीचे उद्घाटन त्यावेळचे प्रतिथयश सामाजिक नेते, शेयर ब्रोकर कै. लक्ष्मणराव भोळे यांनी केले. त्याचा लाभ आज सर्व समाज घेत आहे. याच दरम्यान त्यांच्या अध्यक्षतेखाली देवरुखे ब्राह्मण संघ डोंबिवलीचा नेत्रदीपक रौप्य महोत्सव ३ दिवस साजरा झाला. डॉक्टरांची दूरदृष्टी आणि नेतृत्व गुणाचा पहिला परिचय, देवरूखे समाजाला तेथूनच झाला.
त्यानंतर दुसरा टप्पा म्हणजे डोंबिवली जिमखाना. डॉक्टरांना खेळ आणि व्यायामाची फार आवड आहे. अजूनही ते टेनिसचे दोन डाव सहज खेळतात. त्यांच्या ह्या आवडीसाठी त्यांनी त्यावेळी नुकताच सुरू झालेला डोंबिवली जिमखाना गाठला. त्यांचे संभाषण कौशल्य, सर्वांना बरोबर घेवून काम करण्याची हातोटी, नियोजन आणि कडक आर्थिक शिस्त या मुळे थोड्याच अवधीत तेथील उच्चभृ, सुशिक्षित व्यवस्थापकीय मंडळात त्यांना स्थान मिळाले. १९९७ साली झालेल्या डोंबिवली जिमखान्याच्या व्यवस्थापकीय मंडळाच्या प्रथम निवडणुकीत त्यांना पहिल्याच वेळी सर्वोच्च मते मिळाली. त्यांनी हा त्यांचा रेकॉर्ड पुढील ४ निवडणुकांमध्ये कायम ठेवला. त्यानंतर काही काळ ते त्या समितीचे अध्यक्ष सुध्दा झाले. आता सुद्धा ते जिमखान्याच्या कार्यकारी समितीचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
हे करत असताना त्यांच्यातील कार्यकर्ता त्यांना स्वस्थ बसून देत नव्हता. ज्या वैद्यकिय क्षेत्रात ते काम करतात त्यातील विविध समस्या त्यांनी जवळून पाहिल्या असल्यामुळे, समाजातील गोर, गरिबांना येणाऱ्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन वैद्यकिय मदत निधी स्थापन करण्याच्या उद्देशाने त्यांनी २००० साली देवरूखे ब्राह्मण समाजाची पाचवी, परंतु प्रथमच एक जागतिक परिषद डोंबिवली येथे भरवली. अत्यंत सुनियोजित, सर्व देवरूखे ब्राह्मणांना एकत्र आणणारी, नेत्रदीपक, भरगच्च, तरीसुद्धा खर्चावर नियंत्रण असणारी आणि नवीन कार्यकर्त्यांची एक फळी निर्माण करणारी ही जागतिक परिषद भरविण्यात अध्यक्ष म्हणून ते यशस्वी झाले. जगभरातून सुमारे २,५०० देवरुखे प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित होते. त्या परिषदेच्या माध्यमातून निर्माण झालेल्या निधीतून वैद्यकिय मदत निधी सन २००१ साली स्थापन झाला, ज्याचा लाभ आज सर्व समाज घेत आहे. या वर्षी वैद्यकिय मदत निधी २१ व्या वर्षात पदार्पण करत असून त्यानिमित्त एक शानदार सोहोळा फुणगुस येथील श्री सिध्दी विनायकाच्या साक्षीने २८ जानेवारी २०२३ रोजी होत आहे आणि त्यासाठी सर्व ज्ञाती बांधवांनी उपस्थित रहाण्याचे निमंत्रण त्यांनी जाहीर रित्या दिले आहे.
डॉक्टर पुराणिक ही बहुआयामी व्यक्ती म्हटले तर वावगे ठरणार नाही. आपले कर्तृत्व आणि नेतृत्व फक्त देवरूखे समाजापूरतीच मर्यादित न ठेवता, १९४९ साली स्थापन झालेल्या जवळजवळ ७५,०००० दंतवैद्यक सभासद, २८ राज्य, ८ केंद्र शासित प्रदेश, १ संरक्षण शाखा, ह्या मध्ये ४५० स्थानिक शाखा असलेल्या इंडियन डेंटल असोसिएशनच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याचा बहुमान त्यांना २०१६-१७ मध्ये मिळाला. त्या वर्षभरात त्यांनी अनेक राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी इंडियन डेंटल असोसियेशन चे अध्यक्ष म्हणून भेटी दिल्या आणि तेथील विविध विषयावरील परिषदांना आणि कार्यक्रमांना संबोधित केले. सध्या इंडियन डेंटल असोसिशनच्या आंतरराष्ट्रीय समितीचे उपाध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत.
या पुढील कळस म्हणजे औपचारिक शिक्षण सोडल्यानंतर जवळजवळ १७ वर्षांनी, १९९३ ला त्यांनी आपले एल. एल. बी. चे शिक्षण पूर्ण करून शिक्षणाला आणि कर्तुत्वाला वय नसते हे पुढील पिढीला दाखवून दिले. त्यानंतर दंतचिकित्सा व्यवसायातील, मेडिको लीगल तज्ञ म्हणून आपले अनुभव आणि कायदेशीर ज्ञान त्या व्यवसायातील व्यवसायिकांना प्रसार करण्यास त्यांनी सुरवात केली. देशातील एक प्रमुख डेंटल मेडीको लीगल एक्स्पर्ट म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी आजवर वक्ता म्हणून त्यांनी प्रत्यक्ष तसेच दूरसंचार माध्यमातून भाषणे दिली आहेत.
हे सर्व करीत असताना ते आपले मूळ गाव फुणगुस विसरले नसून, तेथील "श्री सिद्धिविनायक गणपती देवस्थान ट्रस्ट, फुणगुस" ह्या न्यासाचे ते अध्यक्ष असून त्या न्यासातर्फे नुकतेच सुंदर अशा नवीन गणेश मंदिराचे बांधकाम आणि प्राणप्रतिष्ठा समारंभ करण्याचा मान त्यांना मिळाला. देवरुखे ब्राम्हण समाजाच्या "विध्यार्थी सहायक संस्थेच्या" विश्वस्त पदी सुद्धा काहीकाळ त्यांनी काम केले आहे.
त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून; त्यांना ब्राह्मण सभा, डोंबिवली तर्फे "डोंबिवली धन्वंतरी पुरस्कार २००२" दिला गेला. हा पुरस्कार मिळवणारे डॉक्टर पुराणिक हे डोंबिवलीतील पहिलेच दंतवैद्यक आहेत. २०१७ साली, महाराष्ट्राचे त्यावेळचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्या डोंबिवली मॅगझीन तर्फे दिला जाणारा "आदर्श डोंबिवलीकर पुरस्कार" त्यांना प्रदान झाला. इंडियन डेंटल असोसिएशनच्या डोंबिवली शाखेतर्फे "लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड" त्यांना प्राप्त झाला आहे. तसेच, देवरुखे ब्राह्मण संघ डोंबिवली तर्फे "देवरुखे भूषण" हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे.
नुकतीच त्यांनी आपल्या वयाची ७० री पूर्ण केली असली तरी त्यांनी त्यांचा व्यवसाय, त्यांचे समाज कार्य, अभ्यास आणि व्यायाम या सर्व विषयात प्रगती सुरूच ठेवली असून वय हा फक्त एक आकडा असून मनाची ताकद हीच खरी ताकद आहे हे सिद्ध करून दाखवले आहे.
त्यांच्या वरील सर्व कार्यात त्यांच्या सूविद्य पत्नी ऍडव्होकेट सौ. स्वातीताई यांची संपूर्ण साथ असते. त्यांचा मोठा सुपुत्र डॉ. स्वरूप आणि त्याची सुविद्य पत्नी डॉ. अक्षता, दोघेही मास्टर ऑफ डेन्टिस्ट्री असून इंटरनॅशनल ग्लॅमर प्रोजेक्ट ह्या कंपनीचे ते डायरेक्टर आहेत, त्यांना “मिरका” नावाची लहान मुलगी आहे, तर धाकटा सुपुत्र ऋषिकेश आणि त्याच्या पत्नी अस्लेषा दोघेही BE, MS ( USA) असून दोघेही अमेरिकेत आय टी क्षेत्रात कार्यरत असून त्यांना “सारा” नावाची एक लहान मुलगी आहे.
