दरवर्षी जानेवारी महिना हा विविध ज्ञातीसंस्थांच्या कार्यक्रमांनी गच्च भरलेला असतो. कधी कधी एकाच दिवशी दोन कार्यक्रम दोन वेगवेगळ्या भौगोलिक ठिकाणी असतात त्या मुळे ईच्छा असूनही जाणे शक्य होत नाही. अनेकवेळा कार्यक्रमांची आखणी आणि दर्जाही अतिशय सुंदर असतो. कार्यकर्ते जीव तोडून आपले पूर्ण योगदान देत असतात, परंतु बरेच वेळा असे दिसून येते की तीच तीच मंडळी सर्व ठिकाणी प्रेक्षक म्हणून असतात. विद्यार्थी संमेलनांमध्ये तर आयोजकांनी प्रयत्न करुनसुद्धा पालकांचीच उपस्थिती जास्त दिसून येते.
पण खरोखरचं ह्या ज्ञाती संस्थांची गरज आहे कां? यांचा उपयोग काय आहे ?
मानव हा कळपात जगणारा प्राणी आहे. आपल्या एका संस्थेचे बोधवचन आहे "संघे शक्ति कलियुगे". मूळ श्लोक असा आहे "त्रेतायां मंत्र शक्तिश्च, ज्ञान शक्ति कृते युगे, द्वापरे युद्ध शक्ति, संघे शक्ति कलियुगे". म्हणजे त्रेता युगात मंत्र शक्ती, कृत युगात ज्ञान शक्ती, द्वापार युगात युद्ध शक्ती, तर कलियुगात संघ शक्ती बलवान आहे".
असे म्हणतात की एकटी काठी तोडणे सोपे असते परंतु काठीचा भारा किंवा जुडी तोडणे सोपे नाही. आपण ज्ञाती संस्थेमध्ये आणि त्यांच्या कार्यात सामील होतो याचा अर्थ अन्य ज्ञाती धर्माच्या विरुद्ध काम करतो असे नसून आचार्य विनोबांनी सांगितल्याप्रमाणे "प्रत्येकाने आपले अंगण साफ केले तरी देश साफ होईल" या पद्धतीने आपल्या ज्ञातीची प्रगती कशी होईल याचाच विचार करायला हवा.
अर्थात अशा संघटनांमुळे विचारांचे आदान प्रदान होते. आपल्यातील जेष्ठ तसेच कर्तृत्वान व्यक्तींचा परिचय सर्वाना होतो. त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन नवंचैतन्य निर्माण होते तसेच आपणही काहीतरी करून दाखवावे ही ईच्छा निर्माण होते.
आपल्यातील किंवा आपल्या पाल्यातील उपजत किंवा कष्टाने मिळवलेल्या गुणांचे कोणी कौतुक केले तर आपल्याला सुद्धा हुरूप वाढतो. अनेक लोकोपयोगी प्रकल्प संघटनेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. कोणतेही लोकोपयोगी काम करायला आर्थिक बळाबरोबर मनुष्य बळ लागते आणि ते संघटनेतूनच मिळते.
आपल्या ज्ञातीतील देवरुखे ब्राह्मण विद्यार्थी सहायक संस्था, देवरुखे ब्राह्मण अनाथ कौटुंबिक निधी, वैद्यकीय मदत निधी ह्या अखिल विश्व स्तरावर काम करणाऱ्या तसेच मुंबई, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, पनवेल, विरार, चिपळूण, रत्नागिरी इत्यादी ठिकाणचे स्थानिक देवरुखे ब्राह्मण संघ, देवर्षी प्रकाश आणि सन्मित्र समाचार सारखी नियतकालिके आणि सर्व संस्था आपल्या ज्ञातीची उन्नती व्हावी ह्या एकाच उदिष्टाने स्थापन झाल्या असून त्या झपाटून काम करणाऱ्या सर्व संस्थांचा एकच धागा आहे तो म्हणजे "मानव सेवा ही ईश्वर सेवाच" आहे आणि त्या साठी सर्व कार्यकर्ते आपले तन, मन, धन लावून झोकून देऊन काम करीत आहेत. त्यांच्या कार्याला विनम्र नमस्कार.
त्या सर्वांचे कौतुक करायला आणि त्यांनी केलेल्या कष्टाना दाद द्यायला आपण वेळेवर हजर नको कां राहायला?
माधव भोळे
No comments:
Post a Comment