देश सेवा करताना प्रत्येकाने सीमेवर लढाई करायला हवी असे नाही. त्यांची वरील भव्य कामगिरी ही नक्कीच देशसेवा आहे असे मी समजतो. देव त्यांना दीर्घायुष्य देवो आणि त्यांचे हातून देवरुख्यांसहित सर्व समाजाची अशीच चांगली सेवा घडो ही प्रार्थना, मी ईश्वर चरणी करतो.
माधव भोळे.
Saturday, October 22, 2022
प्रणामी संप्रदाय !!
"कलीमपुंग येथील मंगलधाम मंदिर"
भारत हा वेगवेगळ्या संस्कृती, जाती, धर्म, पंथ, सांप्रदायांचा बनलेला देश आहे असे आपण शिकलो आहे. महाराष्ट्रात असल्यामुळे आपल्याला हिंदू धर्मातील वारकरी पंथ, महानुभाव पंथ, नाथ पंथ या सारख्या पंथांबद्दल थोडीफार माहिती असते. असाच एक हिंदू धर्मातील संप्रदाय, ज्याचा प्रसार, अफगाणिस्थान, नेपाळ, गुजरात, मध्य प्रदेश, संपूर्ण पूर्वोत्तर भारतात झाला आहे, त्याचे नाव आहे प्रणामी संप्रदाय. जगभर यांचे ५० ते ६० लाख अनुयायी आणि ६०० सेवा केंद्रे आहेत.
नुकतेच पश्चिम बंगाल मधील कलीमपुंग ( Kalimpong) ह्या थंड हवेच्या ठिकाणी गेलो होतो. समुद्र सपाटीपासून ४५०० फूट उंच, दऱ्या खोऱ्यात वसलेले कलीमपुंग शहर, देवोलो पर्वत आणि रेली नदीच्या किनारी, वनश्रीने नटलेले, अतिशय सुंदर शहर आहे. हीच रेली नदी पुढे पश्चिम बंगाल मधील प्रसिद्ध तीस्टा नदीला मिळते. तेथे मंगल धाम ह्या स्वछ, भव्य आणि सुंदर अशा धार्मिक स्थळाला भेट दिली. १९४० साली प्रणामी संप्रदायाचे गुरु मंगलदासजी महाराज येथे वास्तव्यास आले आणि येथील शांततेच्या आणि सृष्टी सौंदर्याच्या प्रेमात पडले. आपण मनात आणलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी हेच योग्य ठिकाण आहे याची त्यांना खात्री झाली. पश्चिम बंगाल, सम्पुर्ण पूर्वोत्तर भारत आणि नेपाळ ह्या प्रदेशात त्यांनी जवळजवळ १५० मंदिरे उभारली. मंगलजी महाराजांनी या पूर्वोत्तर भारत तसेच नेपाळ येथील वेगवेळल्या वांशिक गटाच्या लोकांना धर्माची गोडी लागावी यासाठी सेवा हा मार्ग निवडून शाळा, कॉलेजेस, धार्मिक दवाखाने यांचे एक प्रचंड जाळेच उभारले.
प्रणामी संप्रदाय हा एक हिंदू संप्रदाय आहे ज्यामध्ये अनुयायी समाविष्ट आहेत जे "राजजी" (सद्चित्त आनंद) यांना सर्वव्यापी देव मानतात. हा संप्रदाय इतर धर्मांप्रमाणे अनेक देवांवर विश्वास ठेवत नाही. हा संप्रदाय जाती भेद किंवा धर्म भेद मानत नाही तसेच सर्व मानवांचा एकच ईश्वर आहे असे मानतो. तो कृष्णाला सर्वश्रेष्ठ ईश्वर मानतो. ४०० वर्षांपूर्वी तयार झालेला हा संप्रदाय प्राणनाथ स्वामीला ईश्वराचा पवित्र अवतार मानतो. याची स्थापना देवचंद्र महाराज यांनी केली होती. त्यांचे शिष्य प्राणनाथ स्वामी आणि त्यांचे शिष्य बुंदेलखंडाचे राजे महाराज छत्रसाल यांनी त्याचा प्रचार केला होता . हा पंथ “एक जग एक ईश्वर“ अशी संकल्पना मान्य करतो. जामनगरमधील नवतनपुरी धाम हे प्रणामी धर्माचे मुख्य तीर्थक्षेत्र आहे. याला श्री कृष्ण प्रणामी धर्म किंवा निजानंद संप्रदाय किंवा पर्नामी संप्रदाय असे देखील म्हणतात.
परब्रह्म परमात्मा श्री राजजी ( श्री कृष्ण ) आणि त्यांच्या सहपत्नी श्री श्यामा महाराणीजी या विश्वाचे पालनकर्ते आणि निर्माते आहेत. या पंथातील सर्वात महत्त्वाचा ग्रंथ सखी इंद्रावती यांनी लिहिला होता, ज्याचा जन्म स्वतः प्राणनाथाच्या मानवी रूपात झाला होता असे ते मानतात. भगवंतांनी प्रणाम्योला ब्रह्मआत्मा म्हणून घोषित केले आहे. म्हणजेच परमात्मस्वरूप ब्रह्मात्म्याच्या आत वास करतो. हे ब्राह्मण श्री राजजी आणि श्यामा महाराणीजी यांच्यासोबत गोपींच्या रूपात सर्वोच्च निवासस्थानात राहतात. भगवंताचा पहिला अवतार म्हणजे श्री कृष्ण (गोपी कृष्णाच्या रूपात केवळ 11 वर्षे 52 दिवस, कृष्ण हा विष्णू अवतार होता. कृष्णाने दैवी अवतारात गीता देखील सांगितली आहे - अवतारी अवतारात.)
इतिहास
देवचंद्रजी महाराज (१५८१-१६५५), यांचा जन्म सिंध प्रांतातील उमरकोट गावात झाला . संतवृत्ती बालपणीच त्यांच्यात दिसून आली. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी ब्रह्मज्ञानाच्या शोधात जगाचा निरोप घेतला, प्रथम कच्छमधील भुज आणि नंतर जामनगरला . देवचंद्रजींनी धर्माच्या एका नवीन प्रवाहाला शोधून ठोस आकार देण्याचे काम केले , ज्याला ते निजानंद संप्रदाय म्हणतात. ते जामनगर येथे स्थायिक झाले, जिथे त्यांनी धार्मिक भेद आणि सामाजिक वर्गाचा अनादर करणार्या व्यक्तींना सोप्या भाषेत वेद , वेदांत ज्ञान आणि भागवत समजावून सांगितले आणि त्यांना "तरतम" शिकवले . त्याचे अनुयायी नंतरसुंदरला साथ किंवा प्रणामी म्हणून ओळखले जाऊ लागले. .
प्रणामी धर्माच्या पुढील प्रसाराचे श्रेय त्यांचे योग्य शिष्य आणि उत्तराधिकारी, प्राणनाथजी (मेहराज ठाकूर) (१६१८-१६९४) यांना जाते, जे जामनगर राज्याचे दिवाण केशव ठाकूर यांचे पुत्र होते . धर्मप्रसारासाठी त्यांनी भारतभर प्रवास केला. त्यांनी कुलजम स्वरूप नावाची रचना केली, जी गुजराती , सिंधी , अरबी , पर्शियन , उर्दू आणि हिंदी अशा सहा भाषांमध्ये लिहिली गेली ., तसेच इतर अनेक लोकप्रिय भाषांमधील शब्दही त्यात घेतले होते. कुलजम स्वरूप उर्फ कुल्झम स्वरूप आणि मेहर सागर नावाचे त्यांचे कार्य, आता धर्माचा मुख्य ग्रंथ आहे. त्यांच्या हयातीत त्यांनी हरिद्वार येथील कुंभमेळ्यालाही हजेरी लावली आणि त्यांच्या काळातील अनेक संत आणि धार्मिक नेत्यांना भेटले, जे त्यांच्या बुद्धिमत्तेने आणि सामर्थ्याने प्रभावित झाले.
प्राणनाथ स्वामी, महामती, आणि महेराज या नावानेही ते ओळखले जातात. इन्द्रावती या नावाने ते काव्यरचना करतात. वडिलांचे नाव केशव ठक्कर, आईचे नाव धनबाई. गुजरातमधील जामनगर हे त्यांचे मूळगाव. ज्ञाती लोहाणा. निजानंद संप्रदायाचे संस्थापक देवचंद्र यांच्याकडून १६३१ ला त्यांनी दीक्षा घेऊन प्राणनाथ हे नाव धारण केले. ते बुंदेलखंडाचा राजा छत्रसाल यांचे गुरू होते. त्यांनी देशात अनेक ठिकाणी, अनेक स्थानी व देशाबाहेर थेट अरबस्तानपर्यंत प्रवास केला. अरबीसारख्या विविध भाषांचे ते जाणकार होते व इस्लाम, ख्रिस्ती यासारख्या धर्मांचा त्यांचा सखोल अभ्यास होता. सामाजिक व धर्मपातळीवर समन्वय साधण्याविषयी ते सतत प्रयत्नशील असत. त्यांच्या कित्येक हिंदी पदरचनेत ‘महाजन/महामति’ हे कविनाम धारण केलेले दिसत असून ती प्रणामी पंथाची विशिष्ट दार्शनिक अवस्था दाखविणारी पारिभाषिक संज्ञा आहे. या संप्रदायांच्या मंदिरातील पूज्य असा बृहद् ग्रंथ म्हणजे तारमतसागर/ श्रीजमुखवाणी/ कुलजमसरूप हा असून त्यात प्राणनाथांच्या कीर्तनसंचयासमवेत गुजराती, हिंदी, उर्दू, सिंधी आणि अरबी भाषेतल्या १४ कृतींचा संग्रह आहे. कीर्तनात महामती, महेराज अशी नाममुद्रा धारण करणाऱ्या या कवीने गुजराती रचना इन्द्रावती या नाममुद्रेखाली लिहिल्या आहेत. त्यात सहा ऋतू, अधिकमास आणि कलशाच्या आठ खंडात मल्हार, वसंत, धुमार, धन्याश्री इ. विविध रागातील १७६ कडीचे षड्ऋतुवर्णन तर एकट्या मल्हार रागात रचलेले ११९ कडीचे विरहनी बारमासी या वैशिष्ट्यपूर्ण कृती आहेत, तसेच षडऋतु या एकाच शीर्षकाखाली रचलेल्या संप्रदायभक्तीच्या व कृष्णवियोग निरूपण करणाऱ्या या दोन कृती सर्वात अधिक नोंदपात्र आहेत. त्यांच्या रासग्रंथ, प्रकाश, कलशग्रंथ, श्रीनाथजीनो शणगार, वैराटवर्णन इ. अनेक कृतीही लक्षणीय आहेत.
बुंदेलखंडचे महाराजा छत्रसाल (१६४९-१७३१) हे महामती प्राणनाथजींचे प्रखर शिष्य आणि प्रणामी धर्माचे अनुयायी होते. त्यांची भेट १६८३ मध्ये मध्य प्रदेशातील पन्नाजवळील महू येथे झाली . त्यांचे पुतणे देवकरण जी, ज्यांनी यापूर्वी रामनगर येथे स्वामी प्राणनाथ जी यांची भेट घेतली होती, त्यांनी या भेटीत मोलाचा वाटा उचलला होता. छत्रसाल हे प्राणनाथजींवर खूप प्रभावित झाले आणि ते त्यांचे शिष्य बनले. महाराज छत्रसाल त्यांना भेटायला आले तेव्हा ते मुघलांविरुद्ध युद्ध करायला निघाले होते. स्वामी प्राणनाथजींनी त्याला आपली तलवार दिली, त्याचे डोके स्कार्फने झाकले आणि म्हणाले "तू नेहमी विजयी होशील. तुझ्या देशात हिऱ्याच्या खाणी सापडतील आणि तू महान राजा होशील." त्याचे भाकीत आजही खरे ठरले. पन्ना प्रदेश हिऱ्यांच्या खाणींसाठी प्रसिद्ध आहे. स्वामी प्राणनाथ हे केवळ छत्रसालचे धार्मिक गुरू नव्हते; तर त्यांना राजकीय, सामाजिक आणि आर्थिक बाबतीतही त्यांनी मार्गदर्शन केले. पन्नामध्ये हिरे मिळणे हे स्वामी प्राणनाथजींनी दिलेले वरदान होते, त्यामुळे महाराजा छत्रसाल समृद्ध झाले.
"पन्ना, मध्य प्रदेश येथील प्राणनाथ स्वामी मंदिर. "
महात्मा गांधींच्या आई पुतलीबाई या प्रणामी पंथाच्या होत्या. गांधींचे स्वतःचे सत्याचे प्रयोग या पुस्तकात या पंथाचा उल्लेख आहे "ज्या संप्रदायात कुराण आणि गीता या दोन्हीमधील सर्वोत्कृष्ट गोष्टी प्राप्त होतात, एकच ध्येय - ईश्वराचा शोध."
पवित्र ग्रंथ
तरतम सागर हा महामती प्राणनाथ जी यांनी देश-विदेशात धर्माच्या प्रचारासाठी दिलेल्या शिकवणींचा संग्रह आहे, ज्यामध्ये प्रणामी धर्माची संपूर्ण तत्त्वे आणि तत्त्वज्ञान समाविष्ट आहे. चौदा कार्यांचे हे पवित्र संकलन वैदिक ग्रंथ, कातेब (सेमिटिक ग्रंथ - कुराण , तोराह , दाऊद आणि बायबल स्तोत्रे ) तसेच सर्वोच्च निवासस्थान , परमधाम , ज्याला मुस्लिम अर्शे अझीम (लाहुत) म्हणतात यावर आधारित आहे. आणि ख्रिश्चन सर्वोच्च स्वर्ग. प्रकटीकरण यावर त्यांनी लिहिलेले भाष्य आहे. या पवित्र संकलनामुळे दैवी ज्ञान प्राप्त होते. श्री कृष्ण प्रणामी श्रद्धेचे अनुयायी स्वतः परमेश्वराप्रमाणे या पवित्र ग्रंथाची पूजा करतात. तरतमसागरात रास, प्रकाश, शत्रुतु, कलश, सनंध, किरणतन, उखलक, खिलवत, परिक्रमा, सागर, सिंगार, सिंधी, मारफत सागर आणि कयामतनामा या चौदा कामांचे संकलन आहे. त्यात एकूण १८७५८ चौप्या संकलित केल्या आहेत.
अक्षरातीत श्रीकृष्णाचे वर्णन शास्त्रात पुढीलप्रमाणे केले आहे-
चिदादित्यम् किशोरसंगं परेधाम्नि विराजितम् ।
स्वरूपं सच्चिदानंदं निर्विकारम् सनातनम् - ब्रह्मवैवर्त पुराण
"चिदादित्य (सर्वकाळ चमकणारा), बाल अवयव असलेला, परमधाममध्ये विराजमान, सच्चिदानंद रूप, अपरिवर्तनीय आणि शाश्वत"
अध्यात्मिक गैरसमजाचा अंधार दूर करण्यासाठी तरतम नावाच्या या महान तत्त्वज्ञानाच्या आगमनाचा इतिहास आहे आणि या श्रद्धेचे संस्थापक सतगुरु देवचंद्र जी आणि महामती प्राणनाथ जी यांचे जीवनचरित्र आहे, ज्यांचे जीवन देवत्वाचा साक्षात्कार घडवणाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. आणि शाश्वत आनंद. जागृत आत्मा स्वामी लाल दास जी, भगवान परम यांचे पत्नी आणि इतर अनेक जागृत आत्मे यांनी नोंदवलेला त्यांच्या जीवनाचा लेखाजोखा ज्ञान आणि मोक्षप्राप्तीच्या मार्गांची रूपरेषा दर्शवितो.
प्रणामी श्रद्धेच्या नेत्यांनी आणि इतर धार्मिक विद्वानांनी लिहिलेली इतर अनेक पुस्तके जगभरातील अनेक ग्रंथालये आणि प्रणामी मंदिरे आणि संस्थांमध्ये वाचकांसाठी उपलब्ध आहेत.
पवित्र तीर्थयात्रा
जामनगर नवतानपुरी धाम, जामनगर हे प्रणामी धर्माचे तीर्थक्षेत्र आहे कारण देवचंद्रजींना येथे दैवी ज्ञान प्राप्त झाले होते. देवचंद्रजींनी एकदा दात साफ करून त्याच जमिनीत दात गाडले होते, ज्याचा मोठा वृक्ष झाला होता, अशी श्रद्धा आहे. आज 400 वर्षांनंतरही तो तिथे आहे आणि त्याला खिजडा वृक्ष आणि मंदिराला खिजरा मंदिर म्हणतात .
प्राणनाथ यांनी 17 महिने सुरतमध्ये प्रचारात घालवले. यादरम्यान, त्यांना सिंहासनाचे नेतृत्व देऊ केले गेले आणि त्यांच्या शिष्यांनी त्यांची महामती स्वामी प्राणनाथ या पदवीने पूजा केली. तेव्हापासून सय्यदपुराची ही संस्था श्री ५ महामंगलपुरी धाम किंवा मोटा मंदिर या नावाने प्रसिद्ध झाली.
ज्या वेळी औरंगजेब आणि त्याचे सरदार सर्व भारतभर देवळे आणि मूर्ती फोडत होते त्यावेळी स्वामी प्राणनाथ यांनी आपले १२ हिंदू आणि मुसलमान शिष्याना औरंगजेबाची भेट घेण्यासाठी पाठवले आणि कुराणाचा अर्थ विशद करून "ईश्वर एक आहे" हे समजावून सांगून त्याला मूर्ती भंजनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला होता. पन्ना जेथे प्राणनाथ महाराजा छत्रसाल यांना भेटले , त्यांना आशीर्वाद दिला आणि एक तलवार दिली ज्याला जलपुकर म्हणतात. या तलवारीने छत्रसालने महू येथे मुघल सैन्याचा पराभव केला. प्राणनाथने पन्नाच्या भूमीला हिऱ्याचे उत्पन्न देखील दिले, ज्याने छत्रसालला Murti बाशी लढण्यासाठी पैसे दिले. विंध्याचल पर्वत रांगेत नवा पन्ना उभारल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून प्राणनाथ यांनी ही भूमी निवडली आणि तेथे ‘श्रीजींचा ध्वज’ फडकवला. हा ध्वज आजही पाहायला मिळतो. प्राणनाथ यांनी पन्ना येथे 11 वर्षे वास्तव्य केले आणि येथेच परम निवासासाठी देह सोडला. हे ठिकाण मुक्तीपीठ म्हणून ओळखले जाते आणि तेथे स्थापन केलेल्या मंदिराला पद्मावतीपुरी धाम म्हणतात.
माधव भोळे
Friday, September 16, 2022
भोंडला
कॉपी पेस्ट
"भोंडला"
'सूर नवा ध्यास नवा' मध्ये अवधूत गुप्तेने लोकांना एक प्रश्न विचारला. गुजरात्यांचा गरबा तर आपल्याकडे काय असतं? कोणत्याही स्पर्धकाला उत्तर देता आलं नाही. मग प्रेक्षकांना विचारल्यावर दोन तीन जण भोंडला म्हणले. मग भोंडल्याचं एखादं गाणं कोणतं? हा दुसरा प्रश्न विचारल्यावर शुकशुकाट पसरला. मग एका काकूंनी 'एक लिंबू झेलू बाई' हे गाणं म्हणलं पण तेही अर्धवट. हे गाणं एकट्या अवधूत गुप्तेनी सलग गायलं. नंतर परीक्षणात तो म्हणाला की इतरांचे सण साजरे करताना आपण आपलं विसरत चाललो आहोत. हा आपला ठेवा आहे आणि हे आपल्याला जपलंच पाहिजे. हे भान आपली 'बनाना' आणि 'अॅपल' पिढीला घडवण्याऱ्या आपल्या लोकांना कळेल तो सुदीन.
अवधूत गुप्तेना या सगळ्यासाठी आपला सलाम 👌🏻👌🏻
"भोंडल्याची १६ गाणी"
भोंडला , भुलाई , हादगा अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखला जाणारा नवरात्रोत्सव आणि त्यातील लोकगीते काळाच्या ओघात लुप्त होत चालली आहेत , घरातल्या मोठ्या व्यक्ती , आजी यांना ती सारी लोकगीते अगदी तोंडपाठ होती , परंतु त्याची कुठेही नोंद न घेतल्याने संस्कृती , गाणी सारे काही विरून जाते आहे .
चला तर मग अशा दुर्मिळ लोकगीतांचे संकलन आपल्याकडे असणे गरजेचे नाही का ?
तीच परंपरा तीच गाणी आता आपल्या स्मार्ट वहीमध्ये ...अर्थात आपल्या
स्मार्टफोन मध्ये ...
आपली मैत्रीण गावाकडची असो कि शहरातील , सर्वानीच जपावा हा अनमोल ठेवा ...
लोकसंस्कृती आपण जपली तरच पुढच्या पिढीत त्याचे संक्रमण होऊ शकते , त्यामुळे आपल्या आई , बहीण , जावा , मैत्रिणी सगळ्यांना सुपूर्त करूयात हा "नवरात्रीचा अमूल्य ठेवा" ...
१ ) ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडून दे, करीन तुझी सेवा
माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी, पारवं घुमतय पारावरी
गोदावरी काठच्या उमाजी नायका, आमच्या गावच्या भुलोजी बायका
एविनी गा तेविनी गा
आमच्या आया तुमच्या आया, खातील काय दुधोंडे
दुधोंडयाची लागली टाळी , आयुष्य दे रे भामाळी
माळी गेला शेता भाता, पाऊस पडला येता जाता
पड पड पावसा थेंबोथेंबी, थेंबोथेंबी आडव्या लोंबी,
आडव्या लोंबती अंगणा
अंगणा तुझी सात वर्षे, भोंडल्या तुझी सोळा वर्षे
अतुल्या मतुल्या चरणी चातुल्या,
चरणी चारचोडे, हातपाय खणखणीत गोडे
एकेक गोडा विसाविसाचा, साड्या डांगर नेसायच्या
नेसा गं नेसा बाहुल्यांनो, अडीच वर्षे पावल्यांनो
****
२ ) श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं.
असं कसं वेडं माझ्या नशिबी आलं
वेडयाच्या बायकोने केले होते लाडू
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
चेंडू चेंडू म्हणून त्याने खेळायला घेतले
वेडयाच्या बायकोने केला होता चिवडा
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
केरकचरा म्हणून त्याने बाहेर फेकला
वेडयाच्या बायकोने केल्या होत्या करंज्या
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
होड्या होड्या म्हणून त्याने पाण्यात सोडल्या
वेडयाच्या बायकोने केल्या होत्या चकल्या
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
बांगडया बांगड्या म्हणून त्याने हातात घातल्या
वेड्याच्या बायकोने केले होते श्रीखंड
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
क्रीम क्रीम म्हणून त्याने तोंडाला फासले
वेड्याच्या बायकोने केल्या होत्या शेवया
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
गांडूळ गांडूळ म्हणून त्याने फेकून दिल्या.
वेड्याची बायको झोपली होती
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
मेली मेली म्हणून त्याने जाळून टाकले
****
३ ) नणंदा भावजया दोघी जणी
घरात नव्हतं तिसरं कोणी
शिंक्यावरचं लोणी खाल्लं कोणी
मी नाही खाल्लं वहिनीनी खाल्लं
आता माझा दादा येईल गं
दादाच्या मांडावर बसेन गं
दादा तुझी बायको चोरटी
असेल माझी गोरटी
घे काठी घाल पाठी
घराघराची लक्ष्मी मोठी
****
४) कृष्णा घालितो लोळण, आली यशोदा धावून || धृ ||
काय रे मागतोस बाळा, तुला देते मी आणून
आई मला चंद्र दे आणून, त्याचा चेंडू दे करून
असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं
कृष्णा घालितो लोळण, आली यशोदा धावून...||धृ||
आई मला विंचू दे आणून त्याची अंगठी दे करून
असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं
कृष्णा घालितो लोळण, आली यशोदा धावून....||२||
आई मला साप दे आणून त्याचा चाबूक दे करून
असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं
कृष्णा घालितो लोळण, आली यशोदा धावून...||३||
*****
५) एक लिंबू झेलू बाई दोन लिंबं झेलू
दोन लिंबं झेलू बाई तीन लिंबं झेलू
तीन लिंबं झेलू बाई चार लिंबं झेलू
चार लिंबं झेलू बाई पाच लिंबं झेलू
पाचा लिंबांचा पाणोठा
माळ घाली हनुमंताला
हनुमंताची निळी घोडी
येता जाता कमळं तोडी
कमळाच्या पाठीमागे लपली राणी
अगं अगं राणी इथे कुठे पाणी
पाणी नव्हे यमुना जमुना
यमुना जमुनाची बारिक वाळू
तेथे खेळे चिल्लारी बाळू
चिल्लारी बाळाला भूक लागली
सोन्याच्या शिंपीने दूध पाजले
पाटावरच्या गादीवर निजविले
निज रे निज रे चिल्लारी बाळा
मी तर जाते सोनार वाडा
सोनार दादा सोनार दादा
गौरीचे मोती झाले की नाही
गौरीच्या घरी तांब्याच्या चुली
भोजन घातले आवळीखाली
उष्टया पत्रावळी चिंचेखाली
पान सुपारी उद्या दुपारी..
*****
६ ) अक्कण माती चिक्कण माती , खळगा जो खणावा
अस्सा खळगा सुरेख बाई, जातं ते रोवावं
अस्सं जातं सुरेख बाई, रवा-पिठी काढावी
अश्शी रवा-पिठी सुरेख बाई करंज्या कराव्या
अशा करंज्या सुरेख बाई तबकी भराव्या
अस्सं तबक सुरेख बाई शेल्याने झाकावं
अस्सा शेला सुरेख बाई पालखीत ठेवावा
अशी पालखी सुरेख बाई माहेरी धाडावी
अस्सं माहेर सुरेख बाई खायला मिळतं
अस्सं सासर द्वाड बाई कोंडोनी मारीतं
अस्सं आजोळ गोड बाई, खेळायला मिळतं
*****
७ ) अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होता बत्ता
भुलाबाईला लेक झाला नाव ठेवा दत्ता ॥१॥
अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होता वाटी
भुलोजीला लेक झाली नाव ठेवा चाटी ॥२॥
अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होती भाकर
भुलाबाईला लेक झाला नाव ठेवा प्रभाकर ॥३॥
अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होता चेंडू
भुलोजीला लेक झाला नाव ठेवा बंडू ॥४॥
अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होता चष्मा
भुलाबाईला लेक झाली नाव ठेवा सुषमा / रेश्मा ॥५॥
अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होता रुपया बंधा
भुलोजीला लेक झाली नाव ठेवा चंदा ॥६॥
अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत ठेवला अडकित्ता
भुलाबाईला मुलगी झाली, नाव ठेवलं स्मिता ॥७॥
अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होता पाटा
भुलोजीला लेक झाला साखर खडी वाटा,
बाणा बाई बाणा, स्वदेशी बाणा, गाणे संपले खिरापत आणा ॥५॥
*****
८ ) कारल्याचा वेल लाव गं सुने ,लाव गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याचा वेल लावला हो सासुबाई लावला हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥१॥
कार्ल्याचा वेल वाढू दे ग सुने वाढू दे ग सुने
मग जा तू आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याचा वेल वाढला हो सासुबाई वाढला हो सासुबाई
आता तरी जाऊ का मी माहेरा माहेरा ॥२॥
कार्ल्याला फूल येऊ दे गं सुने येऊ दे गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याला फूल आलं हो सासुबाई आलं हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥३॥
कार्ल्याला फळ येऊ दे गं सुने येऊ दे गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याला फळ आलं हो सासुबाई आलं हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥४॥
कार्ल्याची भाजी कर गं सुने कर गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याची भाजी केली हो सासुबाई केली हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥५॥
कार्ल्याची भाजी खा गं सुने खा गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याची भाजी खाल्ली हो सासुबाई खाल्ली हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥६॥
आपलं उष्टं काढ ग सुने काढ ग सुने
मग जा तू आपल्या माहेरा माहेरा
माझं उष्टं काढलं हो सासुबाई काढलं हो सासुबाई
आता तरी जाऊ का मी माहेरा माहेरा
आणा फणी घाला वेणी जाऊ द्या राणी माहेरा माहेरा
आणली फणी घातली वेणी गेली राणी माहेरा माहेरा ॥७॥
*****
९ ) आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे सोमवार । शंकराला नमस्कार ।
आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे मंगळवार । देवीला नमस्कार ।
आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे बुधवार । बृहस्पतीला नमस्कार ।
आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे गुरुवार । दत्ताला नमस्कार।
आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे शुक्रवार । अंबाबाईला नमस्कार ।
आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे शनिवार । शनिला नमस्कार ।
आज कोण वार बाई । आज कोण वार ?
आज आहे रविवार । सूर्याला नमस्कार ।
*****
१०) काही भागात कारल्याचा वेल ,त्याची पाने गोल गोल तुला न्यायाला कोण कोण आलं.
....
(अशी सुरुवात आहे )
अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं?
दारी मूल सासरा
सासर्याने काय आणलं ग बाई ?
सासर्यानं आणल्या पाटल्या
पाटल्या मी घेत नाही, सांगा मी येत नाही,
चारी दरवाजे लावा ग बाई, झिप्रं कुत्र सोडा ग बाई ॥१॥
अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं?
दारी मूल सासू
सासूने काय आणलंय गं?
सासुने आणले गोट
गोट मी घेत नाही, सांगा मी येत नाही,
चारी दरवाजे लावा ग बाई, झिप्रं कुत्र सोडा ग बाई ॥२॥
अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं?
दारी मूल दीर
दीरानं काय आणलं ग बाई ?
दीरानं आणल्या बांगड्या
बांगड्या मी घेत नाही, सांगा मी येत नाही,
चारी दरवाजे लावा ग बाई, झिप्रं कुत्र सोडा ग बाई ॥३॥
अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं?
दारी मूल जाऊबाई
जावेनं काय आणलं ग बाई ?
जावेनं आणली नथ
नथ मी घेत नाहीं, सांगा मी येत नाही,
चारी दरवाजे लावा ग बाई, झिप्रं कुत्र सोडा ग बाई ॥४॥
अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं?
दारी मूल नणंद
नणदेने काय आणलंय गं?
नणदेने आणल्या तोरड्या
तोरड्या मी घेत नाही, सांगा मी येत नाही
चारी दरवाजे लावा गं बाई, झिप्रं कुत्र सोडा ग बाई ॥५॥
अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं?
दारी मूल नवरा
नवर्याने काय आणलंय गं?
नवर्याने आणलं मंगळसूत्र
मंगळसूत्र मी घेते, सांगा मी येते
चारी दरवाजे उघडा गं बाई, उघडा गं बाई
झिपर्या कुत्र्याला बांधा गं बाई, बांधा गं बाई ॥६॥
*****
११) सासरच्या वाटे कुचूकुचू काटे
माहेरच्या वाटे नारळ फुटे
कोण कोण पाहुणा आला गं बाई
सासरा पाहुणा आला गं बाई
सासऱ्याने काय काय आणले गं बाई
सासऱ्यानी आणल्या पाटल्या गं बाई
पाटल्या मी घेत नाही
सांगा मी येत नाही
चारी दारं लावा गं बाई
झिपरं कुत्रं सोडा गं बाई
सासरच्या वाटे कुचूकुचू काटे
माहेरच्या वाटे नारळ फुटे ...
कोण कोण पाहुणा आला गं बाई
नणंद पाहुणी आला गं बाई
नणंदेने काय काय आणले गं बाई
नणंदेने आणला पोहेहार गं बाई
पोहेहार मी घेत नाही
सांगा मी येत नाही
चारी दारं लावा गं बाई
झिपरं कुत्रं सोडा गं बाई
सासरच्या वाटे कुचूकुचू काटे
माहेरच्या वाटे नारळ फुटे ...
कोण कोण पाहुणा आला गं बाई
दीर पाहुणा आला गं बाई
दिराने काय काय आणले गं बाई
दिराने आणले गोठ गं बाई
गोठ मी घेत नाही
सांगा मी येत नाही
चारी दारं लावा गं बाई
झिपरं कुत्रं सोडा गं बाई
सासरच्या वाटे कुचूकुचू काटे
माहेरच्या वाटे नारळ फुटे
कोण कोण पाहुणा आला गं बाई
सासू पाहुणी आला गं बाई
सासूने काय काय आणले गं बाई
सासूने आणला राणीहार गं बाई
राणीहार मी घेत नाही
सांगा मी येत नाही
चारी दारं लावा गं बाई
झिपरं कुत्रं सोडा गं बाई
सासरच्या वाटे कुचूकुचू काटे
माहेरच्या वाटे नारळ फुटे ...
कोण कोण पाहुणा आला गं बाई
नवरा पाहुणा आला गं बाई
नवऱ्याने काय काय आणले गं बाई
नवऱ्याने मंगळसूत्र आणले गं बाई
मंगळसूत्र मी घेते
सांगा मी येते
चारी दारं उघडा गं बाई
झिपरं कुत्रं आवरा गं बाई
******
१२ ) हस्त हा जीवनाचा राजा
पावतो जनांचिया काजा
तयासी नमस्कार माझा ।।
दहा मधले आठ गेले
हस्ताची ही पाळी आली
म्हणोनी त्याने गंमत केली ।।
ज्याच्या योगे झाला चिखल
त्याही चिखलात लावल्या केळी ।।
एकेक केळ मोठालं
भोंडल्या देवा वाहिलं
*****
१३ ) माझ्या सुंद्रीचं लगीन
वराडी कोण कोण येणार, माझ्या सुंद्रीचं लगीन
भाऊ म्हणे मी भाऊ, आणीन नवरा पाहून
माझ्या सुंद्रीचं लगीन
बहिण म्हणे मी बहीण, करवली मी होईन
माझ्या सुंद्रीचं लगीन
बाप म्हणे मी बाप, खर्चीन हुंडा लाख
माझ्या सुंद्रीचं लगीन
आई म्हणे मी आई, करीन लग्नात घाई
माझ्या सुंद्रीचं लगीन
चुलता म्हणे मी चुलता, येईन जेवणापुरता
माझ्या सुंद्रीचं लगीन
चुलती म्हणे मी चुलती,
येईन वरातीपुरती
माझ्या सुंद्रीचं लगीन
मावसा म्हणे मी मावसा,
बसेन दागिन्यासरसा
माझ्या सुंद्रीचं लगीन
मावशी म्हणे मी मावशी, फराळाचे माझ्यापाशी
माझ्या सुंद्रीचं लगीन
मामा म्हणे मी मामा,
येईन सर्व कामा
माझ्या सुंद्रीचं लगीन
भट म्हणे मी भट,
धरीन अंतरपाट
माझ्या सुंद्रीचं लगीन
भटीण म्हणे मी भटीण, सगळ्याच पोळ्या लाटीन
माझ्या सुंद्रीचं लगीन
*****
१४ ) सासरच्या जाच सांगणाऱ्या ह्या मुली सासरची बढाई सुद्धा तेवढीच रंगवून सांगायच्या.
भुलाबाई भुलाबाई सासरे कसे गं सासरे कसे?
कचेरीत बसले हे वकील जसे गं वकील जसे ॥१॥
भुलाबाई भुलाबाई सासू कशा गं सासू कशा?
कपाळभर कुंकू पाटलीण जशा गं पाटलीण जशा ॥२॥
भुलाबाई भुलाबाई पुतणे कसे गं पुतणे कसे?
हातामध्ये घडी मास्तर जसे गं मास्तर जसे ॥३॥
भुलाबाई भुलाबाई जाऊ कशी गं जाऊ कशी?
हातामध्ये लाटणं स्वयंपाकीण जशी गं स्वयंपाकीण जशी ॥४॥
भुलाबाई भुलाबाई दीर कसे गं दीर कसे?
डोळ्यावर गॉगल डॉक्टर जसे गं डॉक्टर जसे ॥५॥
भुलाबाई भुलाबाई नणंद कशी गं नणंद कशी?
हातामध्ये घडी मास्तरीन जशी गं मास्तरीन जशी ॥६॥
भुलाबाई भुलाबाई पती कसे गं पती कसे?
जटातून गंगा वाहे शंकरजी जसे गं शंकरजी जसे ॥७॥
भुलाबाई भुलाबाई आपण कशा गं आपण कशा?
शंकराच्या मांडीवर पार्वती जशा गं पार्वती जशा ॥८॥
भुलाबाई भुलाबाई मुल कसे गं मुल कसे?
वाकड्या सोंडेचे गणपती जसे गं गणपती जसे ॥९॥
****
१५) माहेरचा बडेजाव सांगणाऱ्या स्त्रीला मुद्दाम हिणवणारे हे गाणे :-
'तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?'
'माझ्या ग माहेरच्यांनी दिल्या मला साखळ्या ।'
'असल्या कसल्या साखळ्या बाई फुलाच्या पाकळ्या ॥'
'तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?'
'माझ्या ग माहेरच्यांनी दिल्या मला पाटल्या ।'
'असल्या कसल्या पाटल्या बाई हाताल्या दाटल्या ॥'
'तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?'
'माझ्या ग माहेरच्यांनी दिले मला गोट ।'
'असले कसले गोट बाई हत्तीचे रोट॥'
'तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?'
'माझ्या ग माहेरच्यांनी दिली मला बिंदी ।'
'असली कसली बिंदी बाई कपाळाला चिंधी ॥'
'तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?'
'माझा ग माहेरच्यांनी दिला मला हत्ती ।'
'असला कसला हत्ती बाई उधळतो माती ॥'
'तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?
'माझ्या ग माहेरच्यांनी दिला मला गडी ।'
'असला कसला गडी बाई, मिजास बडी ॥'
'तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?'
'माझ्या ग माहेरच्यांनी दिली मला बाई ।'
असली कसली बाई तिला रीतच न्हाई
*****
१६ ) आड बाई आडोणी,
आडाचं पाणी काढोणी।
आडात पडली सुपारी,
आमचा भोंडला दुपारी ।।
आड बाई आडोणी
आडाचं पाणी काढोणी।
आडात पडली मासोळी
आमचा भोंडला संध्याकाळी ।।
आड बाई आडोणी
आडाचं पाणी काढोणी।
आडात पडली कात्री
आमचा भोंडला रात्री ।।
आड बाई आडोणी
आडाचं पाणी काढोणी।
आडात पडला शिंपला
आमचा भोंडला संपला
*********
जीवनाचे सार या भोंडल्या किंवा हादग्या मधे सांगितले आहे.
हस्त नक्षत्र परतीचा कधीही कुठेही न सांगता येणारा जोरदार पाऊस हत्ती सारखा ज्याला समोर ठेवून मुलींचे महिलांचे गाणे हसत खेळत म्हंटले जाते यामागे खूप खूप मोठ्ठे अनुभव जगण्यास छानसे संदेश दिलेले आहेत म्हणूनच भोंडला- हादगा हे मुलींनी, महिलांनी खेळत संस्कृती जपली पाहिजे & पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायला पाहिजे.
💃👍👏🍀🌸
मंजिरी दांडेकर मॅडम (माझ्या शाळेत ल्या) हांच्या फेसबुक वॉल वरून
महात्मा गांधी आणि नामदार गोपाळ कृष्ण गोखले.
महात्मा गांधी आणि नामदार गोपाळ कृष्ण गोखले.
महात्मा गांधी नामदार गोखल्याना आपले राजकिय गुरू मानत. गोखले काँग्रेस मधील मवाळ गटाचे अर्ध्वयु होत.
एकदा नामदार गोपाळ कृष्ण गोखले, महात्मा गांधींच्या आमंत्रणा वरून दक्षिण आफ्रिकेतील वंश वादाच्या लढ्या ची प्रगती बघण्यास तेथे गेले होते. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची भाषणे होत आणि त्याची तयारी ते आदल्या दिवशी करीत.
दररोज संध्याकाळी महात्मा गांधी फिरण्यासाठी बाहेर पडत. त्यानिमित्ताने शरीराला व्यायाम होतो अशी त्यांची धारणा. सतत दोन दिवस गोखलेजी त्यांचे कामाचे कारण देऊन गांधीबरोबर फिरायला बाहेर पडू शकले नाहीत.
शेवटी गोखले गांधीजींच्या पेक्षा मोठे असूनही गांधीजी गोखल्यांवर रागावले. म्हणाले आपल्याला खूप काम आहे याबद्दल दुमत नाही पण शरीराच्या व्यायाम पेक्षा जगात दुसरे कोणतेही मोठे काम असू शकत नाही. जर आपण बाहेर पडलात तर आपले शरीर आणि मन दोनहीं मोकळी होतील. या वयात आपल्याला उत्तम आरोग्याची आवश्यकता आहे. जर आपली तब्येत बिघडली तर सामान्य जनतेला मार्गदर्शन करण्याचे आणि न्याय देण्याचे काम कोण करणार?
गोखल्यानं ची खासियत म्हणजे ते एक अर्थ शास्त्रज्ञ होते. 26 मार्च 1902 साली ब्रिटिश पार्लमेंट ( इमपीरियल कौन्सिल ) मध्ये केलेल्या भाषणात त्यांनी आकडेवारीने सिद्ध केले की गेल्या 16 वर्षात भारतातील जनता दुष्काळात होरपळत असताना ब्रिटिश सरकारने जी इन्कम टॅक्स, मिठावरील टॅक्स, एक्ससाईज ड्युटी, कापसावरील ड्युटी तसेच शेतीचा महसूल यात केलेली वाढ किती अन्यायकारक आहे आणि त्यांनी ब्रिटिश सरकारकडे हे टॅक्सेस कमी करण्याची मागणी केली. त्याचा योग्य तो परिणाम होऊन टॅक्सेस मध्ये कपात केली गेली.
1895 मध्ये ब्रिटिश सरकारने भारतात होत असलेल्या इंग्लड च्या नाहक खर्चाबद्दल माहिती घेण्यासाठी वेलबी कमिशन पाठवले त्यात दादाभाई नवरोजी सोडून इतर 4 ब्रिटिश सदस्य होते आणि भारताच्या बाजूने गोपाळ कृष्ण गोखले आणि दिनशा वाछा भारताची बाजू मांडणार होते. या मध्ये गोखल्यानि पटवून दिले की भारत इंग्लंड व्यापारात ठराविक पद्धतीने ब्रिटिश पौंड आणि भारतीय रुपया याचा विनिमय होत नसल्यामुळे तसेच भरतातुन घेतलेल्या मालाची योग्य किंमत न दिल्यामुळे ( हल्ली ज्याला इन्कम टॅक्स च्या भाषेत ट्रान्सफर प्रयसिंग म्हणतात) भारतीय सरकारी खजिन्यात कायम तुटवडा दिसून येतो आणि त्याचे खापर इंग्लडचे सरकार भारतीय अर्थ व्यवस्थेवर फोडून तिला कायम कर्जबाजारी ठेवत आहे. या त्यांच्या मताशी सहमत होऊन या पुढे ब्रिटिश सरकार भारतीय अर्थव्यवस्थेवर आपल्या खर्चाचा बोज लादणार नाही तसेच फिक्स विनिमय रेट ठरवून व्यवहार होईल. त्याचा चांगला परिणाम भारताच्या खजिन्यावर होऊन अर्थसंकल्प शिलकीत व्हायला लागले.
माधव भोळे
भारतीय पोस्टल पिन कोड ला 50 वर्ष पूर्ण:
भारतीय पोस्टल पिन कोड ला 50 वर्ष पूर्ण:
काल ज्यावेळी भारताच्या स्वात्र्यंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली त्याच वेळी भारताने आणखी एक टप्पा गाठला. 15 ऑगस्ट 1972 ला भारताने प्रथमच पोस्टल पिन कोड ची व्यवस्था राबवली. ह्या गोष्टीला काल 50 वर्ष पूर्ण झाली.
आलेली पत्रे नीट विभागवार वेगळी करण्यासाठी पोस्ट आणि टेलीग्राफ खात्यात नोकरीत असताना श्रीराम भिकाजी वेलणकर यांनी त्यावर उपाय म्हणून पिन कोड पद्धती शोधून काढली. १५ ऑगस्ट १९७२ रोजी पिन कोड पद्धत अंमलात आणली गेली. त्यामुळेच श्रीराम भिकाजी वेलणकर यांना 'पिन कोड कोड' प्रणालीचे जनक म्हणतात. या पिनकोडमुळे बरीच कामं सोपी झाली हे खरं.
श्री वेलणकर हे भारतीय पोस्ट आणि टेलिग्राफ समितीचे वरिष्ठ सभासद आणि केंद्रीय दूरसंचार विभागाचे सचिव होते. ते एक संस्कृत तज्ञ सुद्धा होते आणि "देववाणी संस्कृतम" या त्यांच्या मुंबईतील संस्थेतर्फे त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांसाठी अनेक संस्कृत अभ्यासक्रम तयार केले आणि काही संस्कृत पुस्तके सुद्धा लिहिली. त्यांना माझे विनम्र अभिवादन.
माधव भोळे
नेट हिप्नॉटीसम
नेट हिप्नॉटीसम
नुकतेच 14 ऑगस्ट 22 ला शिवसंग्राम संघटनेचे मराठा नेते कै विनायकराव मेटे याचे दुःखद अपघाती निधन झाले आणि त्यानंतर इंटरनेट वर "रोड हिप्नॉटीसम" ह्या विषयावर काही पोस्ट फिरू लागल्या.
अशाच काही वेगवेगळ्या प्रकारच्या हिप्नॉटीझम मध्ये आपले अनेक अपघात / नुकसान होण्याची शक्यता असते पण त्याची जाणीव आपल्याला होत नाही. त्यातील एक म्हणजे नेट किंवा फेसबुक हिप्नॉटीसम किंवा तत्सम हिप्नॉटीसम हे होत असते.
आज सकाळचीच गोष्ट बघा. फक्कड पैकी चहा घेवून मी सोफ्यावर बसलो होतो आणि सौ. नि गॅसवर दूध ठेवले आणि मला म्हणाली थोडे दुधाकडे लक्ष ध्या आणि ती तिच्या कामाला बाहेर निघून गेली. जवळच मोबाईल होता त्यावर नेहमीच्या पोस्ट बघता बघता अचानक एक पोस्ट दिसली "बुक युवर रूम इन पुंतामिता" आणि एका महाकाय हॉटेलचे चित्र होते.
हे पुंतामिता नाव मी प्रथमच ऐकले होते त्यामुळे कुतूहल म्हणून मी सहजच नेट वर शोधायला सुरवात केली तर ते दक्षिण अमेरिकेतील मेक्सिको देशातील नियारीट राज्यातील 1500 एकर जमिनीचा खाजगी तुकडा असलेली मालमत्ता आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे तिन्ही बाजूने निळेशार स्फटिकासमान स्वच्छ असलेले पाणी असलेला बंडारसचा समुद्र किनारा. फोर सिझन हॉटेल्स चेन पैकी 177 हॉटेल रूम्स असलेले एक हॉटेल त्या ठिकाणी आहे तसेच सेंट रेगिस सारखी इतर ही काही उंची हॉटेल्स आणि खाजगी पर्यटक बंगले तेथे आहेत. वर्षभर सुसह्य आणि आल्हाददायक वातावरणामुळे अनेक पर्यटक तेथे येत असतात. पर्यटनाला पूरक म्हणून तेथे 20 रेस्टॉरंट ( भोजनालय), बार्स (दारूचे गुत्ते ), किराणा मालाची सुपर मार्केटस, कपड्यांची दुकाने, पर्यटन व्यवसाईकांची ऑफिसेस, सामुद्रिक आणि साहसी खेळाचे साहित्य पुरवणारी दुकाने इत्यादी पर्यटन व्यवसाया संबंधी पूरक वातावरण तेथे आहे. जगभरातील तसेच अमेरिकेतील श्रीमंत अशा कालिफोर्निया, सिलिकॉन व्हॅली मधील मंडळी येथे मजेसाठी येत असतात. ( यातील फोर सिझन हॉटेल हे बिल गेट्स ने लिलावात विकत घेतले).
एव्हडे सुंदर वर्णन वाचून मी मनाने तेथील फेसाळलेल्या समुद्र किनाऱ्यावर सर्फिंग करायला लागलो, नंतर एक शिडाची बोट होती त्यात बसलो आणि डोलकाठी वर लटकवलेल्या त्या शिडाची दोरी सोडून त्याला वाऱ्याच्या दिशेने फडकावून खोल समुद्रात बोटीने घुसलो. तेथील फेसाळलेले चमकणारे पाणी आणि ऑक्सिजनने परिपूर्ण शुद्ध हवा घेऊन तर मन अमृत प्याल्यासारखे प्रफुल्लित झाले. आता आणखी काही नको होते. स्वर्गसुख म्हणजे काय याची झलक येथेच आली होती.
एव्हढ्यात बेल वाजल्याचा आवाज कानावर आला. कसा बसा धडपडत मी उठलो आणि दरवाजा उघडला तर समोर रागाने लाल बुंद झालेल्या सौभाग्यवती हातात भाजीच्या आणि किराणा सामानाच्या पिशव्या घेऊन उभ्या होत्या आणि त्यांनी सुरवात केली. "अहो मगाच पासून 10 बेल मारल्या. लक्ष होते कोठे तुमचे? आणि हा गॅस वर दूध करपल्याचा वास नाही का आला तुम्हाला? त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याआधी मी भानावर येऊन प्रथम गॅसवरील दूध बघायला गेलो तर दूध उतू जाऊन गॅसच्या चुलीवर पडून ते जळले होते त्याचा वास सबंध घरात दरवळला होता. अर्धे अधिक दूध फुकट गेले होते.
अपराधी भावना मनात निर्माण झाल्यामुळे गपचूप काहीही न बोलता गॅस वरील पडलेल्या दुधाची सफाई करून पटकन अंघोळीला गेलो म्हणजे पुढची बोलणी ऐकायला नकोत म्हणून. खरे म्हणजे त्या पुंता मिता ची महती मला तिला सांगायची होती पण तवा बराच गरम असल्यामुळे मी ती यथावकाश सांगण्याचे ठरवले. उगाच आताच भडका नको उडायला.!!
अंघोळ करता करता हिप्नॉटीसम हिप्नॉटीसम म्हणतात ते हेच काय असा मी विचार करता करता "नेट हिप्नॉटीसम" हा एक शब्द सुचला आणि मी हा लेख लिहायचे ठरवले.
असो, अशी बेटे आपल्या केरळ मध्ये सुद्धा आहेत बर का? आणि हो आपल्या रत्नागिरी जवळील आरे वारे काही कमी नाही पण महाराष्ट्र शासनाला चांगला पर्यटन मंत्री लाभला तर ते नक्कीच जगातील पर्यटनाचे केंद्र बनेल यात शंका नाही.
माधव भोळे
मराठा साम्राज्याचे मुख्य इंजिनिअर, श्री हिरोजी इंदुलकर
आज 15 सप्टेंबर. आजचा दिवस भारताचा महान इंजिनिअर सुपुत्र सर एम विश्वेश्वरय्या यांचा वाढदिवस हा इंजिनिअर दिवस म्हणून भारतात पाळला जातो.
या दिवशी आणखी एका महान इंजिनिअरची आठवण होते ते म्हणजे मराठा साम्राज्याचे मुख्य इंजिनिअर, श्री हिरोजी इंदुलकर. त्या काळी वास्तुविशारद आणि इंजिनिअर अशा दोन वेगवेगळ्या शाखा नव्हत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांनी साम्राज्याचे मुख्य वास्तुविशारद म्हणून काम केले. त्यांनी भव्य सिंधुदुर्ग आणि रायगड किल्ला बांधला जो दूरदर्शी वास्तुविशारदाच्या स्थापत्यकलेचे तेज प्रतिबिंबित करतो.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधलेला महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग ही अभियंता आणि वास्तुविशारद स्वर्गीय श्री हिरोजी इंदुलकर यांची कालातीत निर्मिती आहे. त्यांनी बांधलेला भव्य किल्ला महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहराजवळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ब्रिटिश आणि पोर्तुगीजांपासून किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी हा किल्ला बनवला. मालवणच्या किनाऱ्यालगत असलेल्या खुर्ते बेटावर, अरबी समुद्राने वेढलेला सिंधुदुर्ग म्हणजे समुद्रातील किल्ला. सिंधुदुर्ग किल्ल्याची निर्मिती हा एक ऐतिहासिक प्रवास आहे. दिवंगत श्री हिरोजी इंदुलकर यांची सिंधुदुर्गच्या बांधकामाचे प्रकल्प व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
भव्य सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यासाठी तीन वर्षे आणि 3000 मनुष्यबळ लागले. 1674 मध्ये, बांधकामाची संपूर्ण प्रक्रिया मुख्य वास्तुविशारद स्वर्गीय श्री हिरोजी इंदुलकर यांच्या देखरेखीखाली होती. वारा, समुद्र आणि मुसळधार पाऊस यांसारखी अनेक आव्हाने असली तरी द्रष्ट्या वास्तुविशारदाने सृष्टीच्या मार्गात कोणतीही अडचण येऊ शकत नाही याची काळजी घेतली. स्वर्गीय श्री हिरोजी इंदुलकर हे खरे सूत्रधार होते. त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या ३००० लोकांना तांत्रिक प्रशिक्षण देण्यासाठी त्याने गोव्यातील १०० पोर्तुगीज अभियंत्यांना कामावर घेतले.
प्लिंथची पातळी 25 फुटांवर आल्यानंतर अचानक संरक्षक भिंत कोसळली. मध्य समुद्राची माती भक्कम पाया देऊ शकली नाही. स्वर्गीय श्री हिरोजींनी जवळच्या ब्रिटीश गोदामात एक वाटाघाटी केली, शिसे विकत घेतले आणि ते वितळवून संरचनेचा पाया तयार केला. संसाधन व्यवस्थापन, नियोजन, रचना आणि संकट व्यवस्थापन या बाबतीत तो खरोखरच त्याच्या काळापेक्षा खूप पुढे होता.
48 एकरांवर पसरलेला, सिंधुदुर्ग किल्ला हा अभिजातता आणि स्थापत्यशास्त्रातील कौशल्याचे उत्कृष्ट प्रतिबिंब आहे. 52 बुरुजांनी युक्त असलेली ही भव्य भिंत काळाच्या कसोटीवर उतरली आहे आणि आजही आपल्या मंत्रमुग्ध सौंदर्याने लोकांना मोहित करत आहे. अवाढव्य भिंती, बांधणीची शैली, छुपे प्रवेशद्वार यामुळे हा किल्ला अधिक वैचित्र्यपूर्ण आणि विलोभनीय दिसतो. दिल्ली दरवाजा किंवा लपलेले प्रवेशद्वार तुम्हाला परिचित असल्याशिवाय कुठूनही दिसत नाही. किल्ल्यातील पाण्याखालची वाट खरोखरच विलोभनीय आहे.
मराठ्यांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यामागील कथा वास्तुविशारदाची प्रचंड उत्कटता दर्शवते. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना हा ऐतिहासिक किल्ला बांधण्याची जबाबदारी दिली होती. स्व.श्री हिरोजींनी रायगड किल्ला बांधण्यास सुरुवात केली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेत दिवस घालवत होते. काम करत असताना, वास्तुविशारदाच्या लक्षात आले की त्याच्याकडे पैसे शिल्लक नाहीत आणि राजाने सोपवलेले काम पूर्ण करण्यासाठी त्याने आपली जमीन आणि घरासह सर्व मालमत्ता विकल्या.
छत्रपती शिवाजी महाराज बंदिवासानंतर परत आले तेव्हा अद्भूत रायगड किल्ला आणि स्वर्गीय हिरोजींच्या समर्पणाने त्यांस पूर्णपणे प्रभावित केले. त्याने त्याच्या मुख्य आर्किटेक्टला बक्षीस म्हणून काय हवे आहे ते विचारले. स्वर्गीय श्री हिरोजी इंदुलकर हे इतिहासातील सर्वात निःस्वार्थ अभियंते होते ज्यांनी आपल्या कलाकुसरीबद्दल अंतहीन उत्कटता बाळगली होती. तो जगात काहीही मागू शकला असता, पण त्याऐवजी त्याने छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या नावावर कोरलेली एक छोटीशी फरशी भेट देण्यास सांगितले.
दगडात कोरलेली ही पाटी रायगड किल्ल्यावरील जगदीश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर लावली जाईल जेणेकरून महाराज मंदिरात गेल्यावर त्यांचे पाय स्वर्गीय श्री हिरोजींच्या नावाला स्पर्श करतील आणि त्यांच्या मस्तकावर अभिषेक करतील. छत्रपती शिवाजी महाराज स्वर्गीय श्री हिरोजी इंदुलकर यांनी समर्पित केलेल्या जगदीश्वर (संपूर्ण जगाचे देव) मंदिराची ही पहिली पायरी आहे. ‘सेवेच्या ठायी तत्पर, हिरोजी इंदुलकर’ असा उल्लेख असलेला शिलालेख जगदीश्वर मंदिरात आजही पाहायला मिळतो.
संसाधन व्यवस्थापन, नियोजन, रचना किंवा संकट व्यवस्थापन असो, स्वर्गीय श्री हिरोजी इंदुलकर त्यांच्या काळात खरोखरच अतुलनीय पुढे होते.
त्या महान वास्तू विशारद आणि इंजिनिअरला आज 15 सप्टेंबर या इंजिनिअर दिवशी नम्रता पूर्वक नमस्कार
माधव भोळे
Subscribe to:
Posts (Atom)

